Monday, 7 October 2013

नवा 'इझम' जन्माला येणे क्रमप्राप्त आहे



धर्म हि संकल्पना जशी कालबाह्य झाल्याचे दिसून येते, तीच गत सध्या काही सामाजिक आणि राजकीय विचारधारांची झालेली दिसते. अर्वाचीन  भारताचा इतिहास पाहता गांधीझम, सावरकरीझम आणि आंबेडकरीझम  असे तीन विचारप्रवाह सामान्यपणे देशात दिसून येतात.

१. गांधीझम च्या  तिरंगा चा मक्ता सेकुलर राजकारण करणाऱ्या काँग्रेस आणि तत्सम तथाकथित सेकुलर वाद्यांनी घेतलाय.
२. सावरकरीझम चा भगवा झेंडा हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या संघ, भाजप ह्या राजकीय पक्षांनी तसेच विश्व हिंदू परिषद  इ. हिंदू धर्म संघटनानी खांद्यावर घेतला आहे.
३. आंबेडकरीझमचा निळा बावटा रिपब्लिकन, बसप, इ. राजकीय पक्षांनी आणि बौद्ध-नवबौद्ध समाजाने धारण केला आहे.

वरील तिन्ही विचारधारा मधील परस्परविरोधी ब्रिटीश काळापासून ते आजच्या स्वतंत्र भारत देशात सतत दिसून येतो. हा परस्परविरोध ब्रिटीश सरकारशी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात दिसून येतो तसेच ब्रिटीश सरकार शी वेळोवेळी होणार्या अनेक वाटाघाटी, कायदे मंडळे , इ. संदर्भात दिसून येतो.


ज्या काळात ह्या तिन्ही विचारधारा त्यांच्या निर्मात्यांनी मांडल्या त्या १०० वर्षापूर्वीच्या भारताचा विचार केल्यास तत्कालीन राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टीने विचार करूनच त्या विचार प्रणाल्या अस्तित्वात आल्या हे दिसून येते. त्यातून राष्ट्र-समाज-धर्म अशा विविध स्तरावर मानवी जीवन समृद्ध करण्याची सामान्य अपेक्षा असणारच.

इथे जिनाइझम च्या हिरव्या झेंड्याचा हि उल्लेख करावा लागेल ज्यांनी पाकिस्तान-मुस्लिम  ह्या राष्ट्र-धर्म वादासाठी कार्य केले परंतु स्वतंत्र भारताशी ह्या विचारधारेचा फारसा संबंध नसल्याने इथे त्याची चर्चा सयुक्तिक होणार नाही. तसेच सोशलीझम, कमुनिझम इ. मरणासन्न विचारधारा देखील चर्चेत नको.

असे दिसतेय कि ब्रिटीश काळातील ह्या तीन विचारधारा आजही तो  परस्परविरोध सोडत नाहीयेत. स्वातंत्र्य ,लोकशाही आणि राज्यघटनेची व्यवस्था देखील हा परस्परविरोध दूर करण्यात अयशस्वी झाली आहे. उलटपक्षी हा विरोध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे.

विविध धर्म आणि त्यांचे  देव-प्रेषित ह्यांच्या मधून जसा आजही विस्तव जात नाही तीच परिस्थिती ह्या विचारधारांची आहे. राजकीय स्वार्थ सोडल्यास ह्या विचारधारा परस्पर सौहार्द जपताना दिसत नाहीत. त्याची परिणीती त्यांच्या अनुयायी वर्गाची एकमेकाविषयी असलेली द्वेष-संशयी वृत्ती बळावून स्वातंत्र्य-समता-बंधुता ह्या मूळ तत्वांचा तिलांजली देण्यात होते.

गांधी वाद्यांना सावरकर चालत नाही. आंबेडकर पटत नाही. सेकुलर तिरंग्याला गांधी सोडून इतर जमत नाहीत. त्यांचा गांधी हा देव. इतर दोघे अनुच्चाराने लांबच ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती.

हिंदुत्व वाद्यांना गांधी-आंबेडकर अजूनही परके वाटतात. भगव्या झेंड्याचे अनुयायी ह्या दोघांना आजही शिवीगाळ करण्यातच धन्यता मानतात. त्यांच्यासाठी सावरकर मात्र देव. इतकेच नाही तर गोडसे देखील त्यांना देव म्हणून चालतो. पण गांधी-आंबेडकर मात्र त्याज्य!

आंबेडकर वाद्यांना गांधी अजिबात चालत नाही. सावरकरही नाही. निळ्या झेंड्याला आंबेडकर पलीकडे काही दिसत नाही. त्यांचा आंबेडकर हा देव. इतर दोघांना ठाम नकार!

खरे पाहता ह्या तिन्ही विचारधारा स्वतंत्र भारताचा ६५ वर्षाचा इतिहास पाहता त्यांच्या निर्मात्यांच्या नंतर पराभूतच  झाल्या आहेत. आणि त्यांचे अनुयायी किंवा समर्थक हेच त्याला कारणीभूत आहेत.

आपापले निर्माते महापुरुष 'देव' बनवून आणि त्या विचारधारेला 'धर्म' बनवून त्या संकल्पना कालबाह्य कशा होतील हेच आपण पाहत आलो.

परिवर्तनशीलता हा निसर्गाचा नियम आहे परंतु इथे बदल घडण्याची शक्यता च नाही. सारे काही जैसे थे. धर्म-देव जसे दोन-तीन हजार वर्षापूर्वीचे विचार-तत्वज्ञान पांघरून जुनाट बुरसटून राहिल्यात त्याचप्रमणे ह्या विचार प्रणाल्या देखील कालबाह्य होत आहेत. कारण देव आणि धर्म ह्यांना चिकित्सा आणि परिवर्तन सहसा मान्य होत नाही !

हे तिघेही निर्माते जर आज अस्तित्वात असते तर त्यांनी आजच्या राष्ट्र आणि समाज हिताच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून नवे विचार मांडून ह्या विचार धारा ची पुनर्रचना केली असती. अथवा जर अनावश्यक असतील तर बरखास्त देखील केल्या असत्या. उदा. गांधीजींची कॉंग्रेस बरखास्त करण्याची सूचना.

आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास ह्या तिन्ही विचारधारेच्या अनुयायाना परिवर्तनशील राहून नव्या कालानुरूप बदल घडवून ह्या विचारधारांचे आधुनिकीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अन्यथा व्यवहारी राजकारणाच्या दावणीला बांधून घेऊन त्यांचा अंत निश्चित आहे.
 
राजकारणाचा विचार केल्यास ह्या प्रमुख विचारधारांचा आजवरचा प्रवास हा निराशामय असल्याचे चित्र आहे अन्यथा आज सगळीकडे प्रादेशिक पक्षांचा सुळंसुळाट आणि आघाडी सरकारांचे चित्र दिसले नसते. तसेच समाजामध्ये गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि आंबेडकरी जनतेमध्ये अशी उभी फूट पडली नसती.  

ह्या विचारधारांशी बांधिलकी असणारे जे विद्वान बुद्धिमंत, विचारवंत आहेत त्यांनी ह्या विनाश घंटेची दखल घेऊन राष्ट्र आणि समाज हिताच्या व्यापक दृष्टीकोनातून योग्य पाऊले उचलणे काळाची गरज आहे कारण नवा 'इझम' जन्माला येणे क्रमप्राप्त आहे.

राकेश पाटील.

1 comment:

  1. नवा ' इझम ' म्हणा किंवा नव्या नेतृत्वाचा जन्म हि आता काळाची गरज बनली आहे. आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर स्व. बाळासाहेब हयात असतानाच त्यांचे विचार कालबाह्य समजून नवीन पिढी मोठ्या आशेने राज ठाकरेंच्या मागे निघून गेली. आता तेथून ती कोणीकडे वळली हा वेगळाच मुद्दा आहे. आंबेडकरवाद्यांची तर काय फरफट चालूच आहे. भगवा आणि कमळ करीत आता ते हत्तीकडे निघाले आहेत. तेथून त्यांचा अखेरचा थांबा घड्याळ किंवा हात हेच आहे. यापलीकडे ते काय करणार ?
    देशव्यापी नेतृत्व पाहिले तर हिरवी ध्वजा अधून मधून आपले डोके वर काढते आणि लगेच गायब होते. कॉंग्रेसची हालत म्हणजे मेलेलं पण न कुजलेलं मढं अशीच झाली आहे. भाजपा देवालय आणि शौचालय यात अडकून पडली आहे. अशा वेळी नव्या नेतुत्वाच्या उदयाकडे डोळे लावून बसण्याचीच पाळी भारतीय जनतेवर आलेली आहे. अर्थात, हि देखील भारतीयांची संस्कृती आणि परंपरा आहेच म्हणा !

    ReplyDelete