Friday, 31 January 2014

राहुल गांधीची मुलाखत: एक आशेचा किरण

31/01/2014 (फेसबुक पोस्ट)


राहुल गांधीची मुलाखत वाचून जे समजते त्यापेक्षा जास्त राहुल ती मुलाखत पाहिल्यावर समजतो.एक तरुण आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून त्याची ओळख होतेच, परंतु हा माणूस वाटतो तितका बच्चा नाही हेही लक्षात येते. महत्वाची गोष्ट हि आहे कि तो वेगळा विचार करणारा आणि पारंपारिक राजकरणाला फाटा देऊन परिवर्तनवादी भूमिका घेणारा तरुण तरुण आहे. मोदी, गुजरात दंगल, इ. विषयापेक्षा देशातील राजकारण, सिस्टीम, महिला-युवा सबलीकरण, राजकीय व्यवस्थेचे पारदर्शीकरण, उत्पादन -निर्माण क्षेत्रातील प्रचंड क्षमता, इ. मुलभुत मुद्दे तो मांडतो.

दुर्दैवाने अर्नब गोस्वामी असो कि सध्याची धंदेवाईक पत्रकारिता, नव्हे आपल्या सर्वांची एकुणातील मानसिकता सवंग राजकारणामध्ये इतकी बरबटलेली आहे कि आपल्याला मुलभुत विषयावर चर्चा नकोय! TRP वाढविण्याच्या खेळापायी पत्रकार, मिडिया आणि आपणदेखील टाळ्या-घोषणा खेचणारे सवंग मुद्द्यांचे चर्वण करण्यातच धन्यता मानतो हे दुर्दैव आहे. ह्या मानसिकते बाहेर येण्याचे धैर्य राहुल गांधीने ह्या मुलाखतीत दाखविले त्याबद्दल त्यांचे स्वागत करायला हवे.

१० वर्षाच्या अनुभवातून देशाचे मुलभूत राजकारण राहुल गांधी शिकला आहे आणि ते तो मांडत आहे. प्रस्थापित व्यवस्थेची झोप उडवणारी हि मुलाखत आहे हे राजकीय, मिडिया आणि जनता ह्या सर्वांनी समजून घ्यायला हवे. राहुल गांधी ने नवा विचार मांडायचे धैर्य दाखविले हे स्वागतार्ह आहे. किमान आजवरचे सवंग मुद्दे , निर्ढावलेले राजकारण न मांडता  हा माणूस जे व्यवहार्य मुद्दे आहेत ते सातत्याने मांडतोय. प्रस्थापित व्यवस्था त्याला हे परिवर्तन करू देत नाही हे मुलाखतीमध्ये दिसते.

अर्णब गोस्वामी ह्या प्रस्थापित व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करताना दिसतो तर राहुल गांधी परिवर्तनवादी भूमिकेत दिसतो. हे चित्र नक्कीच देशाच्या पुढील राजकारणाच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे, नव्हे भारताचे भविष्य सुरक्षित हातात आहे असेच मी समजतो.

त्या मुलाखतीवर अवास्तव टीका झाली आणि मिडियामध्ये तसेच सर्व पत्रकार स्तरातून ज्या ओंगळवाण्या टीकेचे लक्ष राहुलला केले गेले त्याचे मुलभुत कारण हे आहे कि राहुल ने मोदी, दंगली, भ्रष्टाचार अशा सवंग मुद्द्यांवर बोलण्याचे टाळले! तो परिवर्तनवादी भूमिकेतून मुलभुत मुद्दे मांडत होता त्याची चर्चा अर्णब गोस्वामीला नको होती तसेच पत्रकार-विश्लेषक-विचारवंत ह्यांना देखील ती भूमिका पटली नाही, ह्याचा अर्थ काय? प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला (मिडीयासाहित) परिवर्तन कसे पटणार? १० वर्षापूर्वी राहुल नवा असेल, त्याची सुरुवात घराणे शाहीतून झाली हे मुद्दे ह्या मुलाखतीने बाद झाले आहेत. नव्या दमाचे, विचाराचे तरुण नेतृत्व राहुल गांधीच्या रूपाने सज्ज झाले आहे. हे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

No comments:

Post a Comment