Thursday, 25 February 2016

मराठेशाही, राज्याभिषेक आणि कट-कारस्थाने

संभाजी राजांच्या हत्येतील वैदिक -अवैदिक किंवा वैदिक-शाक्त हा संदर्भ संजय क्षीरसागर ह्यांनी उलगडून दाखविला आहे. त्यावर प्रतिक्रिया:

शून्यातून स्वराज्य :

शिवचरित्र म्हणजे स्वराज्यनिर्मितीसाठी प्राणपणाने लढलेले अठरापगड जातीचे मराठे आणि त्यांचे नेतृत्व करणारा एक युगपुरुष राजा अशी अलौकिक रचना आहे. बाजीप्रभू(१६६०) मुरारबाजी(१६६३)तानाजी(१६७०) प्रतापराव(१६७४) असे एकाहूनएक सरस जानकुर्बान मराठे स्वराज्याच्या कार्यसिद्धीसाठी अखंड संघर्षरत दिसतात. स्वत: शिवराय अफझल(१६५९), शाईस्ता(१६६५), आग्रा(१६६६) सारख्या नाट्यमय प्रकरणात आघाडीवर संघर्षात आहेत. ह्या लष्करी व्यवस्थेपलीकडे राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, महसुल-करव्यवस्था आदि दैनंदिन कारभारात फड-कारकुनी सांभाळणारे अंमलदार वगैरे देखील स्वराज्य-समर्पित आणि म्हणून रयतेचे राज्य अशी लोकप्रियता. ह्या सुवर्णकाळाचा साधारणत: शिवराज्याभिषेक हा महत्वाचा म्हणजे शेवटचा टप्पा असल्याचे दिसते. नेताजी पालकरांचे बंड हा एक अपवाद परंतु त्याचे पैलूही इतरत्र संबधित आहेत.

कटकारस्थानांचा काळ :

राज्याभिषेकाला झालेला विरोध. वैदिकांनी शुद्र म्हणून शिवरायांना केलेला विरोध सर्वश्रुत आहे. त्यातून काशीचे गागाभट्ट किंवा क्षत्रियकुलावतंस म्हणून राजस्थानहून आणलेली वंशावळ आणि तरीही निश्चलपुरी गोसावींनी केलेला शाक्त अभिषेक....(१६७४)
नंतर महाराज दक्षिण दिग्विजयात १६७६ ते १६७८ पर्यंत असताना रायगडावर संभाजीराजे आणि महाराणी सोयराबाई व अष्टप्रधान ह्यांच्यातील बेबनाव सुस्पष्ट आहे. महाराजांनी संभाजीराजे शृंगारपुर इथे प्रभानवल्लीच्या सुभ्यावर नेमणूक करून तिढा सोडविण्याचा(?) प्रयत्न केला. त्या परिस्थितीत युवराज संभाजीराजे बंड करून दिलेरखानाला जाऊन मिळाले. हे आणखी एक कृष्णकारस्थान.
ह्याआधी शिवाजी राजांवर एकदा विषप्रयोग झाल्याचा उल्लेख सापडतो. त्याचा आळ युवराजांवर आलेला... त्याआधी अण्णाजी दत्तो ह्यांच्या नात्यातील एका स्त्रीच्या चरित्राचा आळ... कारस्थानांची मालिकाच. 'दोषी कोण? कट कुणाचा? लक्ष्य कोण?' हे मुद्दे काहीही असले तरी कटकारस्थानांना प्रचंड वेग आल्याचे इथे स्पष्ट होते. ह्या आप्तस्वकीयांच्या कटांची मालिका इतकी गंभीर कि प्रत्यक्ष स्वराज्याची वाटणी करून संभाजीराजांना जिंजीचे स्वतंत्र राज्य देऊ पाहणारे हतबल महाराज!...
महाराज १६८० मध्ये ऐन पन्नाशीत निवर्तले आणि त्यांच्या देहाला भडाग्नी देण्याचे कारस्थान झाले. इथेही महाराजांवर विषप्रयोग झाल्याचे उल्लेख सापडतात. संभाजीराजांचा अभिषिक्त अधिकार डावलून परस्पर राजारामाला मंचकारोहण करण्यात आले. अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगळे आदि अष्टप्रधान मंत्री संभाजीराजांवर पन्हाळ्यावर चालून गेले.

महान सरनौबत हंबीरराव मोहिते: खणखणीत राजनिष्ठेचा एकमेवाद्वितीय खंदा पाईक

केवळ सरलष्कर हंबीरराव मोहिते ह्यांच्या सच्च्या राजनिष्ठ भूमिकेमुळे हे कारस्थान उधळले गेले आणि अण्णाजी-मोरोपंत वगैरे स्वत:च कैदेत पडले. सरसेनापती हंबीरराव ठामपणे युवराज संभाजीराजे ह्यांच्या पाठीशी उभे राहिले. रक्ताची बहिण-भाचा आणि त्यांना सामील मंत्रीगण ह्यांच्या अभद्र युतीत सामील न होता, अडचणीत असलेल्या परंतु स्वराज्याचा निर्विवाद वारस असलेल्या शंभूराजांना स्पष्ट पाठींबा देऊन त्यांच्या विरोधकांना धडा शिकविणारा हा महान सरनौबत. त्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत औरंगजेबाशी झुंजीत संभाजी महाराजांना वरचढ ठेवणारा हा रणधुरंदर सेनानी.
ह्या काळात संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. नंतर संभाजीराजांचा आश्रित शहजादा अकबर ह्याच्या मार्फत सत्तांतराचा प्रयत्न झाला. ह्यावेळी संभाजीराजांनी सर्व कारस्थानी बंडखोरांना देहान्ताच्या शिक्षा दिल्या. स्वत: सोयराबाई कटात सामील असल्याने मृत्युमुखी पडल्या. ह्या धामधुमीच्या काळात संभाजीराजांची लष्करी बाजू मात्र औरंगजेबाला सर्व सामर्थ्याने सडेतोड जबाब देत होती. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे सरनौबत हंबीरराव मोहित्यांचा शर्थीचा पराक्रम आणि अनन्यसाधारण राजनिष्ठा. पूर्वार्धात ह्या कटाच्या घटना घडल्या तरी नंतर ५-६ वर्षे संभाजीराजे आणि हंबीरराव मोहिते ह्यांनी मराठेशाहीला स्थिरस्थावर केल्याचे दिसते. मराठ्यांना असा विजीगिषु सरलष्कर पुन्हा क्वचितच मिळाला. हंबीरराव धारातीर्थी पडले(१६८७) आणि तिथेच संभाजीराजांची विजयपताकाही भेलकांडू लागल्याचे दिसते.

पुन्हा कट-कारस्थाने-फितूरी:

प्रल्हाद निराजी आणि इतर कारकून मंडळीनी पुन्हा उचल खाल्ली आणि संभाजी राजांच्या जागी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट उघड झाला. ह्याच काळात गणोजी शिर्के आणि इतर मराठे सरदार वतनदार औरंगजेबाच्या कच्छपि लागून स्वराज्याशी बंडखोरी करू लागले. औरंगजेब आदिलशाही-कुतुबशाही गिळंकृत करून सर्व शक्तीने शंभूराजांवर तुटून पडला. फितुरी, कट-कारस्थाने चरमसिमेवर पोहोचली आणि १८९ मध्ये संभाजीराजे आणि छन्दोगामात्य कविकलश संगमेश्वरी मुकर्रबखानाच्या कैदेत सापडले. तिथे रायगडावर संभाजी महाराजांना सोडविण्याचे कोणतेही गंभीर प्रयत्न न होता आणि संभाजीराजांना असहाय्य अगतिक मृत्युच्या तोंडी देऊन राजाराम महाराजांना गादीवर बसविण्यात धन्यता मानली गेली.

ह्यानंतर मराठ्यांचा इतिहास हा शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेपासून दूर दूर जात मोगलाई कट कारस्थानाच्या बंडखोरीच्या मालिकांचा इतिहास बनून गेलेला दिसतो. ह्याची सुरुवात मात्र स्वत: शिवाजीराजांच्या समक्ष राज्याभिषेकापासूनच झाल्याचे दिसते... कि राज्याभिषेक आणि त्यातील वैदिक-अवैदिक वादाची बीजेच ह्याला कारणीभूत आहेत, ह्यावर विचारविमर्श व्हायला हवा. एखादे अलौकिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येकांनी जीवाची बाजी लावावी, परंतु स्वप्नपूर्ती झाल्यावर मात्र त्यांनीच एकमेकाच्या जीवावर उठावे, हा मनुष्यधर्मच असावा कदाचित!

Friday, 12 February 2016

'A Lamb Lionised' ह्या निरंजन टकले लिखित लेखावरील अश्लाध्य टीकेचा प्रतिवाद

('A Lamb Lionised' हा निरंजन टकले लिखित लेख 'The Week' मध्ये प्रकाशित झाला आणि सावरकरभक्तांमध्ये निरर्थक खळबळ माजली. त्यातल्याच एका अंधसावरकरभक्ताने फेसबुक-ब्लॉगवरून शिवराळ टीकेचा अश्लाध्य गदारोळ उठवला... )
"बालिश बहु बायकांत बडबडला" असं मोरोपंतांनी बाळराजे उत्तराबद्दल आर्यावृत्तात महाभारतात लिहिलंय. त्यातला बालिश उत्तरबाळ सांप्रत फेसबुकवर बडबडला आहे. तर काय म्हणतात हे संशोधकबाळ ते थोडक्यात पाहू. थोडक्यात ह्यासाठी कि मोठेच्यामोठे ब्लॉग वॉलवर चिकटवायचे आणि रात्रीबेरात्री चारचार वाजेपर्यंत 'संशोधन' करून पुन्हा पुन्हा टाकत राहायचे , तेवढा रिकामचोट वेळ आपल्याला नाही बुवा.
मुद्दा क्र. १ : """निरंजन समर्थक फ़ुरोगाम्यांनि समजून घ्यावे कि कपूर आयोगासमोर अप्पा कासार आणि दामलेंचि साक्ष झालीच नव्हती. अजिबात नाही . हि शुद्ध थाप आहे . कपूर आयोग जो इंटर्नेट वर उपलब्ध आहे - त्यात साक्षिदारांचि लिस्ट आहे - त्यात कासार / दामले हि नावे नाहीत ."""
ह्या बहाद्दराने कपूर आयोग किती वाचला ते सोडा, नुसता चाळला असता तरी अप्पा कासार आणि दामले ह्याबद्दल कपूर आयोग काय म्हणतो ते सुस्पष्ट झाले असते. किंवा अगदी चटकन विकीपेडियावर जाऊन पाहिलं असतं तरी हा बालिशपणा झाला नसता. फक्त इंडेक्स वाचून आणि साक्षीदारांची लिस्ट वाचून कपूर आयोगाबद्दल लिहिण्याचा भंपकपणा हे ब्लॉग्विरच करू शकतात. विकीपेदिया म्हणते " It (कपूर कमिशन) was provided with evidence not produced in the court; especially the testimony of two of Savarkar's close aides - Appa Ramachandra Kasar, his bodyguard, and Gajanan Vishnu Damle, his secretary.
स्वत: कपूर आयोग दामले आणि कासार ह्यांच्या साक्षीपुराव्याबद्दल काय म्हणतेय ते पृष्ठ क्र. २९४,३००,३१७, ३१८ इत्यादी पानांवर थोडी तसदी घेतली तर सहज पाहता येईल. ती पाने इथे जोडली आहेत.
म्हणून निरंजन टकले आपल्या लेखात लिहितात ,"Gajanan Vishnu Damle, Savarkar’s private secretary, and Appa Kasar, his bodyguard, deposed before the commission and accepted their knowledge of Savarkar’s involvement in the conspiracy to kill Gandhi. "
मुद्दा क्र. २ : """पण निरंजन टकल्यांनि तारीख बदलली - कारण त्यांना त्याच्या मालकांनी भाडोत्री निष्कर्ष काढण्यासाठी कामावर ठेवले आहे . जो आयोग सावरकर मेल्यानंतर काम सुरु करतो तो कपूर आयोग टक्ल्यांनि एक वर्ष अलिकडे खेचला आहे !!या शेळी लेखात टकले लिहितात "The report, however, came too late. Savarkar died on February 26, 1966, weeks after he stopped taking food and medicines. " लेखकाचे उद्देश इथेच स्पष्ट होतात. रिपोर्ट उशिरा आला असे त्याला म्हणायचे आहे. वस्तुत: सावरकरांना फासावर चढवायची टकल्याची संधि हुकली ती रिपोर्ट उशिरा आला म्हणून नाही . तर टकल्याने तारीख चुकवली म्हणून !""'
हा बालीशपणाचा अत्यंत मनोरंजक असा पुरावा आहे बरं. इथे अगदी शब्दाशब्दातून बालिश उत्तरबाळ कसा बायकांत बडबडला आहे त्याची कल्पना येईल. कोणतही भक्त माणूस मानसिकदृष्ट्या किती पंगु असतो आणि आपल्या अराध्यावर झालेल्या टीकेने मानसिक संतुलन बिघडून घेतो त्याचा हा उत्तम नमुना.
निरंजन टकले लिहितात... "On March 22, 1965, a commission of inquiry was set up, with former Supreme Court judge J.L. Kapur as its chairman, to investigate the conspiracy in Gandhi’s assassination."
ह्यात भडकून जाण्यासारखं काहीच नाही. कारण आयोग त्याच तारखेला गांधींहत्येच्या कटाच्या चौकशीसाठी स्थापन झाला. पाठक हे मंत्री झाल्याने पाठक आयोगाच्या जागी कपूर आले आणि त्याचे नाव तेवढे कपूर आयोग झाले. हि सामान्य कार्यपद्धत आहे. आमच्या उत्तरबाळाने साक्षीदारांची लिस्ट बघताना वेडेपिसे न होता त्यात पुरेसे लक्ष घातले असते तर त्यातच पाठक कमिशनने १९६५ साली केलेले तपासकाम सहज दिसले असते. मुळात गांधीहत्येतेले गुन्हेगार १९६४ साली सुटले आणि तेव्हा झालेल्या, सभा त्यातलि आक्षेपार्ह विधाने आणि त्यातून उसळलेला जनक्षोभ ह्या पार्श्वभूमीवर पाठक(कपूर) आयोग स्थापन झाला. त्याचा सावरकरांच्या निधनाशी बादरायण संबंध जोडण्याची बलीशबुद्धी असले भक्तगणंगच करू जाणेत. म्हणजे थापा कोण मारतंय ते अगदी सुस्पष्ट आहे.
बाकी कोलू, माफीनामे ह्याबद्दल वगैरे बऱ्याच थापा किंवा भूलथापा किंवा बालिश बडबड कितीही होऊ शकते. मूर्खपणाला मर्यादा नसते असे म्हणतात. त्यामुळे आणखी खोलात जाऊन उत्तरबाळाच्या बालिश चिखलफेकीबद्दल जास्त चिखल उडवण्यात काही मतलब नाही.
त्यापेक्षा नैमिषांरण्यातील शार्दुलविक्रिडीत बगळ्याची कथाच बरी , नाही का? (ती लवकरच येत आहे..)






 ह्यावर अर्थातच संशोधक महाशय चिडले आणि धमक्या, अपशब्द वगैरे थयथयाट वगैरे भडीमार सुरु झाला.
 त्यावर आपली प्रतिक्रिया:

 इथे दोनच मुद्दे मांडलेत, ते सोडून फालतू अर्वाच्च भाषेत वेडगळ कमेंट केल्यात संशोधक पंडितांनी त्या महाशयांना त्यावर काल बाहेर असल्याने विस्तृत लिहू शकलो नव्हतो.
कपूर आयोगासमोरील दामले-कासार ह्यांच्या साक्षीपुराव्याबद्दल ह्या महाशयाने साक्षीदारांच्या लिस्टमध्ये त्यांची नावे नाहीत असं संशोधन केल. पण कपूर आयोगाने ह्या दोघांच्या साक्षी पुरावे म्हणून स्वीकारले आहेत आणि तसे उल्लेख असलेली कपूर आयोगाची पानेच इथे पोस्ट केली. त्यावर मात्र हा भाऊ काही बोलायला तयार नाही.

कपूर आयोग आणि पाठक आयोग हे वेगवेगळे आणि म्हणून टकले ह्यांनी तारीख मुद्दाम चुकवून सावरकरांना फाशी व्हावी अशी कल्पना व्यक्त केल्याचा तर जावईशोध फारच भन्नाट लावला. हा ठार वेडाच असावा कि काय असे कायच्या काय लिहून हा मोकळा होतो. त्या साक्षीदारांच्या लिस्ट मध्ये काही साक्षीदारांच्या नावाखाली पाठक कमिशन समोर किती तारखेला साक्ष झाली त्याच्या नोंदी आहेत. ते उघड्या डोळ्यांनी पाहणारा माणूस शुद्धीवर असेल तर असली वक्तव्ये खचितच करणार नाही.

वरील दोनच मुद्दे मी मांडले आहेत , त्यावर एकही शब्द न बोलता हा सावरकरभक्त थेट आपल्या सुसंकृत भाषेत माझ्या आणि टकले ह्यांच्या पित्यांना इथे चर्चेत उद्धृत करू लागला. आता ह्याचा बाप कोण , किती ते आमच्यासारख्यांनी लिहिणे योग्य नाही. पण तरीही अशाच एका पुरोगामी सेक्युलर डावे इत्यादींच्या बापाविषयी राळ उठवणार्या एका खुळ्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
असली अर्वाच्च भुंकणारी जमात... ह्यांच्या पेकाटात वैचारिक लाथा घातल्या कि "वाचवा... धावा..." असं त्यांच्या बिचाऱ्या ब्लॉगवाचकांच्या नावाने केकाटत पळतात. आधीच समर खडस ह्यांच्या वॉलवर काही महिन्यांपूर्वी पुरोगामी, डावे ह्यांच्यावर बेमतलब शिवराळ गरळ ओकणाऱ्या वाचाळ विराला चांगलाच धडा शिकविला होता. हा त्याचाच नवा वामनावतार जो घाबरून सेनेच्या नावाने केकाटलाय. दुर्दैवाने सैनिक सध्या विवेकी झाल्यात म्हणे (नाहीतर त्यांनी आंदोलन केले असते वगैरे)
मुद्दे संपले कि ह्यांना गुद्द्यासाठी मात्र इतरांची आठवण होतेच.


 निरंजन टकले ह्यांनी त्यांच्यावर टीका करणार्यांना कोर्टात जाण्याचे खुले आव्हान दिले आहे. आपला प्रत्येक शब्द सिद्ध करण्याची जबादारी त्यांनी घेतलीय. पण वाचाळविराना ते नको , फक्त वितंडवाद घालायचं आहे. राज कुलकर्णी ह्यांच्या पोस्टवर श्री. टकले ह्यांनी सविस्तर मुद्दे मांडले आहेत. त्यावर फक्त अर्वाच्च शब्दांत पुन्हा चिखलफेक करण्या व्यतिरिक्त काहीही उत्तर नाही. लोकांची थोबडे फोडू पाहणारे वीर कोणतीही प्रतिक्रिया आजवर देण्यात असमर्थ. टकले ह्यांच्या लेखातील काही अडचणीच्या भासणाऱ्या जागा पकडून त्याच्या अनुषंगाने काहीतरी हाणामारी करीत सुटला ह्यापलीकडे काहीही निष्पन्न झालेलं नाही. होय, टकले ह्यांच्या लेखातील काही शुद्धलेखनाविषयक शब्दयोजनेच्या, वाक्यरचनेच्या वगैरे चुका संशोधक वीरांनी दाखवून दिल्यात हे त्यांचे कर्तुत्व मान्यच करायला हवे. 

ह्या सावरकरभक्तांची अडचण कशी ओळखायची तर त्यासाठी एक व्यवच्छेदक लक्षण आहे ते म्हणजे सावरकर सिद्ध करण्यासाठी हि मंडळी कधी शिवाजी महाराज , कधी नेताजी सुभाषबाबू, रासबिहारी बोस आणि सध्या बाबासाहेब आंबेडकर पर्यंत कुणाचाही आपल्या खोट्यानाट्या थियरिमधे हटकून आधार घेतातच, त्याशिवाय ते पंगु असतात जणू. हा वाचाळवीर आधारासाठी लाला लजपतराय ते भगतसिंग पर्यंत गेलाय, हे विशेष. टकले ह्यांच्या लेखावर टीका करण्याच्या वेडापायी फाळणीच्या किंवा द्विराष्ट्रवादाच्या निर्णयासाठी ह्याने लाला लजपतराय ह्यांना वेठीस धरल्याने त्यावर "मग गांधीजींना सावरकरभक्त किंवा गोड्सेवादी लोकांनी कोणत्या कारणासाठी ठार केले?" हा सवाल संजय सोनवणी ह्यांनी उपस्थित केला तर त्यावर बहाद्दराकडे आजवर कोणतेही उत्तर नाही. एकही मुद्द्यावर उत्तर नाही आणि आता म्हणे इस्लामवर काम चालू आहे. काय डोंबलं लिहिणार हा, जिथे साधे मुद्दे प्रतिवाद करता येत नाही. उगाच पळवाटा काढायच्या.

कीव तरी किती करायची? कधी मदर तेरेसावर थुंकतो, कधी साने गुरुजींवर घसरतो, कधी दत्तप्रसाद दाभोल्कारांवर चढतो. आणि म्हणे मी नास्तिक, मी दाभोलकरप्रेमी ..मी अमक्या मी ढमक्या. मी देशासाठी यांव केलं , मी संविधानप्रेमी. दुसरीकडे लोकांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायची, कुणाचा बाप काढायचा, कुणाचं श्राद्ध घालायचं ... उगाच नोकरी धंद्याची काळजी व्यक्त करायची...उगाच मारायची/मरायची भाषा करायची...सारे रडगाणे मल्टीपल डिसऑर्डर... हि सडकी मानसिकता एक्स्पोज करणे गरजेचे होते, म्हणून हा खटाटोप.