Wednesday, 30 July 2014

धनगर आरक्षण आणि भाजप

आमचे सरकार आले तर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देऊ असे आश्वासन भाजपच्या अभ्यासू अध्यक्षांनी बारामती मध्ये दिले आणि धनगर समाजाने उपोषण सोडले.

खरतर अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा हा केंद्रसरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. आणि केंद्रात मोदिसरकार असल्याने फडणविसानी धनगर आरक्षणासाठी दिल्लीत पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवणे शक्य आहे. पण हे महायुतीच्या पाठी भरकटत गेलेल्या धनगर नेत्यांना कसे कळणार?

आंदोलन पुढे चालूच राहील असे ते म्हणताहेत पण एका राज्यव्यापी उपोषणाची इतिश्री हि तशी शून्यातच झाली. मी आधीच म्हटल्याप्रमाणे ह्या धनगर आंदोलनाचे निव्वळ राजकारण केले गेले आणि त्याची सर्व जबाबदारी धनगर समाजाचे महायुतीतील नेत्यांवर पडते. बारामतीमध्ये उपोषण करण्याचा निर्णयच मुळात राजकारणाने प्रेरित होता. हे उपोषण राजधानीमध्ये व्हायला हवे होते आणि मोर्चा मंत्रालयावर निघायला हवा होता, बारामतीत नव्हे! केवळ वैयक्तिक आणि राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी हे आंदोलन वापरले गेले. येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याच्या स्वार्थी राजकाणापाई धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली गेली असेच दिसते. 

राज्यसरकारला ह्या आंदोलनाच्या आणि उपोषणाच्या मार्गाने कोंडीत पकडून आपली मागणी मान्य करून घेण्याचे मुळ तत्व बाजूलाच राहिले! तसंही धनगर आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवणेच महायुतीच्या दृष्टीने सोयीचे आहे. 

एकंदरीत धनगर आरक्षणाच्या जनआंदोलनाचा क्षुद्र राजकारणात खेळखंडोबा झाला, एवढेच.

Monday, 28 July 2014

श्रावणमासी...

श्रावणमासी हर्ष मानसी, पाऊसपाणी चोहीकडे
दिवसा संततधार कोसळे, मुसळधार रात्रीहि पडे!

(सौजन्य (आणि क्षमस्व) - बालकवी)

Saturday, 26 July 2014

भारतातील विविध आगरी जमातींचे परस्परसंबंध आणि त्यांचे आरक्षणातील स्थान

भारतातील विविध आगरी जमातींचे परस्परसंबंध आणि त्यांचे आरक्षणातील स्थान

१. पश्चिम भारत :

महाराष्ट्रात प्रमुख्याने ठाणे, मुंबई, नाशिक  आणि रायगड अश्या किनारपट्टीच्या प्रदेशात
आगरी समाजाचे वास्तव्य असून त्यांना आगळे, खारपाटील, मिठागरि, पाथरवट असेही म्हटले जाते.
आगरी समाज हा प्रमुख्याने मीठ उत्पादक तसेच शेतीप्रधानहि आहे. ह्या जमातीत स्त्री-पुरुष समानता असून हुंड्याची पद्धती नसल्याचा मातृसत्ताक इतिहास आहे. 

असुरराज रावणाचे संगीत-वादक अशीही त्यांची ओळख असल्याची आख्यायिका आहे. अगस्ती ऋषीचे  दोन पुत्र आगळा आणि मंगळा ह्यांच्यापासून आगळे (आगरी) आणि मांगेले (कोळी) समाज निर्माण झाल्याचीही एक वदंता आहे. मुंगीपैठणच्या बिंब राजाविषयी अशीच आख्यायिका प्रसिद्ध अहे. 

गुजरातमधील कच्छ मध्ये 'आगरीया' जमात हि मीठ उत्पादक आहे. आजही तेथील 'आगरीया' जमात पारंपारिक मिठागारांचा व्यवसाय करीत आहे. भूज आणि मांडवी इत्यादी प्रदेशात 'आगरीया' जमात मुस्लिम धर्मीय असून आगरी समाजातून त्यांचे धर्मांतर झाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन मुस्लिम राज्यकर्त्यांनी स्रियांसाठी त्यांना कैदेत टाकले होते. परंतु पुढे सुफी संत मोइनुद्दिन चीस्तीचे नातू फिरसाद ह्यांनी त्यांची सुटका केली आणि त्या कृतज्ञेतून त्यांनी इस्लाम स्वीकारल्याची दंतकथा आहे. 

दादरा नगर हवेली इथेही आगरी समाज अस्तित्वात आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रातील आगरी समाजातील चालीरीतीमध्येहि साधर्म्य आढळते. 'आगरीया' जमातीचा संबंध 'आग्रा' शहराशीही जोडला जातो.

पश्चिम भारतातील आगरीया समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गामध्ये समाविष्ट केले आहे.

२. उत्तर-मध्य भारत:

'आगरीया' हि जमात मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेशातही आढळून येते. मिर्झापूर परिसरातील 'आगरीया' जमात खाणकाम आणि लोहारकामासाठी प्रसिद्ध आहे. गुजरात आणि महराष्ट्रातील मीठ उत्पादक आगरी जमातीशी ह्या आगरीया समाजाचे सामाजैतिहासिक संबंध तपासून पाहता येतील.

उत्तर-मध्य भारतातील आगरीया समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (ST) समाविष्ट केले आहे.

तसेच राजस्थान, दिल्ली इथेही आगरी समाज अस्तित्वात असल्याचे दिसते. 
 
३. पूर्व भारत:

'आगरीया' हि जमात पश्चिम बंगाल आणि झारखंड मध्ये 'असुर' नावाने प्रसिद्ध आहे. असुर समाज जगातील एक प्राचीन धातुविद्याप्रविण समुदाय आहे.

हि जमात प्राचीन असुर समाजाशी संबंधित आहे. महिषासुर हे ह्या जमातीचे आराध्य असून दुर्गापूजेच्या काळात ते शोक व्यक्त करतात.  देव-देवतानि महिषासुराच्या सामर्थ्याच्या दहशतीने कारस्थान करून एका स्त्रीच्या (दुर्गेच्या) हातून त्याला कपटाने मारले अशी वदंता आहे. आगरी समाजातील स्त्री-दाक्षिण्याचा इथेही प्रत्यय येतो.

पूर्व भारतातील आगरीया-असुर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (ST) समाविष्ट केले आहे.

४. दक्षिण भारत :

ओरिसामध्ये आगरीया-असुर जमातीला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गामध्ये समाविष्ट केले आहे. दक्षिण भारतातील राज्यांतील द्रविडीयन संस्कृतीमधील आगरी समाजाचे काय स्थान आहे ह्याबाबत अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

वरील माहितीच्या विश्लेषणातून असे दिसून येते कि आगरी/आगरिया/असुर समाज हि भारतातील आदिम जमात असून प्राचीन कालखंडापासून ते आजवर विविध सामाजैतिहासिक स्थित्यंतरातून आणि भौगोलिक विस्थापानातून हि जमात संपूर्ण भारतभर पसरली असावी. धातुशास्त्रातील,लोहउद्योगातील प्राविण्यापासून ते मीठ-शेती-मासेमारी अशा विविधांगी कौशल्यातून उपलब्ध परिस्थितीनुसार आगरी समाजाने मानवी जीवन-इतिहास-संस्कृतीत आपले योगदान दिले आहे.

अनुसूचित जमातीचे सर्व आयाम-नियमांमध्ये नैसर्गिकरीत्या अंतर्भूत असूनही काही प्रदेशात (गुजरात, महाराष्ट्र, ओरिसा) आगरी समाजाला अजूनही अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला नाही हे वास्तव आहे. ह्या आदिम, मागास, आगरी समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात ढकलणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे ह्याचा विचार सरकारने आणि आरक्षणाच्या अभ्यासकांनी करायला हवा!

राकेश पाटील.


प्रसिद्ध लेखक आणि संशोधक संजय सोनवणी ह्यांचा आगरी-कोळी समाजाचा इतिहास ह्या ब्लॉगवर वाचा: मीठाच्या इतिहासात लपलाय आगरी समाजाचा इतिहास!