Monday, 31 March 2014

गुढीपाडवा: सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीचा विजयोत्सव


 आज गुढीपाडवा. शालिवाहन (सातवाहन) शके १९३६ प्रारंभ.

सातवाहन घराण्यातील तेविसावा राजा गौतमीपुत्र सातकर्णी ह्याने इ.स. ७८ मध्ये शक क्षत्रप नहपान ह्याचा निर्णायक पराभव करून सातवाहन साम्राज्याला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले. त्या महान विजयाचा विजयोत्सव म्हणजेच गुढीपाडवा. ह्या विजायोत्सवानिमित्त गौतामिपुत्राने शालिवाहन शक सुरु केला.

ह्या सातवाहन घराण्याचे साम्राज्य आपल्या महाराष्ट्राच्या मायभूमीतून निर्माण झाले होते. तसेच आंध्र आणि कर्नाटक प्रांतावारही सातवाहनांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांची राजधानी प्रतिष्ठान (आजचे पैठण) इथे होती. इ.स.पूर्व २३० ते इ.स. २२० अशी ४५० वर्षे इतका प्रदीर्घ काळ वैभवशाली सातवाहन साम्राज्य देशभर विस्तारले होते. परंतु शक, यवन आक्रमक सातवाहन साम्राज्यास आव्हान देत असताना गौतमीपुत्र सातकर्णी ह्या पराक्रमी राजाने परकीय आक्रमकांना पराभूत करून सातवाहन साम्राज्यास पुन्हा वैभव प्राप्त करून दिले.

त्रिसमुद्रतोयपितवाहन (ज्याच्या सैन्याचे घोडे तिन्ही समुद्रांचे पाणी प्याले आहेत) आणि शकयवनपल्लवनिसुदन (शक, पल्लव आणि यवन ह्यांचा नयनाट करणारा) अशा पदव्यांनी गौतमी पुत्राला गौरविण्यात आले आहे.

सातवाहन सम्राट हाल ह्याने गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृतातील (आद्य मराठी) काव्यग्रंथ लिहिला. मराठी भाषेतील साहित्य रचना २००० वर्षापूर्वी पासून अस्तित्वात असून मराठी भाषेचे अभिजातत्व सिद्ध करण्याचे कार्य हालाची 'गाथा सत्तसई' हि साहित्यकृती करीत आहे.

अर्थातच गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा दिवस म्हणून आजही २००० वर्षानंतर महाराष्ट्रातच साजरा केला जातो.

मराठी बहुजन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीचा विजय असो!
सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

Thursday, 20 March 2014

हिंदू दहशतवादाचे समूळ उच्चाटन कधी होणार?

स्वातंत्र्योत्तर भारतात तीन अत्यंत महत्वपूर्ण अशा राष्ट्रीय नेत्यांच्या हत्या घडल्या.
१. महात्मा गांधी २. इंदिरा गांधी ३. राजीव गांधी

इंदिरा गांधींची हत्या १९८४मधे शीख समाजातील दहशतवादी संघटनेकडून झाली. स्वतंत्र खलीस्तानच्या आंदोलनातून शीख समाजामध्ये काही दहशतवादी संघटना उदयास आल्या होत्या. ऑपरेशन ब्लू-स्टार च्या निमित्ताने भारतीय सैन्याने केलेल्या सशस्त्र कारवाई च्या प्रतिक्रिया स्वरूप इंदिरा गांधींची हत्या केली गेली. परिणाम असा झाला कि पुढील २-४ वर्षात खलिस्तानची मागणी आणि शीख दहशतवाद दोन्हीचे उच्चाटन झाल्याचे दिसून येते.

राजीव गांधींची हत्या तमिळ अतिरेकी संघटनेकडून १९९१ मध्ये करण्यात आली. स्वतंत्र तमिळ राष्ट्राच्या मागणीसाठी श्रीलंकेत सशस्त्र आंदोलन करणाऱ्या ह्या संघटनेला राजीव गांधीच्या श्रीलंकेत  शांतीसेना पाठविण्याचा निर्णय खटकला होता. पुढील काही वर्षात श्रीलंकेतून तमिळ अतिरेकी आणि  LTTE चे उच्चाटन झाल्याचे दिसून येते.

महात्मा गांधींची हत्या देखील १९४८ साली अशाच एका दहशतवादी घटनेतून झाली. गांधीहत्या हि स्वतंत्र भारतातील पहिली दहशतवादी घटना. अखंड हिंदुस्तान, हिंदू राष्ट्रवाद, मुस्लिमविरोधी कट्टरता वाद इ. हिंस्त्र विचारसरणिवर आधारित हिंदू दहशतवादी संघटनांकडून महात्मा गांधी ची हत्या घडवून आणली गेली.

गांधी हत्येमधील आरोपी नथुराम गोडसे ह्याला फाशी झाली परंतु वीर सावरकर पुराव्या अभावी सुटले. ह्या हत्येमागे सावरकरांचा ब्रेन असल्याचा संशय होता. त्यांची हिंदू महासभा हि नामधारी हिंदुत्ववादी संघटना नंतर नामशेष झाली. रा.स्व.संघालाहि दहशतवादी संघटना घोषित करून त्याच्यावर बंदी देखील घातली होती. नंतर ती उठवली गेली.  आजचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप (पुर्वश्रमीचा जनसंघ) हा देखील ह्या संघाचीच निर्मिती आहे. रथयात्रा, राम मंदिर, बाबरी विध्वंस, गुजरात दंगली, बॉम्बस्फोट आणि आता मोदी इ. मार्गाने त्यांचा छुपा हिंदू दहशतवाद सातत्याने आजही कार्यरत आहे. बजरंगदल, सनातन इ. धर्मांध पिलावळी आजही कार्यरत आहेत.

ह्या हिंदू दहशतवादाला धर्मनिरपेक्षता, लोकशाही, राज्यघटना, तिरंगा इ. भारतीय राष्ट्रवादाचे वावडे आहे. त्यांचा स्वत:चा सोयीस्कर असा हिंदू राष्ट्रवाद आहे. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असेही त्यांचे स्वयंघोषित राष्ट्रीयत्व आहे. जयतु हिंदू राष्ट्रम नावाचे तथाकथित ब्रीदवाक्यहि आहे. ह्या भगव्या दहशतवादाला   धर्मनिरपेक्षता किंवा सेकुलर ह्या शब्दांचाही भयंकर तीटकारां आहे असेही दिसून येते.

इंदिरा आणि राजीव हत्येच्या नंतर ज्या वेगाने शीख आणि तमिळ दहशतवाद नष्ट झाला ते पाहता गांधीहत्येनंतरहि हिंदू दहशतवादाचे मात्र अजूनही उच्चाटन झाल्याचे दिसत नाही. विविध मार्गांनी आणि विविध पातळ्यांवर हा दहशतवाद आजही डोके वर काढताना दिसतो. त्याचे समूळ उच्चाटन कधी होणार?

Tuesday, 18 March 2014

शाहूची सुटका : मुघलांचे दूरदर्शी, मुत्सद्दी आणि यशस्वी राजकारण

औरंगजेबाच्या धूर्त आणि मुरब्बी राजकारणाचा अंत झाल्यानंतर मराठेशाहीला आसेतुहिमाचल काही विशेष आव्हान उरले नव्हते हे पुढील काळात मुघलांच्या ढासळत गेलेल्या साम्राज्यावरून सिद्ध होते.

मराठेशाहीने औरंगजेबाशी संभाजी आणि राजाराम ह्यांच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ २० वर्षांच्या धामधुमीच्या काळात आपले अस्तित्व जिवंत ठेवण्यात यश मिळविले होते. त्यानंतर मात्र ताराबाईने आपल्या तडफदार नेतृत्वाने औरंगझेबाला त्याच्याच मुघल साम्राज्यात चढाई करून खडे चारले. औरंगझेबाच्या मृत्यूने मुघल पराभूत होऊन महाराष्ट्रातून परतले. इथून पुढे ताराबाईच्या महत्वाकांक्षेला अक्क्ख्या देशाचे रान मोकळे मिळाले होते.

मात्र इथेच घडले एक विलक्षण राजकारण. शाहूची सुटका!

मुघलांच्या ह्या मुत्सद्दी राजकिय खेळीने मराठेशाही पुरती दुभंगली, नेस्तनाबूत झाली. मुघलांच्या पडझडीच्या काळातही मराठे देशामध्ये आपले अस्तित्व टिकवण्याच्या पलीकडे निर्णायक भूमिका कधीही घेऊ शकले नाहीत. मुघल सत्तेच्या म्हणजेच दिल्लीच्या बादशहाच्या
मांडलिकत्वच्या मानसिकते मध्येच मराठे पुढील अत्यंत अनुकूल काळात सातत्याने वावरत असल्याचे दिसते.

मोगलांच्या उतरत्या काळातही एकमेव आव्हान किंवा प्रतिस्पर्धी असलेली मराठेशाही प्रभावहीन झाली होती. त्यामुळे शाहू, सातारा, कोल्हापूर, पुणे, पेशवे, शिंदे, होळकर इ. मराठी नेतृत्व शिवरायांचा स्वराज्यवादी विजीगिषु मराठी बाणा विसरून गेले. शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा सिद्धांत त्या मांडलिकत्वच्या मानसिकतेने बाद झाला होता असे दिसते.

शाहू-ताराबाई संघर्ष, सातारा-कोल्हापूर संघर्ष, पेशवे-छत्रपती संघर्ष, पानिपत, शिंदे-होळकर संघर्ष आणि पुढे ब्रिटिशांचे मांडलिकत्व ह्या दुष्टचक्रात मराठेशाही सातत्याने गुंतून राहिली. मराठेशाही देशाला निर्णायक नेतृत्व देऊन शकली नाही.

ह्यांचे मुलभुत कारण म्हणजे मुघलांचे शाहूची सुटका करण्याचे दूरदर्शी, मुत्सद्दी आणि यशस्वी राजकारण. मुघलांच्या त्या राजकारणाचे योग्य ते मूल्यमापन आपण स्वकीय, स्वधर्मीय अस्मितेच्या मोहाने करत नाहीत , एवढेच.


 शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या सिद्धांताची प्रेरणा आणि त्याची ताकद मराठ्यांना औरंगजेबासारख्या तत्कालीन जगातील सर्वश्रेष्ठ अशा महाबलाढ्य बादशाहाला २५ वर्षाचा प्रदीर्घ आणि अत्यंत प्रतिकूल काळातील लढा देण्यास सतत प्रवृत्त करीत होती. राजा असो कि नसो, सैन्य-सामुग्री असो कि नसो; मराठ्यांना स्वराज्याची स्फूर्ती सातत्याने त्या सिद्धांतातून मिळत होती.

परंतु शाहुच्या सुटकेमुळे हे समीकरण बदलून गेले. मुघलांचे मांडलिकत्व पत्करलेला आणि तरीही गादीचा वारस असलेला शाहू परतल्याने मराठेशाहीमध्ये प्रचंड उलथापालथ झाली. ताराबाईचे महत्व कमी होणे साहजिकच होते परंतु त्याहीपेक्षा महत्वपूर्ण होते ते मराठ्यांचे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारणे.

पुढील काळात मराठेशाही मध्ये अंदागोंदी माजून आपसातील संघर्षामध्ये मराठे मागे पडल्याचेच दिसते. निजाम फोफावण्यास कारणीभूत ठरला तो हाच कालखंड. दख्खनेतील सुभेदार, उत्तरेतील सुभेदार, पूर्वेतील नवाब, कलकत्त्यातील ब्रिटीश आणि इतर सत्ताकेंद्रे मुघलांच्या वर्चस्वातून स्वतंत्र सत्ताकेंद्रे स्थापित होत असताना २५ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यात मुघलांचा निर्णायक पराभव करणारी मराठेशाही मात्र ह्या अनुकूल परिस्थितीचा फारसा फायदा उठवू शकली नाही. उलटपक्षी ह्या काळात अंतर्गत संघर्षात मराठेशाही विस्कळीत होत गेली आणि इतर सत्ताकेंद्रांच्या स्पर्धे पुरते अस्तित्व तिचे राहिले.

शाहुच्या सुटके ने दोन महत्वपूर्ण गोष्टी घडल्या:
१. मराठ्यांची आक्रमकता ताराबाई-शाहू अशा अंतर्गत संघर्षात वाया गेली. मुघलांशी २५ वर्षे दिलेल्या यशस्वी लढ्याची परिणीती अंतर्गत कलहात होऊन मराठ्यांचा मुघलसंघर्ष मागे पडला.
२. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या सिद्धांताला शाहुच्या मुघल-मंडलीकात्वाने छेद दिला. त्याचा परिणाम म्हणजे पुढील काळात मराठे दिल्लीच्या बादशहाच्या अंकित असलेली दुय्यम भूमिका देश पातळीवर वठवीत राहिले.

शिवरायांचा हिंदवी स्वराज्याचा सिद्धांत मराठे उत्तरोत्तर पुरते विसरून गेल्याचे दिसून येते.

Friday, 14 March 2014

काय चुकलं हो अरविंद केजरीवालचं ?

काय चुकलं हो अरविंद केजरीवालचं ?

मिडीयाने गेल्या काही दिवसात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे गुण उधळले आहेत त्याची पोल-खोल आधीच झाली आहे. सर्वेक्षणांच्या नावाखाली जो काही मोदींचा छुपा प्रचार साऱ्या मिडीयावर महिनो-न-महिने चालू आहे हे तर ओपन सिक्रेट आहे. मिडीयामध्ये काय लफडी चालतात ती केजरीवाल च्या शिवाय अजून कोणाला माहिती असेल? अर्धी आम आदमी पार्टी पत्रकारांनी भरलेली आहे.

पेड न्यूज चा प्रकार तर सर्रास चालतो! त्याच पेड न्यूज वाल्या मीडियाची रवानगी आपण सत्तेवर आलो तर तुरुंगात केलि जाईल ह्यात धमकी कसली दिली? हा तर न्याय आहे!

राजकीय नेते तुरुंगात गेले, प्रशसकीय अधिकारी गेले, न्याय मुर्तीही गेले! हे लोकशाहीचे ३ स्तंभ जर शिक्षेला पात्र असतील तर तो चौथा स्तंभ म्हणजे मिडिया का तुरुंगात जाणार नाही?

केजरीवालच्या मुखातून भारतीय लोकशाही आणि राज्य-घटनाच हे बोलतेय असे दिसून येते.

युपी-बिहारचे मतदार त्या 'पोपटाचा' जो काही निकाल लावायचा तो लावतीलच!

निवडणुकीचा रागरंग :

१. कोंग्रेसेतर तिसर्या आघाडीची लगीनघाई आणि मांडवातल्या मारामार्याहि नेहमीच्याच आहेत.
२. अलीकडे सेन्सेक्स वाढणे हे नवे अंतरिम बजेट, निवडणूकीच्या निमित्ताने जाहीर केलेल्या लोकप्रिय योजना आणि एकंदरीत उत्साहवर्धक वातावरण ह्यांचा परिणाम हि असू शकेल.
३. अमेरिकेने विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करणे हे काही आपल्याला नवे नाही. सोनिया गांधी, अडवाणी ह्यानाही कधीकाळी तो बहुमान मिळाला होता.
४. भांडवलशाही मोदीच्या मागे उभी आहे हे मात्र वास्तव आहे.
आणि म्हणूनच त्यांची लोकप्रियता जी भांडवलशाही मिडीयाने फुगविली आहे ती आपण पाहतो.
महाराष्ट्रात कोन्ग्रेस-राष्ट्रवादीला आजही १२ आणि महायुतीला ३३ जागा देणाऱ्या सर्व्हेच्या बद्दल तर आता न बोललेलेच बरे, अशी परिस्थिती आहे.
५. भाजप, संघ, मित्रपक्ष आणि त्यांचे नेते ह्यांच्या अलीकडील सुंदोपसुंदी, लंगडी-खोखो, लपाछपी, इ. खेळ-खंडोबा लक्षात घेता 'अंदरकी बात' काय आहे तेही स्पष्ट झाले आहे.
६. हि लढत भासवली जाते तशी एकतर्फी नक्कीच नाही. हिंदुस्तानांत टक्कर अपेक्षित आहे, दक्खन मात्र साधारणता: काँग्रेस आघाडीशी एकनिष्ठ राहते.
७. बिहार-युपी मध्ये ७० जागा मिळविण्याची शक्यता किती आहे? लालू-कोन्ग्रेस बिहारमध्ये एकत्र आले आहेत. नितीश चे लोकप्रिय आणि प्रगतीशील सरकार आहेच. म्हणजेच बिहार एकतर्फी नाही.
८ युपी मध्ये ५० जागांचे स्वप्न पाहणारी भाजपचे आज फक्त १० खासदार आहेत. कॉंग्रेसचे २०, सपा चे ३५ आणि बसपचे २० अशी साधारण स्थिती आहे. सपा-बसपा मिळून किमान ४० जागा तरी घेतीलच. इथे 'भारी उलटफेर' ची शक्यता आहे का?
९. गोष्टीच्या पुस्तकातील राक्षसाचा जीव एखाद्या पोपटा मध्ये असतो तसा भाजपचा प्राण युपी-बिहार मध्ये त्यांनीच अडकवून ठेवला आहे. ह्याच उत्तरेतील जुगारावर मोदी खुर्चीचे दिवास्वप्न पाहत आहेत.
10. युपी-बिहारचे मतदार त्या 'पोपटाचा' जो काही निकाल लावायचा तो लावतीलच!

निखिल वागळेमधल्या मुत्सद्दी मुलाखतकाराला सलाम

विविध विषयावर आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती निखिल वागळे ज्या सहजतेने आणि सफाईदारपणे घेतात ते पाहता त्यांच्या मुलाखत घेण्याचे कौतुक वाटते हे नक्की. एखादी व्यक्तिरेखा उलगडून दाखविण्याची त्यांची शैली आणि 'त्यातलं पान न पान वाचण्याची' त्यांची हातोटी हि विलक्षणच.

केजरीवाल हा काही मोदी नाही कि करण थापरच्या अडचणीच्या प्रश्नांनी गांगरून पळून जाईल. तसेच तो राहुल गांधीही नव्हे कि जो अर्णब गोस्वामीच्या आक्रमकतेसमोर कमी पडेल. केजरीवाल मुलाखतीत स्वत:चा वरचष्मा कसा ठेवतो ते राजदीप सरदेसाई च्या मुलाखतीत दिसले होते.

निखिल वाग
ळेनी त्याला डॉमीनेट केले असे काही दिसत नाही; उलट केजरीवाल ने त्याच्या नेहमीच्याच तत्परतेने आणि वाक्चातुर्याने त्ये मुलाखतीत स्वत:चाच अजेंडा राबविला असेच दिसते.
अगदी मोदीवर घणाघाती टीका करण्यापासून ते मीडियाची पोलखोल करण्या पर्यंत सर्वच मुद्दे त्याने हिरीरीने मांडले.

तीच मुलाखत इतर कुणी पत्रकाराने घेऊन दाखवावी, केजरीवाल समोरच्याला कच्चा खाऊन जाईल.
वागळेनि मुलाखत रंगविलीहि आणि आपल्याला हवे तेही शब्दहि केजरीवालच्या तोंडातून वदवून घेतले. निखिल वागळेचे कौशल्य हे म्हणावे लागेल कि त्या मुलाखतीत केजरीवाल समोर ते कुठेही निरुत्तर किंवा कमी पडले नाहीत.

मागे बाळासाहेबांची ऐतिहासिक ठरलेली मुलाखत वागळे नि घेतली होती त्याच दरम्यान इतरही काही पत्रकारांनी सेनाप्रमुखांची मुलाखत घेण्याचे ध्यैर्य दाखविले होते. परंतु वाघासमोर शेळपटून गेलेले ते पत्रकार मातोश्रीवर उगाच काहीबाही गुळमुळीत प्रश्नोत्तरे आटपून परतले होते. उलटपक्षी वैयक्तिक संबंध चागले नसूनही मातोश्रीवर जाऊन आणि अभयदान घेण्याचे चातुर्य दाखवून वागळे नि अशी काही मुलाखत घेतली कि त्या निवडणुकीचे चित्र बदलणारी ती ऐतहासिक घटना ठरली.

निखिल वागळेमधल्या त्या मुत्सद्दी मुलाखतकाराला सलामच.

Wednesday, 12 March 2014

गांधीहत्येचे विकृत समर्थन : शरद पोंक्षेचा धिक्कार

शरद पोंक्षे सारखे मूर्ख विकृत सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी भडक वक्तव्ये करून समाजात तणाव निर्माण करतात. त्यांचा धिक्कारच व्हायला हवा. विचारांचा विरोध विचारानेच व्हायला हवा इतके ज्याला कळत नाही त्या अडाणचोट माणसाकडून गांधीच्या हत्येचे समर्थन नाही तर आणखी काय ऐकायला मिळणार?
हा माणूस नथूरामच्या नाटकाच्या निमित्ताने जो त्या भूमिकेत शिरलाय तो अजून बाहेर पडायचे नाव घेत नाही. अशाने अभिनयातील करीयरची वाट लागेल ना रे, पोन्क्ष्या, कळत कस नाय तुला.

आणि असेच पोंक्षे सारखे विशिष्ठ मानसिकतेने ग्रासलेले बांधव गांधी हत्येला गांधी वध म्हणवून गोडसेचे लंगडे समर्थन करून उघडे पडताना दिसतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. अरे अजून किती खालच्या पातळीवर घसरणार तुम्ही?

  कुणीतरी सावरकर वाद्याने काहीबाही ट ला ट लावून फेसबुकवर टाकलं कि बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे त्यांच्या हिंदू कोड बिलात कोडकौतुक केले... झालं...मूर्खाच्या नंदनवनात राहणाऱ्या माकडांच्या हातात कोलीत भेटलं. अरे जरा विश्वासार्ह लिखाण तरी संदर्भासाठी द्या!

सोडा ते सावरकर-गोडसे...आणि स्वत:च्या भवितव्याचा विचार करा. काय शिकवताय तुम्ही तुमच्या पिढ्यांना? कोणते तत्वज्ञान देताय तुमच्या समाजाला? कुणाची फसवणूक करताय? स्वत:चीच ना रे!

हे तुमचे संस्कार...निघृण खून आणि भ्याड हल्ल्यांचे ?
हि तुमची संस्कृती... संत-महात्म्यांच्या हत्याकांडांची ?

बदला बाबानो...गांधीच सोडा, तो महात्माच होता, आहे आणि राहील. त्याला काही फरक पडत नाही. परंतु, तुम्हाला येणारा काळ क्षमा करणार नाही. सावध व्हा.

Monday, 3 March 2014

आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...



रथयात्रेची धामधूम आठवते
मंडलची होळी मस्तकात पेटते
भूतकाळातील वणवण मनात रणरणते
हेचि फळ काय मम तपाला, मन आक्रंदते
बाबरीचा धुरळा श्वासात घुसमटतो
आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...

अटलजींचे शब्द आठवतात
'राजधर्म' कानात घोंघावतो
पायातली वहाण पायातच बरी होती
सिंहासनि घुसवायला नको होती
आठवणींचा मळभ दाटतो
आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...


त्यांचे दोनाचे दोनशे कोणी केले
ते दिल्लीतख्त कुणी सर केले
त्यांना सत्तेची सूत्रे ही सोपविली
त्यांच्या राजधर्माची लाज वाचविलि
मागे वळूनी पाहता काळ गळ्यात आवंढतो
आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...

सेकुलरांच्या सत्तेने दमछाक केली
जीनांची थडगी मानगुटीवर बसली
दंगलजखमेच्या मलमाच्याही अभावी
अयोध्ये
ची पादुका दिल्लीत कशी शोभावी?
हिंदुत्वाचा झेंडा अडगळीतून आक्रोशतो
आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...