Saturday, 6 September 2014

मास्तर मास्तर तीरकोंबडा...

आजच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात शिक्षणाचा परीघ ग्रामीण भागातही खोलवर विस्तारला असेल असे गृहीत धरूया. पण पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या ग्रामीण भागात शिक्षकदिनी काय घडत असेल त्याची कल्पना करा.

चौथीपर्यंत गावात शाळा. तिथेच अर्ध्याअधिक जणांचे शिक्षण आटपे. दहावीपर्यंत शाळा पुढच्या गावात. हे विद्यार्थी म्हणजे छानपैकी दाढीमिशा असलेले तरणेबांड तरुण असत. तिथे जाऊन दहावीपर्यंत पोहोचणारे अगदी मुठभर. एसेस्सी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जवळजवळ शून्यच! रेल्वे, टेलिफोन, शिक्षण, इ. क्षेत्रात तरीही काही लोक चिकटून जात. शैक्षणिक पात्रता हा मुद्दा तेव्हा गौण होता.

थोडीफार मोसमी शेतमजुरी, खाडीतील मासेमारी, शेळ्या-गाई-म्हशीपालन, मासेमारीच्या बोटीवरील नोकऱ्या, वीटभट्टीचा रोजगार, मिठागारावरील कामे, इ. पोटापाण्याची कामे गावात चालत. तरीही गावात रिकामटेकड्या उसाट तरुणांची कमी नसे. गावातील दोनेक घरात चोविस्तास पत्त्यांचा डाव मांडून हि मंडळी बारमाही पडीक असत.

गावाच्या शाळेतील मास्तर ह्या लोकांचा फार जिव्हाळ्याचा विषय असे. त्यावेळी मास्तर बहुधा सातवी पास असे. त्यातच काही मास्तर म्हणजे नमुने असत. असे नमुने हाती लागले कि मग गावातील मंडळी त्यांना सोडत नसत.

असेच एक मास्तर गावातील शाळेत येउन-जाऊन असत. बाटलीचा नाद असल्याने सदासर्वदा झिंगलेले मास्तर गावातील मंडळीसाठी खास आकर्षण होते. शाळेतील मुलेही मास्तरांना ओळखून होती. त्यात मास्तर फार मारकुंडे. कान उपटून निघेपर्यंत कानाला पकडत. छडीचा सर्रास वापर करीत. त्यांच्या हाताखालून गेलेली, बाजूच्या गावात हायस्कूलला जाणारी मुलेसुद्धा मास्तरांवर विशेष लक्ष ठेवून असत.
तर, दुपारच्या शाळेसाठी मास्तर गावात शिरले कि एक आरोळी कुठूनतरी घुमत असे...

"मास्तर मास्तर तीरकोंबडा
पोरं पळाली घे 'x x डा' !"

मास्तर संतापून चरफडून धाव घेई. कोण बोलला त्यापाठी धावत सुटे. अर्थात कुणीही कधीही हाती लागत नसे. त्रेधातिरपीट होऊन शिव्याशाप देत मास्तर निघून जात. जाता-येता हा एपिसोड न चुकता घडे...
आज नव्या मास्तरांची शाळा भारत असेल... भले कुणी आधुनिक मास्तर टीव्हीवरून शिकवीत असेल... पण गावातील ती हुश्शार मंडळी आजही मास्तरांचा तसाच सत्कार करीत असेल काय? आणि जर ती आरोळी घुमली तर तो मास्तर तरी काय करणार?

"मास्तर मास्तर तीरकोंबडा
पोरं पळाली घे 'x x डा' !"

No comments:

Post a Comment