Wednesday, 24 June 2015

....विनोद तावडे ह्यांनी कोणती चूक केली?

विनोद तावडे ह्यांनी कोणती चूक केली?

 १९८० साली त्यांनी कथित ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रवेश घेवून चार वर्षात तो तथाकथित इंजिनियरिंगचा कोर्स पूर्ण केला आणि ती डिग्री प्राप्त केली. 1963 साली जन्मलेले तावडे तेव्हा जेमतेम बारावी होऊन बाहेर पडलेले १७-१८ वयाचे एक विद्यार्थी असावेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची कशी फसवणूक केली जाते ह्याचे तावडे हे खरंतर ज्वलंत उदाहरणच आहेत!

गेल्या वर्षी स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेविषयी गदारोळ मजला होता तेव्हा, ह्या विषयावर मी खालील पोस्ट टाकली होती:

"ओपन युनिव्हर्सिटी , Distant Education Courses, Correspondence Courses, ह्यांचा प्रचंड गैरवापर केला जात असल्याचे सातत्याने निदर्शनास येते. BA, B.Com सोडा, इंजीनियारिंगच्या B.Tech, B. E., B.Sc., M.Sc, M.Tech ते Ph.D. पर्यंतच्या सर्व शाखातील 'डिगऱ्या' स्वस्तात उपलब्ध आहेत.
ह्या तथाकथित विश्वविद्यालयांच्या शाखांमधून कोणत्या परीक्षा(?) घेतल्या जातात ते पाहाल तर खूप मनोरंजन होईल. अत्यंत हास्यास्पद, संतापजनक आणि भ्रष्ट असा हा उघड शिक्षणाचा बाजार शहरी भागात मांडला गेला आहे." इति.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या शैक्षणिक पात्रतेच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुद्दा हा आहे कि इंजिनियरिंग, वैद्यकीय, तंत्रशिक्षण, विज्ञान इत्यादी महत्वाच्या क्षेत्रात घुसलेल्या या मुक्तशिक्षण घोटाळ्याचा पुनर्विचार व्हायला हवा.

मुळात ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या 'समांतर व्यवस्थेला' BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या उच्चशिक्षणाशी संबधित असलेल्या पदव्या अगदी शब्दश: जशाच्या तश्या वापरण्याची परवनागी कशी मिळते? त्यांच्या कोर्सच्या पदव्या वेगळ्या नावाच्या असायला हव्यात, जेणेकरून विद्यार्थ्याची आणि इतरांचीही फसवणूक होता कामा नये. पण हि धूळफेक जाणीवपूर्वक केली जाते कि काय हा खरा मुद्दा आहे! उदा. तावडे ह्यांना 'कोर्स इन इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग' वगैरे नावाची डिग्री द्यायला कुणाची हरकत नसावी. परंतु हटकून "BE डिग्री इन इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग" हा इंजिनियरिंगच्या मुख्य प्रवाहातीलाच शब्दप्रयोग वापरला गेला कारण तिथे धूळफेक अपेक्षित आहे.
हि समांतर विद्यापीठे अशा धूळफेकीसाठीच पैदा केली गेली असावीत. ह्या खोट्या डिग्र्या कुणाला उपयोगी पडतात? खासगी उद्योगजगतात अशा विद्यार्थ्यांना कोणताही स्कोप नाही कारण त्यांच्याकडे अपेक्षित ज्ञान, कौशल्य असण्याची सुतराम शक्यता नसतेच. मग ह्या डिग्र्या कुठे वापरल्या जातात? त्याचे उत्तर आहे सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रातील नोकऱ्या...! वेगवेगळ्या राज्यांच्या नावाने उत्पन्न झालेल्या अशा ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या युनिव्हरसीट्या ह्या काळ्याबाजारात फोफावल्या आहेत. BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या उच्चशिक्षणाशी संबधित असलेल्या पदव्या त्याच नावाने बहाल केल्या जातात. काही अंशी सरकारी मान्यता देखील असल्याने उदारतेने सरकारी नोकऱ्या, पदोन्नती इत्यादी साठी ह्या मुक्तडिग्र्या सढळहस्ते वापरल्या जातात. खासगी क्षेत्रातही थोडीफार धूळफेक होते, पण मुख्यत्वे शिक्षणाच्या ह्या काळ्याबाजाराचा डोलारा सरकारी नोकर्यांशी संबधित आहे.

चारचार वर्षाचे हे कोर्सेस फक्त दरवर्षी मोठी फीस भरून अटेंड केले जातात. कोणत्याही प्रकारची उपस्थिती, लेक्चर, प्रात्यक्षिक मुळातच अपेक्षित नसते. फक्त वर्षाच्या शेवटी नियमितपणे परीक्षा अटेंड (!)करायची, म्हणजे उत्तरपत्रिका भरायच्या कारण त्यावर कोणीही परीक्षक, पर्यवेक्षक वगैरे नसतोच. अशा प्रकारे चार वर्षाच्या फीसा भरल्या कि तुमची डिग्री तुमच्या हातात. असा हा प्रचंड मोठा घोटाळा आहे. मुख्य शहरे, तालुक्याच्या ठिकाणी हि शिक्षणाची गटारगंगा पाहायला मिळेल.
इंजिनियरिंगची डिग्री बाहेरून मिळवायची तर त्यासाठी AMIE नावाचा कोर्स उपलब्ध आहे. अगदी BE च्याच तोडीचा कोर्स. किती सरकारी बाबू AMIE करतात , हा संशोधनाचा विषय आहे. किंवा कितीजण ज्ञानेश्वर विद्यापीठ टाईप काळ्या डिग्र्या विकत घेतात हे पाहणे मनोरंजक असेल.

मुद्दा हा आहे कि ह्या तथाकथित विद्यापीठांना BE , BTech , ME , MTech , BSc , MSc हि नावे वापरायला बंदी घालायला हवी. त्यांच्या कोर्सेसना त्यांनी त्यांच्या विद्यापीठाची नावे द्यावीत. उदा. इलेक्ट्रोनिक्स इंजीनियरिंग कोर्स फ्रोम ज्ञानेश्वर युनिव्हरसिटी वगैरे. तसेच अशा तथाकथित डिग्र्याची सरकार दरबारी नोकऱ्या-पदोन्नती साठी गैरलागू ठरवायला हव्या.

तावडे नावाचा विद्यार्थी वयाच्या १७-१८व्या वर्षी जर ह्या १९८० साली ह्या घोटाळ्याचा शिकार झाला असेल तर आज कित्येक विद्यार्थी BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या नावाच्या वलयाने नागवले जात असतील? म्हणून खरा मुद्दा हा आहे कि इंजिनियरिंग, वैद्यकीय, तंत्रशिक्षण, विज्ञान इत्यादी महत्वाच्या क्षेत्रात घुसलेल्या ह्या मुक्तशिक्षण घोटाळ्याची हकालपट्टी व्हायला हवी, तावडेंची नव्हे!

Monday, 22 June 2015

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याची घटना कालच घडली. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत हि घटना घडली. हि विषारी दारू ठाणे जिल्ह्यातून किंवा गुजरातमधून आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. ह्या पार्श्वभूमीवर हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय असा प्रश्न उभा राहतो.
महागडी देशी-विदेशी दारू न परवडणारा गरीब मजूर वर्ग गल्लीबोळातील हातभट्टीच्या दारूचा ग्राहक आहे. त्यामुळे हातभट्टी अर्थातच बेकायदेशीर असूनही तिचा मोठा पारंपारिक उत्पादक-ग्राहक वर्ग देशात अस्तित्वात आहे, हे वास्तव आहे. त्याची उत्पादनाची पद्धत गावठी तरीही वैज्ञानिक म्हणजेच उर्ध्वपातन म्हणजेच डीस्टीलेशनच आहे.

पारंपारिक हातभट्टीमध्ये उसाची मळी किंवा (काळा गुळ) आणि नवसागर (अमोनियम क्लोराइड NH4Cl )हे मिश्रण काही दिवस आंबवून त्याचे उर्ध्वपातन केले कि गावठी दारू तयार होते. ह्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून दारूचे उत्पादन ग्राहकांना उपलब्ध होते. ग्रामीण भागात आणि शहरी गल्लीबोळात हीच गावठी दारू बहुधा उपलब्ध असते. हातभट्टीच्या त्या मिश्रणात संत्री, मोसंबी, आंबा, जांभूळ, इत्यादी फळे टाकल्यास त्या त्या फळाच्या अर्काची चव प्राप्त होते.
मोह किंवा जांभळे टाकून उत्तम प्रतीची दारू बनविली जाते आणि दारूतले दर्दी शौकीन ह्या दारूला 'इंग्लिश दारू'पेक्षाही उच्च दर्जाची मानतात!
मग प्रॉब्लेम कुठे येतो? तर मोठ्या प्रमाणत (हजारो लिटर) ह्या हातभट्टीच्या दारूचे उत्पादन करणारे जे मोठे व्यावसायिक निर्माण झाले आहेत, त्यांनी ह्या दारूच्या उत्पादनाच्या पारंपारिक पद्धतीत लबाड्या करायला सुरुवात केली. त्यासाठी रसायनांचा भडीमार केला जाऊ लागला. युरिया सारखे खत आणि ब्याटरिची (सेल) पावडर देखील हातभट्टीत वापरले जाऊ लागले. अर्थात पारंपारिक उर्ध्वपातनाच्या शास्त्रात आधुनिक रसायनशास्त्राने मोठी घुसखोरी केली... आणि त्यातून विषारी रासायनिक दारूची प्रकरणे गेल्या काही वर्षात उद्भवली.
हातभट्टीच्या दारूत अलीकडे मिथेनॉल ह्या रसायनामुळे प्रचंड जीवघेणी विषारी भेसळ सुरु झाली. हे मिथेनॉल का वापरले जाते?

वर उल्लेख केल्यानुसार उर्ध्वपातनातून निर्माण झालेल्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून गावठी दारू ग्राहकापर्यंत पोहोचत असे. नेमका इथे मिथेनॉलने खेमिकल लोचा केला. ह्या 'पिव्वर दारू'त फक्त दोन थेंब मिथेनॉल टाकल्यास सुमारे सातपट जास्त गावठी दारू तयार होऊ लागली! 'थेंबाची दारू' ह्या नावाने हि मिथेनॉलदारू ओळखली जाते. आता खेडोपाडी आणि गल्लीबोळातून हे मिथेनॉल संशोधन पसरल्याने छोटेमोठे हातभट्टीवालेहि सर्रास मिथेनॉलदारूचे उत्पादन करू लागले. त्यातून मिथेनॉलचे 'थेंबाचे' प्रमाण साहजिकच अनियंत्रित होऊ लागले. मिथेनॉलच्या अनियंत्रित वापराने गावठी दारूचे जीवघेण्या विषारी दारूत रुपांतर होत गेले. ह्या विषारी मिथेनॉलदारूचे दुष्परिणाम मुंबईतील मालवणी येथील दुर्घटनेतून पुन्हा उघड झाले.

अर्थात, ह्या गावठी दारूच्या धंद्यावर (तो बेकायदेशीर असल्याने) बंदी आणून हा प्रश्न सुटेल हे फक्त स्वप्नरंजन आहे. हातभट्टीची हजारो वर्षांपासून परंपरा आहे आणि आजही ती टिकून आहे कारण त्याचे मागणी आणि गरजचे अर्थकारण. ग्रामीण (आणि शहरीही) भागातील मोलमजुरी करणाऱ्या फाटक्या लोकांना कायदेशीर कारखान्यातील दारू उपलब्ध आणि परवडणार असेल तर प्रश्नच नाही, परंतु तेही संपूर्ण दारूबंदिसारखे स्वप्नरंजनच आहे. एकीकडे दारूवर प्रचंड कर लादून ती महागडी करून टाकायची, दारूची कारखानदारी वाढवायची आणि दुसरीकडे गरीब श्रमिकांच्या श्रमपरीहाराला विषारीरसायनयुक्त जीवघेणं बनवायचं, ह्या मूर्खाच्या नंदनवनातून बाहेर येण्याचा उपाय काय?