Wednesday, 27 November 2013

समाजातील अभिजनवर्ग आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा.

समाजातील अभिजनवर्ग आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा.

अलीकडे लता मंगेशकर ह्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाची  बातमी वादग्रस्त झाली होती. 
लताबाई नि नरेंद्र मोदी ह्यांना बोलाविले आणि ते पंत-प्रधान व्हावेत अशी मनीषा जाहीर केली. त्यांनी हिंदुत्ववादी, सावरकरवादी  विचारसरणी स्वीकारावी किंवा मोदींचे गुणगान गावे हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. मुद्दा हा आहे कि अशा प्रसंगी व्यासपीठावर साधारणपणे राजकीय-पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवण्याची प्रथा आहे. बातमी मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देखील व्यासपीठावर असल्याचे दिसते. त्या हॉस्पिटलसाठी राज्य सरकारने केले सहकार्य लक्षात घेता
मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ह्यांची उपस्थिती असणे उचित ठरले असते. प्रचलित रिवाजाला फाटा देऊन मंगेशकरांनी 'चूक' केली हेच दिसून येते.

दुसऱ्या एका बातमीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मारकासाठी शिवसेनेने मा. पवारसाहेबांना पुढारी केले. ह्यात उद्धव ठाकरेंची प्रगल्भता दिसली. सदर स्मारक समितीमध्ये पवारसाहेबांनी लताबाईना घेण्याची सूचना केली असे समजले! मंगेशकरांची मागील भूमिका मनात न ठेवता पवार साहेबांनी दाखविलेला हा मनाच्या मोठेपणा महत्वपूर्ण आहे. हि सामाजिक जाणीव सर्वांनी ठेवायला हवी.

सचिनच्या निवृत्तीनिमित्ताने झालेल्या पार्टीला विनोद कांबळी उपस्थित नव्हता हि बातमी पहिली होती. त्या पार्टीला सचिनच्या जवळचे, सहकारी क्रिकेटपटू , स्टार, राजकारणी, इ. झाडून सगळे मान्यवर उपस्थित राहतात मग कांबळी का नाही हा मुद्दा लक्षात घ्या. मध्यंतरी विनोदने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीच्या अपयशाबद्दल बोलताना सचिन ने त्या अडचणीच्या काळी आपल्याला 'मदत' केली नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. हे जर विनोदच्या पार्टीला न येण्याचे कारण असेल तर हि दुर्दैवाची बाब आहे. सचिन ने 'चूक' केली असे म्हणावे लागेल. विनोदच्या तळतळाट गैर-वाजवी नाही कारण तो सिस्टम चा  बळी ठरला हे उघड सत्य आहे. द्रविड-गांगुली-लक्ष्मण ह्यांची कारकीर्द बहरत असताना विनोद अक्षरश: खड्याप्रमाणे बाहेर  फेकला गेला होता. म्हणून सचिनने त्या वक्तव्याचा राग धरून बसणे उचित नाही. तसे असेल तर, सचिन १९४ वर खेळत असताना डाव घोषित करणाऱ्या द्रविड-गांगुलीचे काय? अर्थात हा केवळ अंदाज आहे, तथ्य काय आहे ते विनोद आणि सचिन लाच ठाऊक!

कालच्याच बातमीत न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या  कामकाजावर बंदी आणून गोपीनाथ मुंडे ह्यांच्या बाजूने निर्णय दिला. खरे पाहता मुंडे ह्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखण्याचे काही कारण नव्हते. पवारसाहेबच विजयी झाले असते. परंतु काहीतरी तांत्रिक बाबीचा बागुलबुवा उभा करून मुंडेंच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकारावरच गदा आणली गेली. लोकशाहीची मुस्कटदाबी करायचा तो सोयीस्कर प्रयत्न होता. न्यायालयाने त्याला चपराक देऊन पवारसाहेब आणि MCA  ह्यांची 'चूक' होती हे दाखवून दिले!

वरील सर्व उदाहरणे हि तथाकथित अभिजन वर्गाने केलेल्या चुकांची किंवा चूक-दुरुस्तीची आहेत.   समाजशास्त्राप्रमाणे बहुजन-अभिजन हे जे अभिसरण होत असते त्यातून घडलेला हा अभिजनवर्ग आहे. आपल्या समाजात क्रिकेट-सिनेमा-राजकारण ह्या क्षेत्रात हे अभिसरण अधिकच वेगाने होत असल्याचे चित्र आहे. अभिजन वर्गाने बहुजन वर्गापुढे आपल्या कर्तुत्वाने, विचाराने आदर्श निर्माण करावा जेणेकरून बहुजन वर्ग त्यांना अनुसरून वाटचाल करू शकेल. तरच ते अभिसरण यशस्वी होत राहील.
 

Saturday, 16 November 2013

क्रिकेटसन्यासा नंतर सचिन ने काय करावे?

 16/11/2013 (फेसबुक पोस्ट )

शेवटी सचिन निवृत्त झाला. त्याची शेवटची कसोटी गाजली ती त्याच्या भावनोत्कट निवृत्तीसाठीच. संपूर्ण देशच नव्हे तर अवघे क्रिकेट विश्व सचीनोत्सवात सामील झाले. ज्या खेळ पट्टीवर त्याने २४ वर्षे राज्य केले त्याच २२ यार्डाच्या खेळ पट्टीला अभिवादन करून त्याने क्रिकेटचा निरोप घेतला. एक डाव संपला...पण आता दुसरी इनिंग सुरु होणार हे देखील ओघाने आलेच!

क्रिकेटसन्यासा नंतर सचिन ने काय करावे? ह्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
त्याने शास्त्री, गावस्कर प्रमाणे समालोचक व्हावे का?
त्याने कपिल, श्रीकांत प्रमाणे व्यावसायिक व्हावे?
कि त्याने सनी डेज सारखे एखादे पुस्तक लिहावे?
त्याने वेंगसरकर प्रमाणे क्रिकेट अकादमी चालू करावी?
चर्चा अशीच आहे कि त्याने क्रिकेट संबधित काहीतरी करीत राहावे.
सचिन देखील म्हणतो क्रिकेट माझा ऑक्सिजन आहे! अंजली म्हणते कि सचिन शिवाय क्रिकेट चा विचार करू शकते पण क्रिकेट शिवाय सचिनचा विचार ती करू शकत नाही!
इथेच माझ्या मते टर्निंग पोइन्ट आहे!

जे इतर सर्वांनी केले तेच सचिन ने करावे का? कि सचिन ने काही परिवर्तन घडवून आणावे?
क्रिकेट ह्या खेळाने सचिनला सर्व काही दिले आहे. अफाट श्रीमंती, प्रसिद्धी, प्रेम, इ. सर्व काही...
आता परत त्यातून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा केली तर तेही सहज शक्य आहे. इतर सर्वजण ते करीत आहेतच.
मला वाटते कि इथेच सचिनचे वेगळेपण उठून दिसल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या देशात क्रिकेट आणि सिनेमा ह्या दोन प्रचंड व्याप असलेल्या एन्टरटेनमेंट इंडस्ट्री आहेत. शे-सव्वाशे करोड लोकांच्या देशात क्रिकेट आणि सिनेमा ह्या क्षेत्रातील स्टार लोकांची प्रचंड रेलचेल आहे. अर्थातच ह्या सर्व स्टार ना महानियता मिळवून देण्याचे काम ह्या देशातील लोकांचे आहे. भारतीय समाजाचे ते श्रेय आहे हे वादातीत सत्य आहे!

परंतु दुर्दैवाने असे दिसून येते कि क्रिकेट आणि सिनेमा क्षेत्रातून प्रचंड यश, प्रसिद्धी, संपत्ती मिळवून देखील हे तथाकथित स्टार ज्या समाजाने आपल्याला महानतां दिली त्या समाजाला विसरून जातात.
सामाजिक ऋण आणि त्याची परतफेड अशी समाज भावना कुठेही दिसून येत नाही. ह्या कृतघ्नते मुळे त्यांच्यावर समाजाचा रोष देखील आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टीव वौ आपल्या देशात येउन काही सामाजिक कार्य करताना दिसतो परंतु आपले क्रिकेटपटू क्वचितच अशा कार्यात दिसून येतात हि खेदजनक बाब आहे. कपिलदेव, गावस्कर सारखे महान क्रिकेटपटू सामजिक कार्यापासून अलिप्तच राहताना दिसून येतात.

एखादा सलमान खान क्वचित काही सामाजिक कार्य करताना दिसतो परंतु सिनेमा क्षेत्रातून समाजाप्रती उदासीनताच जास्त दिसून येते. अमिताभ राजकारणात थोडासा येतो पण परत सिनेमाच्या च मागे आयुष्य व्यतीत करतो. दिलीपकुमार, लता मंगेशकर, सारखे प्रथितयश कलाकार देखील अभिनय, गायन, संगीत, इ. पलीकडे सामाजिक विचार करताना दिसत नाहीत, हि शोकांतिकाच आहे!

सचिन तेंडूलकर ह्या महान खेळाडूने इथे बदल घडवून आणावा अशी अपेक्षा आहे. कदाचित हे परिवर्तन त्याच्याच हस्ते घडून येण्याचे विधिलिखित असावे!

जर सचिन ने सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात भरीव कार्य करायचे ठरवले तर त्यात तो यशस्वी होणार ह्या कुणालाही शंका नसावी. त्याचे कारण म्हणजे ह्या माणसाची निष्ठा, एकाग्रता आणि प्रचंड मेहनत कार्याची तयारी. त्यामुळेच तो क्रिकेट मध्ये देखील देवपण प्राप्त करू शकला.
कार्य-निष्ठा अशी कि तो रात्री झोपू शकत नाही कारण दुसर्या दिवशी फलंदाजी करायची असते!
निस्वार्थी वृत्ती अशी कि तो गांगुली ला किंवा धोनी ला कर्णधारपद देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली खेळतो!

तो राज्यसभेचा खासदार आहेच, त्याने लोकसभेची निवडणूक लढवावी, राजकारणात झोकून द्यावे. त्या क्षेत्रात आपला प्रभाव पडावा. परिवर्तन घडवावे. त्याद्वारे सामाजिक ऋण फेडावे! असे माझे मत आहे.

इथेही स्पर्धा असेल. इथे स्लेजिंग होईल. चेंडू कुरतडल्याचे खोटेनाटे आरोप होतील. अझर-मोंगिया पाय ओढतील. कुणीतरी सायमंड जातीयवादाचे वितंड घालतील. एखादा जयवंत लेले आधीच पनौती लावेल! पण सचिन ह्या सर्वाना पुरून उरेल, हे नक्की!