Wednesday, 2 December 2015

'भन्साळीचे दु:स्वप्न' ह्या जयराज साळगावकर ह्यांच्या लेखावरील प्रतिक्रिया



'भन्साळीचे दु:स्वप्न' हा जयराज साळगावकर ह्यांचा लेख रविवारच्या लोकरंग मध्ये प्रसीद्ध झाला आहे. त्यानिमित्ताने हा पत्रप्रपंच.

'पिंगा ग पोरी पिंगा' हे 'बाजीराव-मस्तानी' मधलं गाणं कोणत्याही हिंदी सिनेमाला साजेसं असं छानच आहे. एक नितांतसुंदर कलाकृती असंच त्या गाण्याचं वर्णन करावं लागेल. काशीबाईच्या भूमिकेतील प्रियांका चोप्रा आणि मस्तानीच्या रोलमध्ये दीपिका पदुकोन दोघींनी त्या गाण्याला योग्य तो न्याय दिलाय. हिंदी गाणं असूनही मराठी बाज टिकविण्यात दिग्दर्शक बऱ्यापैकी यशस्वी आहे. वेशभूषा कोस्चुम्स वगैरे देखील उत्तम. गाणं एका कौटुंबिक आणि मुख्यत: महिलांसाठी मर्यादित अशा प्रकारच्या कार्यक्रमातील आहे. व्यावसायिक हिंदी सिनेमा असल्याने सिनेम्याटीक लिबर्टी नृत्य-दिग्दर्शकाने घेतली असेल तर त्यात काही वावगं नाही. अगदी छानपैकी अंगभर नऊववारी वगैरे नेसून, सालंकृत मंगळसुत्रादि सौभाग्यलेणी आणि पारंपारिक अलंकाराभूषणे सजवून काशीबाईनि नृत्यकलानैपुण्य सादर केलं आहे. कुठेही ह्या गाण्याला 'आयटम सॉंग' चं सवंग स्वरूप नाही. उथळ, अश्लील अंगप्रदर्शन तर मुळीच नाही. नेहमीच्या पारंपारीकतेतून थोडा मोकळा श्वास घेवून एक मॉडर्न कलाकृती पेश केली आहे.

पण तरीही भन्साळीच्या 'बाजीराव-मस्तानी'वर वादंग माजला आहे आणि त्याचे उदाहरण म्हणजे साळगावकर ह्यांचा लेख. ते स्वत: बाजीरावाचे चरित्रकार असल्याने ह्या विषयातील त्यांची भूमिका गांभीर्याने घ्यायला हवी. मीडियामधील चर्चेत सुद्धा आपल्या भावनांशी खेळ वगैरे झाल्याने त्यांनी सदर प्रकरणात अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणतात, " ...काशीबाई आणि मस्तानी या एकत्र नांदल्याच नाहीत तर त्या एकत्र कशा नाचतील? ...पेशवा बाजीराव यांची पत्नी आणि मस्तानी ह्यांना पडद्यावर एकत्र नाचताना पाहून हसावे की रडावे ते कळत नाही. " आणि हाच सर्व विरोधक मंडळींचा मुद्दा आहे. पेशव्याची धर्मपत्नी काशीबाई त्या मस्तानीच्या बरोबर नाचते म्हणजे काय? तेही 'पिंगा ग बाई पिंगा' ह्या पारंपारिक कौटुंबिक कार्यक्रमच्या गाण्यावर नाचते ? इथे विशिष्ट समाजाच्या जातीय अस्मितेच्या वर्चस्ववादि भूमिकेतून हा वाद निर्माण झाल्याचे उघड आहे. "प्रस्तुत सिनेमातील गाणे ड्रीम सिक्वेन्स, स्वप्नवत किंवा सिनेमाच्या शेवटी ते एक गोड इफेक्ट म्हणून टाकले आहे, असा कोणत्याही प्रकारचा बचाव भन्साळी यांनी केला तरी तो मान्य होऊ शकत नाही." अशी टोकाची भूमिका साळगावकर ह्यांनी त्याचमुळे घेतली आहे.

अलीकडे एका चर्चेमध्ये "मस्तानी बाजीरावाच्या आयुष्यात फक्त १७ महिने होती." असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. बाजीराव पेशव्याचा जीवनकाल १८ ऑगस्ट १७०० ते २८ एप्रिल १७४० असा आहे. मस्तानीदेखील बाजीरावाच्या निधनानंतर लवकरच मृत्यू पावली. तिचा जीवनकाल १७०० ते १७४० असा आहे. बाजीरावाने छत्रसालच्या बाजूने बंगशचा पराभव केला तो १७२९ मध्ये. बाजीराव-मस्तानीचा विवाह तेव्हाच झाला असावा. त्यांचा मुलगा समशेर बहाद्दर ह्याचा जन्म १७३४चा. ह्यातून मस्तानी बाजीरावाच्या आयुष्यात फक्त १७ महिने होती हे गणित कसं सोडवायचं? कदाचित बाजीरावाच्या लष्करी मोहिमा-स्वाऱ्या ह्यांचा कालखंड वजा करून जर हे १७ महिने मस्तानीच्या वाट्याला उरत असतील! पण त्यातून इतिहासकारांना नक्की काय सिद्ध करायचंय? इतिहासात वैवाहिक सहजीवनाची गणितं अशी मांडायची असतात? दुसरं मस्तानी स्वत: छत्रसाल राजाची राजकन्या होती. तिची आई मुस्लिम असेल तरी मस्तानीदेखील बाजीराव पेशव्याची धर्मपत्नीच असल्याने तिचा इतिहास डावलण्याचे कारण काय?

"मी ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ हे बाजीरावाचे चरित्र लिहिताना मस्तानीबद्दल योग्य तो आदर बाळगून (असे पुस्तकात सुरुवातीला नमूद करून) तिचा उल्लेख टाळला आणि योद्धा बाजीरावाचे चरित्र लिहिले." असं साळगावकर म्हणतात. २० वर्षाच्या कारकिर्दीत ४१ लढाया जिंकणाऱ्या बाजीरावाच्या आयुष्यात सुमारे १०-१२ वर्षे आणि अखेरपर्यंत अविभाज्य अंग असलेल्या मस्तानीला वगळून बाजीराव पेशव्याचं चरित्र, इतिहास पूर्ण होतो? कि इतिहासाचा विपर्यास होतो? दुसरीकडे भन्साळीला "ऐतिहासिक सत्यापासून फार दूर जाऊन चित्रपटाची कथा रचण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. ऐतिहासिक वास्तव तर ते डावलू शकत नाहीत. त्यात वाट्टेल ते फेरफारही करू शकत नाहीत." असा सल्ला द्यायचे मात्र ते विसरले नाहीत.

एकीकडे "इतिहासातील घटनांवर कथा, कादंबरी, नाटय़ किंवा चित्रपट लिहिताना तर अधिक संशोधन करावे लागते." असं ते म्हणतात आणि तिथेच "भन्साळी यांनी ना. सं. इनामदारांच्या ‘राऊ’ या कादंबरीवरच चित्रपट बेतण्याची मूलभूत चूक केली आहे. कारण सहसा कथा-कादंबऱ्यांतून बाजीरावाचे चित्रण हे बाजीराव-मस्तानी प्रेमप्रकरणापुरतेच मर्यादित असते." अशी उफराटी मांडणीहि स्वत:च करतात! बरं, इनामदारांच्या 'राऊ' विषयी कुणी आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. कदाचित आमच्या अस्मितेच्या इतिहासात आमच्या व्यतिरिक्त इतर कुणीही लुडबुड करू नये असा अंतस्थ मतप्रवाह असावा कि काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. कारण "टॉलरन्सच्या नावाखाली काहीही सहन करीत राहिलो तर स्वाभिमानच काय, पण अस्तित्वसुद्धा गमवायची पाळी येईल!" असा इशाराही त्यांनी दिला आहे.

"त्या काळी दरबारातील नाचाची परंपरा ही एका समाजापुरती मर्यादित होती. राजघराण्यातील स्त्रिया तर निश्चितच नाचत नसत!" हे आणखी एक अजब तर्कट साळगावकरांनी मांडले आहे. खरंतर आपल्या महान संस्कृतीत अगदी प्राचीन रामायण-महाभारत काळापासूनच नृत्य-चित्र-गायन-वादन इत्यादी कलाप्रकारात राजघराण्यातील राजकन्या किंवा राजस्त्रिया पारंगत असल्याचे दाखले आहेत. पेशव्यांच्या कुलीन स्त्रियांना पेशवाईच्या काळातच नृत्यबंदी सुद्धा असेल तर तो एक वेगळाच मुद्दा!

शेवटी साळगावकर ह्यांनी मांडलेला सर्वात महत्वाचा मुद्दा हा कि, "मस्तानीला बाजीरावाच्या कुटुंबाने, अगदी त्याचे जिवलग बंधू चिमणाजी ह्यांनीसुद्धा अव्हेरले होते... चिमणाजींनी मस्तानीला अटक केली, ह्या धक्क्याने बाजीरावाने दूर रावेरला एकांतवासात जाऊन राहणे पसंत केले आणि नर्मदेच्या पुरात पजेपोटी उडी घेऊन जवळ जवळ आत्महत्याच केली. फुप्फुसात पाणी जाऊन त्यांना न्यूमोनिया झाला होता."

त्या काळातील पेशवाईतील धार्मिक-जातीय कट्टरता किती टोकाची असेल त्याचा आरसाच 'पिंगा'च्या निमित्ताने उघड झालेल्या ह्या जातीय अस्मितेने दाखविला आहे. स्वत: बाजीरावाने उद्वेगाने "मस्तानीपासून मुलगा झाला म्हणून काय झालं, त्याची मुंज झालीच पाहिजे!" असे उद्गार तेव्हा काढले होते! बाजीराव पेशव्यासारखा अजिंक्य योद्धा ह्या गृहकलहापुढे पुरता हरला, खचून गेला आणि ऐन चाळीशीत अकाली निवर्तला. मस्तानीचा घात करण्यासाठी अर्धांगिनी काशीबाई, बंधू चिमाजीअप्पा आणि सुपुत्र नानासाहेब ह्यांनी केलेली कटकारस्थाने देखील सर्वश्रुत आहेत. पेशव्याची धर्मपत्नी असूनही केवळ तीचं 'यावनी' असणे पेशवे खानदान आणि पुण्यातील कर्मठ वैदिकांच्या धर्मवेडेपणाच्या आड आल्यानेच बाजीराव-मस्तानीचा दुर्दैवी देहांत झाला हि वस्तुस्थिती साळगावकरांच्या वरील लिखाणातून स्पष्ट होते. संजय लीला भन्साळीने त्या दोघींच्या समूहनृत्यापेक्षा ह्या कळीच्या विषयाला चित्रपटात हात घातला असेल तर ते ह्या मंडळींच्या पचनी पडेल काय? आजही ह्या धर्मवेडेपणाच्या अस्मिता किती टोकदार आहेत ते लक्षात घेता साळगावकर म्हणतात त्याप्रमाणे "दुखावलेल्या मनांची जागा भडकलेली डोकी घेतील आणि हा एकंदर समाजस्वास्थ्याचा विषय होईल." !!!

बाजीराव पेशव्यासारखा एक कर्तबगार रणधुरंधर सेनानी ज्याच्या अजिंक्य शौर्याची तुलना नेपोलियनशी होते, त्याच्या वाट्याला तेव्हा जीवित आयुष्यात आणि सध्या चित्रपटातदेखील जी अवहेलना आली ती अत्यंत दुर्दैवी आहे. इथेच नेपोलियन आणि त्याला वैयक्तिक स्वातंत्र्य देणाऱ्या टॉलरंट कल्चरने आपल्या एत्तदेशीय संस्कृतीवर मात केली असावी!

राकेश पाटील (पालघर)

Wednesday, 21 October 2015

...आणि पानिपत

आणि पानिपत....

हि एक समाजैतीहासिक कादंबरी. राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर चितारलेली सामाजिक इतिहासाची कादंबरी.

वरुडे गावातील महार समाजाच्या चार पिढ्यांचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास लेखक संजय सोनवणी ह्यांनी तत्कालीन राजकीय इतिहासाच्या एक विस्तृत कालखंडाच्या पार्श्वभूमीवर चितारला आहे. साधारणता: शिवकालीन काळात शेवटच्या टप्प्यात हा इतिहासपट सुरु होतो. पुढे शिवरायांच्या स्वराज्याच्या न्याय्य आणि प्रजाहितदक्ष सामाजिक व्यवस्थेच्या आठवणी तेवढ्या उरत जातात. उत्तरोत्तर मराठेशाहीतील सामाजिक व्यवस्था कशी मोंगली रूप धारण करते आणि पेशवाईत अक्षरश: विषमतेचा कडेलोट होत जातो. त्या सामाजिक स्थित्यंतराचा हा विस्तृत काळपट. भिमनाक - रायनाक आणि येळनाक उर्फ हसन - सिदनाक - पुन्हा भीमनाक  असा हा चार पिढ्यांचा  सामाजिक इतिहास. सुमारे १०० वर्षांचा ह्या सामाजिक इतिहासाची सुरुवात शिवाजीमहाराजांच्या निधनाच्या आसपास होते आणि शेवट पानिपतावर!

औरंगजेब महाराष्ट्रात उतरतो आणि स्वराज्याच्या पडझडीला सुरुवात होते. संभाजीची हत्या, राजारामाचे पलायन, शाहू-येसूबाईला अटक अशा त्या कोसळत्या काळात मोगलांच्या वरवंट्याखाली स्वराज्याची व्यवस्था पार भरडली जाते. तरीही शिवाजीच्या प्रेरणेने भारलेला  माणूस त्या मोगलाइचे  आव्हान पेलून उभा राहतो. परंतु राजकीय व्यवस्था रंग बदलू लागते. एके काळी औरंगझेबाची झोप उडविणाऱ्या संताजी-धनाजीमध्ये यादवी माजते. शाहुच्या सुटकेने स्वराज्यामाध्येच अंदागोंदी माजते आणि शाहू-ताराबाई, सातारा-कोल्हापूर  अशी उभी फुट मराठेशाहीत पडते. त्याची परिणीती पुढे पेशवाईच्या वर्चस्वात होऊन शेवटी ह्या व्यवस्थेची शंभरी पानिपतावर भरते. असा साधारण राजकीय इतिहास आहे. कादंबरीत हा इत्यंभूत इतिहास दक्खन-महाराष्ट्रापासून ते उत्तरेत दिल्लीपर्यंत अवघ्या हिंदुस्तानच्या पार्श्वभूमीवर अत्यंत बारीकसारीक तपशिलासह वावरत असतो. ह्या राजकीय इतिहासाचा वापर एका पार्श्वभूमिसारखाच ठेवून लेखकाने त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सामाजिक इतिहासाची अत्यंत प्रभावी मांडणी केली आहे.

एकीकडे हिंदुस्तानांत  मोगल साम्राज्याचे विघटन. नवाब-निजाम-वजीर-उमराव ह्यांनी पोखरून काढलेले दिल्लीचे साम्राज्य. मुल्लामौलवीनि अब्दाली-नादीरशहा अशा परकीयांशी संधान बांधून नामधारी केलेलं दिल्लीच्या बादशहाचं तख्त. तर दुसरीकडे दख्खनेत नामधारी झालेलि मराठ्यांची छत्रपतीची गादी. पेशवा, सरदार-सुभेदार आणि ब्राह्मणी व्यवस्थेने नामशेष केलेलि शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना. दिल्लीपासून ते दख्खनेपर्यंत झालेलं हे राजकीय पानिपत. त्यातून निर्माण झालेली सामाजिक अनागोंदी, रयतेची लुटालूट, नासधूस...म्हणजेच सामाजिक पानिपत!

कादंबरी मुख्यत: वरुडे गाव, महारवाडा आणि गावकरी ह्यांच्या दैनंदिन जीवनावर बेतलेली आहे. गावातील पाटीलकी, त्या पाटीलकिसाठीची साठमारी, गावातील मोरबा बामण, बलुतेदारी, महार-येसकरी, त्यांची म्हारकी, भावकी...आणि ह्या सर्वांचा मिळून चाललेला गावगाडा... लेखकाने वरुड्यातील ह्या समाजव्यवस्थेला कादंबरीत मध्यवर्ती  स्थान दिले आहे. आणि ह्या गावगाड्याचे बदलत्या राजकीय व्यवस्थेने बदललेले रंगरूप ह्याचा ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे ...आणि पानिपत.    


रायनाक महार हा कादंबरीतला मध्यवर्ती नायक. त्याचा बाप भिमनाक महार हे वरुड्यातील एक शहाणपण. शिवाजी राजांच्या काळातील महार समाजाच्या सामाजिक अधिकारांवर आणि त्याआधी बिदरच्या बादशाहने विठू महाराला बहाल केलेल्या सनदेवर भाष्य करणारा म्हातारा भिमनाक आणि पुढे  चिंध्या रामोशी आणि महार पोरांनी दरोडेखोरी चालू केली तेव्हा बदलत्या काळात त्याला पाठींबा देणारा भिमनाक, कादंबरीच्या सुरुवातीच्या काळातील  सामाजिक व्यवस्थेचा साक्षीदार असतो. ह्या भिमनाक महाराची पुढची पिढी म्हणजे त्याची दोन मुले रायनाक आणि येळनाक. हा रायनाक कादंबरीचा मूळ नायक असावा अशी त्याची मध्यवर्ती भूमिका आहे. कधीकाळी रायनाक संताजीच्या लष्करात पाइक होता. स्वराज्यासाठी शौर्याने लढताना तो जायबंदी होऊन पुन्हा गावात येउन म्हारकीची कामे इमानेइतबारे करतोय. जी धर्म व्यवस्था, जी समाज व्यवस्था रायनाकला पदोपदी तुडवत राहते तिच्याशी तो इमानदारीने निभावत राहतो. कधी बंड करून उठतो आणि आपल्या मित्राच्या बायकोवर वंगाळ नजर टाकणाऱ्या शिंप्याचा खून देखील करतो. कधीतरी दरोडेखोर बनायचं स्वप्न उरी बाळगतो. पण शेवटी त्याच्यातला माणूस ह्या क्षणिक हैवानीवर मात करून उरतो. त्याची बायको बाळंतपणात गुदरल्याने मेल्या भावाची बायको सिदनाकचा सांभाळ करताना रायनाककडे ओढली जाते. गावातही तशी कुजबुज चालते. पण ह्या दुनियादारीला रायनाक आपल्या जन्मजात  माणुसकीने जिंकून उरतो... कधी मोघली सैन्याचा मार खाऊनहि गावाशी बेईमानी न करणारा रायानाक.  कधी येळनाकने दिलेल्या अशर्फ्या महारवाड्याला जगविण्यासाठी वापरणारा रायानाक. कधी दुष्काळात गांजलेला रायनाक. चिंध्या रामोशी आणि महार दरोडेखोर पकडले गेले तेव्हा हकनाक मार पडलेला रायनाक. निजामाने गाव जाळलं तेव्हा ढसाढसा रडणारा रायनाक. पाटलाच्या मळ्यावर राबणारा  रायनाक. अशा अनेक रूपांत रायनाक महार कादंबरीत वावरतो आणि अश्रुनी भिजलेला इतिहास सांगत राहतो!

 दुसरीकडे ह्या सामाजिक पडझडीच्या काळात विषमतेला आव्हान देणारे आणखी एक स्थित्यंतर घडून येते. ते म्हणजे  रायनाकच्या भावाचे, येळनाकचे धर्मांतर. राजगडावरील लढाईत अशर्फिखान बहादुरीने लढणाऱ्या येलनाकला गिरफ्तार करतो. त्याला इस्लामच्या समानतेत आणतो आणि येळनाकचा हसन बनतो. हा अशर्फिखान सुद्धा मोरबा ब्राह्मणाचा बाटलेला चुलता अन्ता जीवाजी असतो. औरंगझेबाच्या मृत्युनंतर मोगली फौजेसोबत हसन मोगली साम्राज्यात परततो. मुस्लिम हसनला अमिना बिवी प्राप्त होते आणि बख्तियार नावाचा त्याचा शहजादा! कादंबरी इथे मुस्लिम धर्मांतराच्या विषयाला हात घालते. इस्लाम स्वीकारणारे अशर्फिखानासारखे सवर्ण हिंदू तसेच हसनसारखे दलित हिंदू ह्यांच्यामाध्यमातून तत्कालीन  हिंदू-मुस्लिम धर्मांतरे आणि त्यातील सामाजिक व्यवस्थेतील अभिसरणावर कादंबरी भाष्य करीत राहते.

ऊत्तरेत मोगल बादशाहीच्या धामधुमीत हसन एका महत्वाच्या लढाईत खुद्द जुल्फीकारखानाला ठार करण्याचा पराक्रम गाजवतो. अशर्फिखान हसनला त्याच्या लढाईच्या तंत्राबद्दल विचारतो तेव्हा हसन शिवाजीराजाची आठवण काढतो. शिवरायांच्या प्रजाहीताची वृत्ती हसन त्याच्या जहागिरीच्या कारभारात बाळगताना दिसतो. ह्याउलट त्याचा मुलगा बख्तियार अत्यंत अय्याश निपजतो. अशर्फिखान आणि सय्यद बंधूंशी संधान बांधून तर त्यांच्यानंतर नजीबखान रोहील्याच्या साथीने हसन आणि बख्तियार उत्तरेत नावारूपाला येतात. येळनाक उर्फ हसनच्या माध्यमातून कादंबरी उत्तर हिंदुस्तानातील आणि दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक इतिहासावर भाष्य करते. त्यातून पुढे अब्दाली, मराठे शिंदे-होळकर, जाट-राजपूत-नवाब ह्यांचे राजकीय डावपेच आणि त्यातून घडलेले पानिपतचे युद्ध हा कादंबरीचा उत्तरार्ध आहे.

मराठेशाहीच्या अंतर्गत यादवीने, शाहुच्या मोगली मांडलीकत्वाने, पेशव्यांच्या बामणशाहीने शिवरायांच्या स्वराज्याच्या मुलभूत संकल्पनेलाच सुरुंग लागल्याने सामाजिक व्यवस्था पार ढेपाळत गेलेली असते. राजकीय व्यवस्था देखील तशीच अध:पतित होत जाते. गावगाड्यावर ह्या बदलत्या सामाजिक-राजकीय व्यवस्थेचे ओरखडे उठत राहतात. सत्तासंघर्ष, दुष्काळ, वतनदारी, आपसातील यादवी, वेठबिगारी, महारांचे नरबळी, तामाशाबाजी  अशा विविध स्तरांवर सामाजिक अध:पतन घडत राहते. दलितांच्या, महार समाजाच्या शोकांतिकेला तर पारावर उरत नाही. कधी काळी लष्करातील लढाऊ समाज आणि किल्लेदारीपर्यंत अधिकार असलेला हा वर्ग अक्षरश: विषमतेच्या खाईत ढकलला जातो. त्यांच्या हातातील शस्त्र काढून लष्करातील बुणगेगिरीची, प्रेते ओढण्याची हलकी कामे येतात. गावगाड्यात तर हे अध:पतन अत्यंत टोकाचे हिडीस रूप धारण करते. महारांच्या हक्कांचा प्रचंड संकोच होत जातो. अस्पृश्यता फोफावते. वेठबिगारी उग्र रूप धारण करते. समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था दोन्ही स्तरावर महार-दलितांच्या नशिबी हे अध:पतन होत जाते.ह्या सामाजिक पानिपताचा  थेट महाराष्ट्रातून पार दिल्लीपर्यंत एका विशाल भौगोलिक आणि राजकीय परिप्रेक्षात वेध घेण्याचे काम कादंबरीने केले आहे.

गावातली पाटीलकी आणि त्यासाठीच्या काळेपाटील , पवारपाटील ह्यांच्यातील सत्तासंघर्ष देखील गावगाड्याच्या पाचवीला पुजलेली व्यवस्था. शाहू-ताराबाई संघर्षात भवानराव पाटील स्वत: रायनाकसोबत धनाजीजाधवला जाऊन मिळतो... आणि त्या खोट्या लढाईत भवानराव हकनाक बळी जातो. मराठ्यांच्या आपसातील बेबनावाचा असा फटका गावावर पडतो. पाटलाची बायको सती जाते तेव्हा  अवघ्या काही ओळीत लेखकाने सतीचा जो हृदयद्रावक थरार उभा केलाय...! ...अमृत पाटलाची बटिक चांगुणा आणि तिचा मुलगा संताजी. संताजी आणि भिमनाकची दोस्ती. चांगुणा एक म्हारीण. तिने केलेल्या फसवणुकीने पाटलाचे झालेले अध:पतन. ह्या सर्व मानवी भावभावनांचा गुंता कादंबरी उलगडत राहते.

एकेकाळी गावात ब्राह्मणी व्यवस्थेचा कट्टर समर्थक असलेला मोरबा ब्राह्मण स्वत:च ह्या सामाजिक पानिपताचा साक्षीदार आहे. त्याला हव्याशा वाटणाऱ्या ह्या राजकीय स्थित्यंतरातून जे सामाजिक आणि राजकीय अध:पतन घडत राहते त्याने मोरबा व्यथित होतो. एकेकाळी गावात नांदत असलेली माणसामाणसातील आपुलकी, सामाजिक सौहार्द्र लयाला जाऊन पेशवाईच्या बेगडी व्यवस्थेच्या ओझ्याखाली पिचत असलेल्या माणुसकीने मोरबा हादरून जातो. उतारवयात तो ह्या भटकुलशाहीविरोधात बंड करून उठतो. गावात सतीची चाल विरोध करून बंद पाडतो! त्यासाठी ब्रह्मवृंद मोरबालाच वाळीत टाकतो. मानवी भाव-भावनांना लेखकाने किती टोकावर नेउन ठेवलेय, ते कादंबरीच्या पानापानात जाणवत राहते.

रायनाकचा  मुलगा सिदनाक महार हा कादंबरीच्या सुरुवातीला अवतरतो खरा, परंतु तेव्हा म्हातारा झालेला रायनाक कथानकाचा ताबा घेत जातो. कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात पेशवाइतिल निघृण जातीय विषमतेच्या व्यवस्थेचा सिदनाक बळी ठरतो. शिवाशिविच्या बामणशाहीने पुण्यात महारांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यास मज्जाव केलेला असतो. त्यात मोरबा ब्राह्मण निवर्तल्याचा सांगावा घेवून पुण्यात आलेला सिदनाकची सावली ब्राह्मणावर पडली. सिदनाकचा निघ्रून शिरच्छेद करून त्याच्या मुंडक्याचा चेंडू करून खेळवला गेला. शिवरायांच्या स्वराज्यातील सामाजिक सलोख्याचे आणि न्यायव्यवस्थेचे इथे खर्या अर्थाने पानिपत होते !

इतपत बदलत्या व्यवस्थेचे अन्याय सहन करून उभा राहिलेला रायनाक सिदनाकच्या ह्या अमानुष हत्येने पुरता कोसळतो. सिदनाकचा मुलगा भीमनाक बापाची वेडी धर्मनिष्ठा सोडून  आपल्या आज्जाच्या वळणावर गेलेला. रायनाक त्याला उत्तरेत येळनाककडे जाऊन धर्मांतर करण्याचा सल्ला देतो. स्वत: कितीही निष्ठेने ह्या धर्मव्यवस्थेत पिचून राहिलो तरीही शेवटी येळनाकने हसन होऊन जे धर्मांतर केले त्या निर्णयापुढे रायनाकने शरणागती पत्करली, ती अशी.

रायनाकचा नातू भिमनाक आपल्या बापाच्या खुनाचा सूड घेण्याच्या भावनेने पेटून उठतो. आयुष्यभर हिंदू राहून पिचत राहिलेला रायनाक त्याला मुस्लिम होण्याची प्रेरणा देतो. उत्तरेत हसन-बख्तियारकडे पाठवून देतो. भीमनाकचा बालमित्र पाटलाचा लेकावळा संताजी मराठी सैन्यात होता. त्याच्या ओळखीने भीमनाक आणि त्याची बायको सुंद्री दोघे उत्तरेत निघालेल्या भाऊच्या मराठी सैन्यात बुणगे बनून सामील होतात. ऐन पानिपतावर तो बालमित्रच सुन्द्रीला घेवून चक्क पळून जातो. भिमनाक अगतिक तरीही सुडाने पेटलेला.

भीमनाक आपला सूड उगविण्यासाठी भाऊची , पेशव्याची गर्दन मारण्याच्या तयारीत. त्यासाठी तो भाऊच्या शामियाण्यापर्यंत पोहोचतो पण... तसाच तो दुसरीकडे बख्तियारपर्यंत  पोहोचतो. त्याला मराठी लष्करातील खबरा पुरवतो. बख्तियारचाचा त्याला वापरून घेतो पण दोघांमध्ये कोणतीही आपलेपणाची भावना उरलेली नाही. बख्तियार म्हणजे येळनाक नव्हे. अमिरजादा बख्तियारलां  भिमनाक मध्ये स्वारस्य उरलेले नाही. काही ऋणानुबंध उरलेले नाहीत. तर भिमनाकलाहि बख्तियारचाचा आणि इस्लाममध्ये स्वारस्य उरलेले नाहीये.  मानवी भावभावनांचा हा कल्लोळ लेखकाने कादंबरीभर पेरून ठेवलाय...

अखेर पानिपत घडते. मराठी लष्कर उद्ध्वस्त होते. पखाल घेऊन फिरणारा भिमनाक देखील युद्धाच्या भीषणतेणे पुरता कोसळतो.  त्याच्या हाती जखमी भाऊ सापडतो. पण आता सूडच शील्लक राहिलेला नाही. माणुसकी पुन्हा एकदा सर्व अध:पतनातून जिंकून उरते. तो भाऊला वाचवतो. जीवावर खेळून यमुनापार करतो. महिनाभर त्याची सेवा करून भाऊला जगवतो. भाऊला त्याच्या सुडाची कहाणी सांगतो. भाऊ हेलावून जातो आणि क्षमा मागतो! पुरता हरलेला भाऊ मन:शांतीसाठी उत्तरेकडे निघून जातो.

मागे उरतो एकाकी भिमनाक... तसाच वरुड्यात एकाकी रायनाक...आणि उरते ते पानिपत, चार पिढ्यांच्या सामाजिक इतिहासाचे. ऐतिहासिक कादंबऱ्या  आपल्याकडे पेव फुटल्यासारख्या येतात. थोडा राजकीय इतिहास आणि त्यावर लेखकाने चढविलेला कल्पनाविष्कार हे त्याचे साधारण स्वरूप असते. पण इतिहास म्हणजे जणू काही राजेरजवाडे, वजीर-पेशवे, सरदार-सुभेदार, लष्करशाह आणि लढाया-युद्धे ह्यांचीच मक्तेदारी! पण सामान्य माणसाचाही इतिहास असतो...गावगाड्याचा, महारवाड्याचा आणि एकूणच समाजाचा इतिहास...! ह्या सामाजिक इतिहासाला प्राधान्य देऊन आणि त्याला राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर रेखाटणारी हि कादंबरी. ह्या 'समाजैतिहासिक' वेगळेपणाने  '...आणि पानिपत' मराठी कादंबरीच्या विश्वात एकमेवाद्वितीय ठरते. मराठी कादंबरीतला एक मैलाचा दगड. ...आणि पानिपत.

...आणि पानिपत
लेखक : संजय सोनवणी
प्राजक्त प्रकाशन
मुल्य : ४००/-

Saturday, 12 September 2015

...आणि मग पुन्हा प्रा. शेषराव मोरेंना "कॉंग्रेसने आणि गांधीजीनी अखंड भारत का नाकारला?" सारखी सुंदर उपरती होईल

प्रा.शेषराव मोरे ह्यांचे "अखंड भारत का नाकारला?" हे संपूर्ण अभ्यासातून सिद्ध झालेले महत्वपूर्ण संशोधन आहे. प्रचंड सावरकरवादी असलेल्या मोरेंनी ह्या ग्रंथात अखंड हिंदुस्तान, फाळणी ह्या हिंदुत्ववाद्यांच्या, सावरकरवाद्यांच्या कळीच्या मुद्द्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंय. काँग्रेस, गांधी-नेहरू, लीग, जिना, राष्ट्रवादी मुस्लिम, आझाद, बाबासाहेब, नेताजी इत्यादी सर्व घटकांना त्यांनी विस्तृत कव्हरेज देऊन आपले सिद्धांत पक्के मांडले आहेत. परंतु एक घटक ह्या ग्रंथात आश्चर्यकारकरित्या उपेक्षित राहिलाय, तो म्हणजे मोरेंचाच लाडका सावरकरवाद किंवा अखंडहिंदुस्तांवादी हिंदुत्ववाद!

त्यांच्या सध्याच्या वैचारिक गोंधळाला मोरेसमर्थक हिंदुत्ववादी 'विचारकलह' म्हणू शकतात. कारण मोरेमास्तर आधीच्या पुस्तकांत फाळणीला कॉंग्रेसला जिम्मेदार ठरवीत असत. पण पुढे त्यांनी फाळणीचा साद्यंत इतिहास अभ्यासला आणि सत्याच्या दिव्य प्रकाशात त्यांची बुद्धी दिपून गेली किंवा अक्षरश: वेड लागायची पाळी आली ( असं तेच म्हणतात) ...आणि मग "कॉंग्रेसने आणि गांधीजीनी अखंड भारत का नाकारला?" हि उत्कृष्ठ संशोधनात्मक साहित्यकृती प्रकाशित झाली.

अखंड हिंदुस्तान हा कळीचा मुद्दा असूनही प्रा..मोरेंनी आपल्या ग्रंथात  सावरकरवाद किंवा हिदुत्ववाद उपेक्षित का ठेवला हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचा मागोवा घेतल्यास ह्या ग्रंथातून काही तथ्ये स्पष्ट होतात.

ह्या ग्रंथात सुरुवातीलाच स्वत:च्या अखंड भारताच्या भाबड्या आणि भावनिक समजुतीबद्दल प्रा. मोरे मनोगत व्यक्त करताना म्हणतात...
"...पूर्वी आम्हीही कडवे अखंड भारतवादीच होतो... फाळणी करून कॉंग्रेसने देशाचा घात केला असे मानीत होतो...आमच्या १९८८च्या ग्रंथात तसे स्पष्ट लिहिलंय...पण तेव्हा आमचा फाळणी विषयक अभ्यासच झाला नव्हता...!" इति. प्रा. मोरे
पृष्ठ क्र. ४ (अखंड भारत का नाकारला? (मनोगत))

हि स्पष्ट कबुली देणारे प्रा. मोरे समस्त सावरकरवादी हिंदुत्ववादी विद्वानांचे प्रतिनिधित्वच करीत आहेत हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल.

आपल्या स्वतंत्र भारतात अखंड हिंदुस्तान आणि फाळणीबद्दल आत्यंतिक जाज्ज्वल्य वगैरे राष्ट्रभक्ती बाळगून असलेले जी मंडळी आहे त्यांच्यासाठी ह्या महत्वपूर्ण ग्रंथात प्रा. मोरे लिहितात...

"...काँग्रेस व्यतिरिक्त अन्य हिंदू संघटनांनी व व्यक्तींनी ( अर्थात संघ, हिंदू महासभा, सावरकर प्रभूती) फाळणीचा पर्याय म्हणून मांडलेल्या अखंड भारताविषयी एखादे प्रकरण ह्या ग्रंथात असावे असा काही अभ्यासू मित्रांचा (?) सल्ला होता. पण ग्रंथ मर्यादेमुळे (???) तसे न करता सामारोपातच त्याची दखल घ्यावी लागली...!"
पृष्ठ क्र. १६ (अखंड भारत का नाकारला? (प्रास्ताविक))

...आणि समारोपात हा हिंदुत्ववाद्यांच्या हिंदुस्तानचा अस्तित्वाचा प्रश्न अवघ्या दोनचार ओळीत गुंडाळूनही टाकतात...!

"...सावरकरांच्या अखंड भारताच्या योजनेत मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेत वाटा मिळणार होता... त्यानुसार आजच्या लोकसभेत सुमारे ३८% खासदार मुसलमान असते...आजच्या राज्यघटनेत मुस्लिमांसाठी एकही राखीव जागा नाही...आजच्या राज्यघटनेची कल्पनाही हिंदुत्ववादी करू शकले नव्हते... सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' हिंदूंसाठी घातक ठरले असते!..." इति. प्रा. मोरे.
 ("...सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' हिंदूंसाठी अघातक ठरले नसते!..." असं मोरेंचे मूळ वाक्य आहे. मी ते सरळ भाषेत लिहिलंय.)
पृष्ठ क्र. ६८३ (अखंड भारत का नाकारला? (समारोप))

आता पाचशे-हजार पानांच्या ह्या ग्रंथात ग्रंथ-मर्यादा कुठून उद्भवली? मुस्लिम लीग, राष्ट्रवादी मुस्लिम ह्यांच्यावर चार-चार प्रकरणे लिहित असताना हिंदुत्ववादी आणि विशेषत: सावरकरवादी भूमिकेवर एखादे प्रकरण तरी सहज बसवता आले असते! पण ती भूमिका मुळातच फोल, भोंगळ असल्याने कदाचित ह्या ग्रंथात आणखी विस्तृतपणे मांडायची तर स्वत:च्याच विचारप्रणालीचे वाभाडे काढावे लागले असते. म्हणून ते अवघड काम त्यांनी दोनचार ओळीतच आटपून टाकले असावे. "...अखंड भारत का नाकारला?" हि अशी एक सुंदर उपरती आहे.

अलीकडे प्रा. मोरेंच्या सावरकरप्रेमाने अंदमानात पुन्हा उचल खाल्ली किंवा पुन्हा 'विचारकलह' सुरु झालेला दिसतोय. ह्यावेळी सावरकरबदनामीसाठी त्यांनी पुरोगामी, काँग्रेस आदि घटकांना जिम्मेदार ठरवून वैचारिक गोंधळ घातलाय. त्यासाठी पुरोगामी विचाराची  दहशतवादाशी तुलना करून ते स्वत:  'पुरोगामी' , 'सेक्युलर' इ. शब्दांवरदेखील हिंस्त्र हल्ला चढविणाऱ्या कंपूचे म्होरके झाले आहेत. 

वरील विवेचनातून एक गोष्ट स्पष्ट होईल कि प्रा. मोरे पुरोगामी विचार, गांधी हत्या आणि सावरकरवाद ह्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करतील तर पुन्हा विचारकलहातून त्यांची मते बदलु शकतील. पूर्ण अभ्यासांती सावरकरांच्या कथित बदनामीची अकथित केंद्रे प्रा. मोरेंना उलगडतील आणि दहशतवादाची केंद्रेही सापडतील. पुरोगामी विचाराचा लक्ख इतिहास पुन्हा त्यांची बुद्धी उजळून टाकील!... आणि मग प्रा. मोरेंना कदाचित पुन्हा एक सुंदर उपरती होईल.

Saturday, 5 September 2015

टीचर्स डे

पहिलाच दिवस होता, वसई पॉलीटेक्निकमध्ये आणि एपिएम (Applied Mechanics) शिकवायला देशमुख सर होते. मूर्ती लहान पण एकदम कडक, खरंतर चिडखोर स्वभावाचे सर होते. (अलीकडेच ते अपघातात गेले बहुधा.) :(

 तर पहिल्याच दिवशी सर काहीतरी शिकवीत होते. मी आणि बिपीन Mhatre पहिल्याच बेंचवर बसलो होतो. (दोघेही कॉलेजच्या एसेस्सिच्या मेरीट लिस्टमध्ये पहिल्या दोन नंबरवर होतो...! पण शाळेतल्या मेरीटच्या भव्यदिव्य आठवणींपेक्षा पॉलीटेक्निकचे तंत्रमय दिवस संघर्षाचे होते, बरं. ) लेक्चर चालू होतं आणि पाठीमागून कुणीतरी खोडसाळपणा केला... आणि इथेच माझी शाळेतली पारंपारिक खोड पुन्हा आडवी आली. म्हणजे मी हसलो. :)

 देशमुख सर आधीच चिडखोर. त्यात मी पुढे बसून दात काढतोय म्हटल्यावर त्यांचा पारा आणखी चढला. खाडकन माझ्या समोर आले, डेस्क वरची माझी नोटबुक घेतली आणि दिली क्लासबाहेर भिरकावून... हो, अक्षरश: हाकलून काढलं मला, वर्गातून...पहिल्याच दिवशी.

त्या देशमुखसरांच्या स्मृतींना टीचर्स डे निमित्त अभिवादन.

Thursday, 13 August 2015

३८ वर्षांची तपस्या आणि विश्वामित्री पवित्रा

३८ वर्षांची तपस्या आणि विश्वामित्री पवित्रा
विश्वामित्राच्या कठोर तपश्चर्येने घाबरून जाऊन स्वर्गाधिपती इंद्राने स्वर्गसुंदरी अप्सरा मेनकेला भूतलावर पाठवून दिले. मेनकेच्या मादक सौंदर्याने घायाळ होऊन तापसी विश्वामित्राचे चित्त विचलित झाले. ब्रह्मश्रीपदाचे विस्मरण होऊन आणि त्यासाठीची तपश्चर्या सोडून त्याने मेनेकेसोबत संसार थाटला. शकुंतलेचा जन्म झाला आणि मेनका स्वर्गलोकी परतण्यास निघाली. तेव्हा विश्वामित्राचे डोळे खाडकन उघडले आणि त्याला आपली तपश्चर्या भंग झाल्याचे लक्षात आले.
(हि कथा सर्वश्रुत आहेच. मात्र, त्यापुढे घडलेला प्रसंग असा:)
तेव्हा अत्यंत क्रोधायमान होऊन विश्वामित्राने शापवाणी उच्चारली:

विश्वामित्र: हे मेनके, तू माझी तीन तपांची तपश्चर्या भंग केलीस. मी तुला शाप देतो. ज्या सौंदर्याचा गैरवापर करून तू हे पापकृत्य केलेस ते तुझे स्त्री-सौंदर्य नष्ट होईल. कलियुगात तू मृत्युलोकी पुरुष जन्म घेशील आणि काळीकुरूप होशील. तुझे काळे तोंड आणि काळे धन घेवून तू मृत्युलोकी सैरावैरा पळत सुटशील.
ह्या शापवाणीने मेनका क्षणभर गांगरली. पण दुसर्याच क्षणी स्वत:ला सावरून तिने विश्वामित्राकडे उषा:प मागितला.

मेनका: हे राजर्षी, मी ह्या जन्मी आपली सेवाच केली. पुढील जन्मी मृत्युलोकी आपली सेवा करण्याची संधी द्यावी. मला उषा:प द्यावा.

विश्वामित्र: (निश्चयपूर्वक) कदापि नाही. ह्यापुढे तुला माझ्या राज्यात स्थान नसेल. तुझी रवानगी रसातळाला अर्थात आर्यावर्ताबाहेर दूर आंग्लदेशी पोर्तुप्रांती होईल.
ह्यावर सात्विक संतापाने मेनका क्रुद्ध झाली. आणि तिनेहि विश्वामित्राला प्रतीशाप दिला.

मेनका : हे राजन, तू माझ्या स्त्रीजन्माची कुचेष्टा केली आहे. माझ्या शापाने तू कलियुगात मृत्युलोकी स्त्री होशील... तू विश्वामित्री पवित्रा घेत स्वत:च्या राज्यात सैरभैर होशील...आणि मी ललितरूप घेऊन दूरदेशी राहूनदेखील तुझी तीन तपांची, ३८ वर्षांची तपस्या पुन्हा भंग करीन.

(काल्पनिक)

Wednesday, 24 June 2015

....विनोद तावडे ह्यांनी कोणती चूक केली?

विनोद तावडे ह्यांनी कोणती चूक केली?

 १९८० साली त्यांनी कथित ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रवेश घेवून चार वर्षात तो तथाकथित इंजिनियरिंगचा कोर्स पूर्ण केला आणि ती डिग्री प्राप्त केली. 1963 साली जन्मलेले तावडे तेव्हा जेमतेम बारावी होऊन बाहेर पडलेले १७-१८ वयाचे एक विद्यार्थी असावेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची कशी फसवणूक केली जाते ह्याचे तावडे हे खरंतर ज्वलंत उदाहरणच आहेत!

गेल्या वर्षी स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेविषयी गदारोळ मजला होता तेव्हा, ह्या विषयावर मी खालील पोस्ट टाकली होती:

"ओपन युनिव्हर्सिटी , Distant Education Courses, Correspondence Courses, ह्यांचा प्रचंड गैरवापर केला जात असल्याचे सातत्याने निदर्शनास येते. BA, B.Com सोडा, इंजीनियारिंगच्या B.Tech, B. E., B.Sc., M.Sc, M.Tech ते Ph.D. पर्यंतच्या सर्व शाखातील 'डिगऱ्या' स्वस्तात उपलब्ध आहेत.
ह्या तथाकथित विश्वविद्यालयांच्या शाखांमधून कोणत्या परीक्षा(?) घेतल्या जातात ते पाहाल तर खूप मनोरंजन होईल. अत्यंत हास्यास्पद, संतापजनक आणि भ्रष्ट असा हा उघड शिक्षणाचा बाजार शहरी भागात मांडला गेला आहे." इति.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या शैक्षणिक पात्रतेच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुद्दा हा आहे कि इंजिनियरिंग, वैद्यकीय, तंत्रशिक्षण, विज्ञान इत्यादी महत्वाच्या क्षेत्रात घुसलेल्या या मुक्तशिक्षण घोटाळ्याचा पुनर्विचार व्हायला हवा.

मुळात ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या 'समांतर व्यवस्थेला' BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या उच्चशिक्षणाशी संबधित असलेल्या पदव्या अगदी शब्दश: जशाच्या तश्या वापरण्याची परवनागी कशी मिळते? त्यांच्या कोर्सच्या पदव्या वेगळ्या नावाच्या असायला हव्यात, जेणेकरून विद्यार्थ्याची आणि इतरांचीही फसवणूक होता कामा नये. पण हि धूळफेक जाणीवपूर्वक केली जाते कि काय हा खरा मुद्दा आहे! उदा. तावडे ह्यांना 'कोर्स इन इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग' वगैरे नावाची डिग्री द्यायला कुणाची हरकत नसावी. परंतु हटकून "BE डिग्री इन इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग" हा इंजिनियरिंगच्या मुख्य प्रवाहातीलाच शब्दप्रयोग वापरला गेला कारण तिथे धूळफेक अपेक्षित आहे.
हि समांतर विद्यापीठे अशा धूळफेकीसाठीच पैदा केली गेली असावीत. ह्या खोट्या डिग्र्या कुणाला उपयोगी पडतात? खासगी उद्योगजगतात अशा विद्यार्थ्यांना कोणताही स्कोप नाही कारण त्यांच्याकडे अपेक्षित ज्ञान, कौशल्य असण्याची सुतराम शक्यता नसतेच. मग ह्या डिग्र्या कुठे वापरल्या जातात? त्याचे उत्तर आहे सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रातील नोकऱ्या...! वेगवेगळ्या राज्यांच्या नावाने उत्पन्न झालेल्या अशा ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या युनिव्हरसीट्या ह्या काळ्याबाजारात फोफावल्या आहेत. BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या उच्चशिक्षणाशी संबधित असलेल्या पदव्या त्याच नावाने बहाल केल्या जातात. काही अंशी सरकारी मान्यता देखील असल्याने उदारतेने सरकारी नोकऱ्या, पदोन्नती इत्यादी साठी ह्या मुक्तडिग्र्या सढळहस्ते वापरल्या जातात. खासगी क्षेत्रातही थोडीफार धूळफेक होते, पण मुख्यत्वे शिक्षणाच्या ह्या काळ्याबाजाराचा डोलारा सरकारी नोकर्यांशी संबधित आहे.

चारचार वर्षाचे हे कोर्सेस फक्त दरवर्षी मोठी फीस भरून अटेंड केले जातात. कोणत्याही प्रकारची उपस्थिती, लेक्चर, प्रात्यक्षिक मुळातच अपेक्षित नसते. फक्त वर्षाच्या शेवटी नियमितपणे परीक्षा अटेंड (!)करायची, म्हणजे उत्तरपत्रिका भरायच्या कारण त्यावर कोणीही परीक्षक, पर्यवेक्षक वगैरे नसतोच. अशा प्रकारे चार वर्षाच्या फीसा भरल्या कि तुमची डिग्री तुमच्या हातात. असा हा प्रचंड मोठा घोटाळा आहे. मुख्य शहरे, तालुक्याच्या ठिकाणी हि शिक्षणाची गटारगंगा पाहायला मिळेल.
इंजिनियरिंगची डिग्री बाहेरून मिळवायची तर त्यासाठी AMIE नावाचा कोर्स उपलब्ध आहे. अगदी BE च्याच तोडीचा कोर्स. किती सरकारी बाबू AMIE करतात , हा संशोधनाचा विषय आहे. किंवा कितीजण ज्ञानेश्वर विद्यापीठ टाईप काळ्या डिग्र्या विकत घेतात हे पाहणे मनोरंजक असेल.

मुद्दा हा आहे कि ह्या तथाकथित विद्यापीठांना BE , BTech , ME , MTech , BSc , MSc हि नावे वापरायला बंदी घालायला हवी. त्यांच्या कोर्सेसना त्यांनी त्यांच्या विद्यापीठाची नावे द्यावीत. उदा. इलेक्ट्रोनिक्स इंजीनियरिंग कोर्स फ्रोम ज्ञानेश्वर युनिव्हरसिटी वगैरे. तसेच अशा तथाकथित डिग्र्याची सरकार दरबारी नोकऱ्या-पदोन्नती साठी गैरलागू ठरवायला हव्या.

तावडे नावाचा विद्यार्थी वयाच्या १७-१८व्या वर्षी जर ह्या १९८० साली ह्या घोटाळ्याचा शिकार झाला असेल तर आज कित्येक विद्यार्थी BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या नावाच्या वलयाने नागवले जात असतील? म्हणून खरा मुद्दा हा आहे कि इंजिनियरिंग, वैद्यकीय, तंत्रशिक्षण, विज्ञान इत्यादी महत्वाच्या क्षेत्रात घुसलेल्या ह्या मुक्तशिक्षण घोटाळ्याची हकालपट्टी व्हायला हवी, तावडेंची नव्हे!

Monday, 22 June 2015

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याची घटना कालच घडली. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत हि घटना घडली. हि विषारी दारू ठाणे जिल्ह्यातून किंवा गुजरातमधून आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. ह्या पार्श्वभूमीवर हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय असा प्रश्न उभा राहतो.
महागडी देशी-विदेशी दारू न परवडणारा गरीब मजूर वर्ग गल्लीबोळातील हातभट्टीच्या दारूचा ग्राहक आहे. त्यामुळे हातभट्टी अर्थातच बेकायदेशीर असूनही तिचा मोठा पारंपारिक उत्पादक-ग्राहक वर्ग देशात अस्तित्वात आहे, हे वास्तव आहे. त्याची उत्पादनाची पद्धत गावठी तरीही वैज्ञानिक म्हणजेच उर्ध्वपातन म्हणजेच डीस्टीलेशनच आहे.

पारंपारिक हातभट्टीमध्ये उसाची मळी किंवा (काळा गुळ) आणि नवसागर (अमोनियम क्लोराइड NH4Cl )हे मिश्रण काही दिवस आंबवून त्याचे उर्ध्वपातन केले कि गावठी दारू तयार होते. ह्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून दारूचे उत्पादन ग्राहकांना उपलब्ध होते. ग्रामीण भागात आणि शहरी गल्लीबोळात हीच गावठी दारू बहुधा उपलब्ध असते. हातभट्टीच्या त्या मिश्रणात संत्री, मोसंबी, आंबा, जांभूळ, इत्यादी फळे टाकल्यास त्या त्या फळाच्या अर्काची चव प्राप्त होते.
मोह किंवा जांभळे टाकून उत्तम प्रतीची दारू बनविली जाते आणि दारूतले दर्दी शौकीन ह्या दारूला 'इंग्लिश दारू'पेक्षाही उच्च दर्जाची मानतात!
मग प्रॉब्लेम कुठे येतो? तर मोठ्या प्रमाणत (हजारो लिटर) ह्या हातभट्टीच्या दारूचे उत्पादन करणारे जे मोठे व्यावसायिक निर्माण झाले आहेत, त्यांनी ह्या दारूच्या उत्पादनाच्या पारंपारिक पद्धतीत लबाड्या करायला सुरुवात केली. त्यासाठी रसायनांचा भडीमार केला जाऊ लागला. युरिया सारखे खत आणि ब्याटरिची (सेल) पावडर देखील हातभट्टीत वापरले जाऊ लागले. अर्थात पारंपारिक उर्ध्वपातनाच्या शास्त्रात आधुनिक रसायनशास्त्राने मोठी घुसखोरी केली... आणि त्यातून विषारी रासायनिक दारूची प्रकरणे गेल्या काही वर्षात उद्भवली.
हातभट्टीच्या दारूत अलीकडे मिथेनॉल ह्या रसायनामुळे प्रचंड जीवघेणी विषारी भेसळ सुरु झाली. हे मिथेनॉल का वापरले जाते?

वर उल्लेख केल्यानुसार उर्ध्वपातनातून निर्माण झालेल्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून गावठी दारू ग्राहकापर्यंत पोहोचत असे. नेमका इथे मिथेनॉलने खेमिकल लोचा केला. ह्या 'पिव्वर दारू'त फक्त दोन थेंब मिथेनॉल टाकल्यास सुमारे सातपट जास्त गावठी दारू तयार होऊ लागली! 'थेंबाची दारू' ह्या नावाने हि मिथेनॉलदारू ओळखली जाते. आता खेडोपाडी आणि गल्लीबोळातून हे मिथेनॉल संशोधन पसरल्याने छोटेमोठे हातभट्टीवालेहि सर्रास मिथेनॉलदारूचे उत्पादन करू लागले. त्यातून मिथेनॉलचे 'थेंबाचे' प्रमाण साहजिकच अनियंत्रित होऊ लागले. मिथेनॉलच्या अनियंत्रित वापराने गावठी दारूचे जीवघेण्या विषारी दारूत रुपांतर होत गेले. ह्या विषारी मिथेनॉलदारूचे दुष्परिणाम मुंबईतील मालवणी येथील दुर्घटनेतून पुन्हा उघड झाले.

अर्थात, ह्या गावठी दारूच्या धंद्यावर (तो बेकायदेशीर असल्याने) बंदी आणून हा प्रश्न सुटेल हे फक्त स्वप्नरंजन आहे. हातभट्टीची हजारो वर्षांपासून परंपरा आहे आणि आजही ती टिकून आहे कारण त्याचे मागणी आणि गरजचे अर्थकारण. ग्रामीण (आणि शहरीही) भागातील मोलमजुरी करणाऱ्या फाटक्या लोकांना कायदेशीर कारखान्यातील दारू उपलब्ध आणि परवडणार असेल तर प्रश्नच नाही, परंतु तेही संपूर्ण दारूबंदिसारखे स्वप्नरंजनच आहे. एकीकडे दारूवर प्रचंड कर लादून ती महागडी करून टाकायची, दारूची कारखानदारी वाढवायची आणि दुसरीकडे गरीब श्रमिकांच्या श्रमपरीहाराला विषारीरसायनयुक्त जीवघेणं बनवायचं, ह्या मूर्खाच्या नंदनवनातून बाहेर येण्याचा उपाय काय?

Thursday, 26 March 2015

विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण?

पोस्टमार्टेम रिपोर्ट
विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण, हा आजचा कळीचा मुद्दा आहे. एकही सामना न हरणारी टीम इंडिया तब्बल १०० धावांनी का पराभूत झाली? त्याची कारणे तपासून पहिली तर काही चुका स्पष्ट दिसून येतात.

यादव-शमिने १० षटकात ५० धावा देऊन वॉर्नरचा महत्वाचा बळी घेऊन छान सुरुवात केली. पण नंतरच्या गोलंदाजांनी (अश्विन, जडेजा, मोहित) २० षटकांत फक्त गोलंदाजीच्या पाट्या टाकल्या. मधल्या ओव्हर्समध्ये जेव्हा फलंदाज आक्रमक नसतात तेव्हा आपल्या वाट्याच्या ओव्हर्स खपवून बाजूला होणारे गोलंदाज काय कामाचे ? ३५व्या षटकात परत येउन यादवने स्मिथचा बळी घेतला तोपर्यंत ओस्ट्रेलियाच्या २०० धावा फलकावर लागल्या होत्या. उर्वरित १५ षटकांत ते हाणामारी करून धावांचा डोंगर रचणार हे स्पष्टच दिसत होते.

तसेच फलंदाजीत रोहित आणि शिखरने छान सुरुवात करून दिल्यावर आणि तद्नंतर शिखर, विराट, रोहित हे स्टार फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यावर रैना, जडेजा हि लोअरमिडलऑर्डर राहणे-धोनीसोबत उभी राहिली नाही. हा भारतीय संघातील ठळक लूपहोल होता, जो आजच्या महत्वाच्या सामन्यात उघडा पडला.
साखळी फेरीतील सामन्यात आपल्या टीम मधले हे कच्चे दुवे बदलण्याची गरज होती. सुरुवातीचे सामने जिंकल्यानंतर आणि क्वार्टरफायनलमध्ये जागा पक्की झाल्यांवर आपल्याकडे दोन सामने उपलब्ध होते. त्यात हि कमजोर कडी बदलता आली असती. हि कमजोर कडी म्हणजे रवींद्र जडेजा होता, हे स्पष्ट होते. एकतर फिरकी गोलंदाज म्हणून तो प्रभावी ठरत नव्हता आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडून कामगिरीची अपेक्षाही नव्हती. संघ जिंकत असल्याने हि कमजोरी उघड होत नव्हती आणि ते छुपं ठेवण्यातच संघव्यबस्थापनाने चूक केली.

इंडिया क्वार्टरफायनलमध्ये पोहोचली तोपर्यंतची कामगिरी पाहता जी धोक्याची घंटा वाजत होती ती कुणी लक्षात घेतलि नाही. भारताची फलंदाजी मुख्यत: रोहित, धवन, कोहली ह्या स्टार फलंदाजांवर अवलंबून आहे. त्यातला एकहीजण खेळला तर आपली धावसंख्या चांगला आकार घेते. पण ते जर लवकर तंबूत परतले तर आपली तळाची फलंदाजी कशी ढेपाळते ते वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले होते. मोजक्या धावांचे आव्हान असूनही रैना, जडेजा हे मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. उसळत्या चेंडूवर त्यांची फलंदाजी अक्षरश: उघडी पडताना आपण नेहमी पाहतो. अर्थात, पुढच्या बाद फेरीत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ह्या मातब्बर संघांसमोर त्यांची काय अवस्था होईल त्याचा विचार करता, संघात काही बदल अपेक्षित होते.

पहिले चार फलंदाज आणि यादव, शमी हे द्रुतगती गोलंदाज हि आपली बलस्थाने आहेत. कर्णधार धोनी स्वत: एक वादातीत शक्तीस्थान आहेच. पण भारतीय संघात एक चेन्नई सुपरकिंग्स नावाचा उपसंघ आहे. धोनी आणि त्याचे शिलेदार (अश्विन, जडेजा,रैना, मोहित) हा तो उपसंघ. पैकी अश्विन सध्या बरी स्पिन टाकत होता. मोहित शर्मा मूळ संघात नव्हता, तरीही तो मिळालेल्या संधीचे सोने करीत होता. रैनादेखील खेळपट्ट्या फलंदाजीस पोषक असल्याने चांगली कामगिरी करीत होता.

पण प्रश्न होता जडेजाच्या लोअर मिडलऑर्डर फलंदाजीचा आणि पाचव्या गोलंदाजाचा. हि संघातील कमजोर कडी होती. परंतु त्या उपसंघाचा आपसात किती विश्वास असतो ते जडेजाने जेव्हा रिव्ह्यू मागितला तेव्हा दिसले. धोनीला खात्री नसूनही केवळ जाडेजाच्या आग्रहाखातर त्याने तो रिव्ह्यू कसा घेतला ते पाहता, चेन्नई सुपरकिंगच्या खेळाडूंसाठी संघाला दुय्यम महत्व दिले जाते कि काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.
खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर जडेजाची स्पिन अयशस्वी ठरल्याने जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला खेळविणे गरजेचे होते. किंवा खेळपट्टी जर तेज गोलंदाजीला पोषक असेल तर भुवनेश कुमारला चौथ्या बॉलरच्या स्वरुपात संघात घेऊन आक्रमणाची धार वाढविता आली असती. तसंही गेल्या दोन वर्षातील तो भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असूनही त्याला दुर्लक्षित ठेवून काय साध्य झाले? किंवा बिन्नीला संधी देवून त्याच्या फलंदाजीचाही तळाला फायदा करून घेत आला असता. किवा कदाचित इशांत शर्माच्या जागी बदली खेळाडू घेतला गेल तेव्हाच अनफिट जाडेजाच्या जागी युवराजसिंगचा विचार करण्याची संधी होती, ती संघ-व्यवस्थापनाने दवडली. इथेही सीएसके कनेक्शन संघाच्या आड आले असंच दिसून येईल. आज जेव्हा एक विकेट लवकर पडल्यावर ओस्ट्रेलियाने १८० धावांची मोठी भागीदारी केली तेव्हा भुवि किंवा अक्षरसारखा विकेटटेकिंग गोलंदाज महत्वपूर्ण ठरला नसता काय?

तसेच रैना हाणामारीच्या षटकांत निर्णायक फटकेबाजी करू शकतो. पण चार विकेट लवकर पडल्या तर वरच्या क्रमांकावर त्याची हतबलता पाहता एक्स्ट्रा फलंदाज खेळवून रैनाला खालच्या क्रमांकावर आणणे गरजेचे होते. मग आपल्याला पाचव्या क्रमांकावर रायुडूला घेऊन आणि रैनाला सहाव्या क्रमांकावर पाठवून फलंदाजीची खोली वाढवता आली असती का? ते दोघे मिळून १० षटके टाकतील तर ते शक्य झाले असते. तसंही रैनाने मागच्या एक सामन्यात एकट्यानेच १० षटके टाकली होती. म्हणजेच आज गरज असताना रायुडूच्या स्वरुपात आपल्याला पाचव्या क्रमांकावर एक विश्वासार्ह फलंदाज मधल्या फळीत मिळाला असता आणि रैना तळाला सहाव्या क्रमांकावर धोनीसोबत मोठे फटके खेळू शकला असता.
असे असताना भूवीच्या स्विंग वर विश्वास का ठेवला नाही ? किंवा अक्षर पटेलच्या प्रभावी फिरकीचा ऑप्शन का वापरला गेला नाही? किंवा बिन्नीच्या अष्टपैलू खेळाचा पर्याय का चाचपडून पहिला नाही?
खरंतर रायुडूच्या रूपाने एक अधिक फलंदाज घेऊन रैना आणि इतरांच्या गोलंदाजीचा पर्याय सर्वाधिक उपयुक्त ठरला नसता?

पण बादफेरीत पोहोचल्यावरही उर्वरित दोन सामन्यात वरीलपैकी कोणताही बदल न करून संघव्यवस्थापनाने नक्की काय साधले? ह्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे आणि ते म्हणजे भारतीय संघावर असलेला अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा. जी टीम जिंकतेय तिच्यात मुळीच बदल करायचा नाही, ह्या सुपरस्टीशनच्या आहारी कोण गेले होते, ते स्पष्ट व्हायला हवे. आपले आजीमाजी दिग्गज खेळाडूदेखील ह्या अंधविश्वासाच्या जाळ्यात पूर्वापार फसलेले असतात. ह्या सुपरस्टीशनच्या प्रभावामुळेच संघात आवश्यक बदल केले गेले नाहीत, असंच दिसते. संधी असूनही तसा प्रयोगदेखील केला गेला नाही.क्रिकेट हा माईंडगेम, प्रेशरगेम , टेम्परामेंटगेम वगैरे असतो. पण व्यावसायिकता सोडून आपला संघ असा अंधश्रद्धाळू बनला. मग तिथे प्रोफेशनल ओस्ट्रेलियाच्या पुढे असल्या भोंगळ संघाचा कसा निभाव लागणार? अर्थात टीम इंडियाचे संघव्यवस्थापन म्हणजेच कर्णधार धोनी, रविशास्त्री, आदि तज्ञमंडळी ह्या पराभवाचे खरे गुन्हेगार आहेत.

Wednesday, 25 March 2015

सचिनवर विनाकारण आगपाखड करणाऱ्याचे काय होते?

सचिनवर विनाकारण आगपाखड करणाऱ्याचे काय होते?

उदाहरणार्थ एक हेन्री ओलोंगा नावाचा गुणी खेळाडू होता. आधीच्या सामन्यात सचिनला एक अनप्लेयेबल उसळता चेंडू टाकून त्याने बाद केले आणि त्या जोशात त्याने सचिनचं फ़ेअरवेल सुद्धा सिलेब्रेट केलं. मग पुढच्याच सामन्यात सचिनने ओलोंगाला बॉस कोण ते दाखवून दिलं. ओलोंगाला मैदानाच्या चारी बाजूना असा काही फोडून काढला कि भांबावलेल्या ओलोंगाचा ठिक्करचेहरा आजही कित्येकांना आठवत असेल.
अँडी कँडीक नावाचा एक इंग्लिश बॉलरने सुद्धा सचिनबद्दल अशाच काही वल्गना केल्या होत्या. पुढच्याच सामन्यात सचिनने त्याला मिडविकेट वरून असा काहि स्टेडीयमच्या बाहेर फेकला कि पुन्हा कधी क्याडिक हे नाव क्रिकेट मध्ये दिसले नाही.

तसंच शोएब अख्तरलासुद्धा पॉइन्ट वरून मैदानाच्या बाहेर पाठवून सचिनने त्याची जागा दाखवून दिली होती. एकूणच काय, ओलोंगाभौ असो कि क्याडिकभाऊ...सचिनवर फाल्तूची आगपाखड करणाऱ्यांची हि अशीच गत होते.
.....अ पु र्ण

Monday, 23 March 2015

"आजादी बिना खड्ग बिना ढाल"???

" साबरमती के संत के संत तूने कर दिया कमाल" हे काव्य गांधीजींसाठी लिहिलंय. मग त्यात कवी प्रदीप ह्यांनी सदर काव्यात क्रांतिकारकांचा अपमान करण्याचा संबंध कुठे येतो?
गांधींच्या अहिंसावादी आणि सत्याग्रही मार्गाला "आजादी बिना खड्ग बिना ढाल" नाही म्हणायचे ?
कवीने गांधींच्या अहिंसावादी आणि सत्याग्रही मार्गाला "आजादी बिना खड्ग बिना ढाल" अस संबोधले आहे. त्याला क्रांतिकारकांच्या सशस्त्र लढ्याशी जोडण्यात चूक होईल.
क्रांतिकारकांवर असंच काव्य प्रदीपनी लिहिलं असतं तरी तोच आशय प्रकटला असता

"आजादीकि जंगमें तुमने दिया बलिदान
भगत राजगुरू सुखदेव तुम महान."
असंच काहीतरी कवींनी लिहिलं असतं, नाही का?

कवी प्रदीप ह्यांचे मूळ गीत असे आहे:
दे दी हमें आज़ादी बिना खड्‌ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
धरती पे लड़ी तूने अजब ढब की लड़ाई
दागी न कहीं तोप न बंदूक चलाई
दुश्मन के किले पर भी न की तूने चढ़ाई
वाह रे फकीर खूब करामात दिखाई
चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
शतरंज बिछा कर यहां बैठा था ज़माना
लगता था कि मुश्किल है फिरंगी को हराना
टक्कर थी बड़े ज़ोर की दुश्मन भी था दाना
पर तू भी था बापू बड़ा उस्ताद पुराना
मारा वो कस के दांव कि उल्टी सभी की चाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
जब जब तेरा बिगुल बजा जवान चल पड़े
मजदूर चल पड़े थे और किसान चल पड़े
हिन्दू व मुसलमान सिख पठान चल पड़े
कदमों पे तेरे कोटि कोटि प्राण चल पड़े
फूलों की सेज छोड़ के दौड़े जवाहरलाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
मन में थी अहिंसा की लगन तन पे लंगोटी
लाखों में घूमता था लिये सत्य की सोंटी
वैसे तो देखने में थी हस्ती तेरी छोटी
लेकिन तुझे झुकती थी हिमालय की भी चोटी
दुनियां में तू बेजोड़ था इंसान बेमिसाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
जग में कोई जिया है तो बापू तू ही जिया
तूने वतन की राह में सबकुछ लुटा दिया
मांगा न कोई तख्त न तो ताज ही लिया
अमृत दिया सभी को मगर खुद ज़हर पिया
जिस दिन तेरी चिता जली रोया था महाकाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
- कवी प्रदीप

गांधीजींच्या जीवितकार्याचे यथार्थ वर्णन कवी प्रदीप ह्यांनी ह्या गीतात केले आहे.
ह्याच प्रदीपनि " ए मेरे वतन के लोगो.." लिहिलंय. तसंच त्यांनी "आज हिमालय कि चोटीसे फिर हमने ललकारा है, दूर हटो ए दुनियावालो हिंदोस्तान हमारा है." हे काव्य लिहिलंय.
प्रत्येक काव्याला वेगळा आशय-विषय असतो. त्यातून कुतर्क काढून काय मिळणार आहे?
पण गांधी जयंती असो कि पुण्यतिथी किंवा शहीद दिवस असो. गांधींची आठवण झाल्याशिवाय त्यांच्या विरोधकांनाहि चैन पडत नाही, हेच महात्म्याच्या यशाचे चिरंतनरहस्य असावे.
असो.

Friday, 20 March 2015

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्यगीत.

'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत आहे तर 'वन्दे मातरम' हे राष्ट्रीय गीत आहे. दोन्ही बद्दल उलटसुलट चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात. मुख्यत: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नसलेल्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांकडून मुस्लिमविरोधाचे साधन म्हणून ह्या वादाचा उपयोग केला जातो. 'वन्दे मातरम' वरून मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याची सुवर्णसंधी अशा लोकांना प्राप्त होते हे उघड आहे. तसेच काँग्रेस, सेक्युलर वगैरे मंडळीना झोडपण्याची संधी 'जन गण मन' ला वादग्रस्त ठरवून प्राप्त होते! पण मुळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून दोन हात लांब राहून उलटपक्षी ब्रिटीश सत्तेशी सोयीस्कर सलोखा ठेवणारे हिंदुत्ववादी कोणत्या अधिकाराने हि उठाठेव करतात? भारतमातेच्या स्वातंत्र्यहोमात 'वन्दे मातरम' किंवा 'जन गण मन' पैकी कोणतेही गीत त्यांनी गायले नाही हे वास्तव कसे विसरता येईल?

पैकी 'वन्दे मातरम' बंकिमचंद्र चाटर्जी ह्यांच्या १८८२ मधील आनंदमठ ह्या कादंबरीतून प्रसिद्ध झाली. तर 'जन गण मन' गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी १९११ मध्ये लिहिले. ('अमर सोनार बांगला' हे बांगलादेशचे राष्ट्रगीतदेखील रबिन्द्रनाथ टागोरानि १९०५ मध्ये लिहिलेल्या एका गाण्यातून घेतले गेले आहे.)
दोन्ही गीतांचे आजच्या परिप्रेक्षात तटस्थ विश्लेषण केले तर काही वेगळा विचार करता येईल.
पैकी वन्दे मातरम मध्ये 'वन्दे मातरम' हे दोन शब्द सोडता मातृभूमीचे वर्णन करणारी कविता एवढेच तिचे स्वरूप आहे असे दिसेल.

उदाहरणार्थ :
सुजलां सुफलाम्, मलयजशीतलाम्, शस्यशामलाम्
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्, फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
'जन गण मन' देखील भारतभूमीच्या भौगोलिक समृद्धीचे वर्णन करणारे काव्य असल्याचे दिसते.

उदा.
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छलजलधितरंग
इक्बाल लिखित 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा' देखील ह्याच पठडीतले आणखी एक गीत.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वन्दे मातरमचे योगदान अनन्यसाधारण असेच आहे, ह्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. 'वन्दे मातरम' हे दोनच शब्द अक्षरश: भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा ठरले. असे असूनही राष्ट्रगीत म्हणून 'वन्दे मातरम' ऐवजी 'जन गण मन' ची निवड करावी लागली हि वस्तुस्थिती आहे. देशातील काही जनसमूहांचा 'वन्दे मातरम'ला विरोध असून भारतीयराष्ट्राच्या विविधतेच्या संकल्पनेचा संकोच होत असल्याने राष्ट्रगीत म्हणून ते मागे पडले, हे स्पष्ट आहे. काळाच्या ओघात कित्येक महान संकल्पना मर्यादित होऊ शकतात आणि ते मान्य करण्यात काही गैर नाही.

तसेच 'जन गण मन' देखील तत्कालीन भारतभाग्यविधाता पंचम जॉर्जच्या भारतातील आगमनाप्रीत्यर्थ लिहिले गेल्याचा आक्षेप घेतला जातो. त्यात तथ्य देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात कालपटलावर त्यालाही मर्यादा पडल्याचे मान्य करावे लागेल.
इथे आणखी एका गीताचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्यगीत.

"जयोस्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवति, त्वामहं यशोयुतां वंदे "
भारतभूमीच्या स्वातंत्र्याचे मूर्तिमंत काव्यस्वरूप ह्या गीताच्या शब्दाशब्दातून उमटते आणि प्रत्येक भारतीयाच्या रोमारोमातून ते स्फुरण पावत राहते.
"स्वतंत्रते भगवती I चांदणी चमचम लखलखशी"
आणि
"तूं सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची"
अशी महान देशप्रेमाची उधळण देखील त्यात आहे.
"गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली"
किंवा
"जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तेंतें"
अशी मातृभूमीवरील मंगल प्रेमाची कवितासुद्धा आहे.
"हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला..."
किंवा
"स्वतंत्रते, ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला?
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला.. "
असे उज्ज्वल ऐतिहासिक-भौगोलिक समृद्धीचे गाणे दिसेल.
त्यात राष्ट्रप्रेमाचे, अत्युच्च बलिदानाचे स्तोत्र देखील आहे.
"हे अधम रक्त रंजिते I सुजन-पुजिते ! श्रीस्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण.."

सावरकरांच्या हिंदुत्व किंवा तत्सम राजकीय प्रणालीशी कितीही वैचारिक वाद असेल, किंबहुना त्यांच्या तथाकथित हिंदुत्वाला प्रखर विरोधच राहील. परंतु एक राष्ट्रभक्तीपर काव्य म्हणून विचार केला तर "जयोस्तु ते.. " एक परिपूर्ण आणि केवळ ग्रेटच सिद्ध होते. माझ्या मते हे एक गीत भारतदेशाचे राष्ट्रगीत, राष्ट्रीयगीत इत्यादी स्तरांवर शोभेल अश्या सर्वाधिक योग्यतेचे आहे.

(अर्थात हिंदुत्ववाद्यांना अशा मुलभूत गोष्टीत रस नसतो. सावरकरांचे 'जात्युच्छेदक निबंध' किंवा 'विज्ञाननिष्ठ निबंध' हे कालातीत विचार बाजूला ठेवून हिंदुत्वासारख्या कालबाह्य प्रणालीवर पोळ्या भाजण्यात ते दंग असतात.)

Saturday, 7 March 2015

भारताचे विश्वचषकातील आव्हान: महत्वपूर्ण बदल अपेक्षित

इंडिया क्वार्टरफायनलमध्ये पोहोचलीय. पण आतापर्यंतची कामगिरी पाहता जी धोक्याची घंटा वाजतेय ती कुणी लक्षात घेत नाही.

कालच्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात देखील हि धोक्याची घंटा वाजली. भारताची फलंदाजी मुख्यत: रोहित, धवन, कोहली, राहणे ह्या चारजणांवर अवलंबून आहे. त्यातला एकहीजण खेळला तर आपली धावसंख्या चांगला आकार घेते. पण ते चारहीजण जर लवकर तंबूत परतले तर आपली तळाची फलंदाजी कशी ढेपाळते ते कालही पाहायला मिळाले. मोजक्या धावांचे आव्हान असूनही रैना, जडेजा हे मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. उसळत्या चेंडूवर त्यांची फलंदाजी अक्षरश: उघडी पडताना आपण पाहतो. अर्थात, पुढच्या बाद फेरीत न्यूझीलंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया ह्या मातब्बर संघांसमोर त्यांची काय अवस्था होईल त्याचा विचार करता, संघात काही बदल अपेक्षित आहेत.

पहिले चार फलंदाज आणि यादव, शमी हे द्रुतगती गोलंदाज हि आपली बलस्थाने आहेत. कर्णधार धोनी स्वत: एक वादातीत बलस्थान आहेच. पण भारतीय संघात एक चेन्नई सुपरकिंग्स नावाचा उपसंघ आहे. धोनी आणि त्याचे शिलेदार (अश्विन, जडेजा,रैना, मोहित) हा तो उपसंघ. धोनी सोडता बाकीचे सर्वजण श्रींनी किंवा धोनीच्या कृपाशीर्वादाने संघात आहेत, हे स्पष्ट आहे. पण सध्या ते वर्ल्डकप खेळत आहेत, हि वस्तुस्थिती स्वीकारून त्यांचे विश्लेषण करावे लागेल.

अश्विन सध्या बरी स्पिन टाकतोय. मोहित शर्मा मूळ संघात नव्हता, तरीही तो मिळालेल्या संधीचे सोने करतोय. पण त्याची जागा भुवनेश कुमार घेऊ शकतो.

प्रश्न आहे ती रैना आणि जडेजा ह्या लोअर मिडलऑर्डरचा. हि संघातील कमजोर कडी आहे. रैना हाणामारीच्या षटकांत निर्णायक फटकेबाजी करू शकतो. पण चार विकेट लवकर पडल्या तर वरच्या क्रमांकावर त्याची हतबलता चिंताजनक आहे. जडेजा देखील तिथे उपयुक्त नाही. जडेजाची स्पिन देखील परिणामकारक नाही. जाडेजाच्या जागी अक्षरला खेळवावे तर त्याच्याही फलंदाजीबद्दल शाश्वती देत येत नाही. बिन्नी देखील फलंदाजीत यशस्वी ठरलेला नाही.

मग आपल्याला पाचव्या क्रमांकावर रायुडूला घेऊन आणि रैनाला सहाव्या क्रमांकावर पाठवून फलंदाजीची खोली वाढवता येईल का? ते दोघे मिळून १० षटके टाकतील तर ते शक्य आहे. अन्यथा रैनाच्या जागी अक्षर किंवा जडेजा किंवा बिन्नी पैकी एकाची खेळपट्टीचे स्वरूप पाहून निवड व्हावी. पण रायुडूच्या विश्वासार्हतेची मधल्या फळीत आत्यंतिक गरज आहे. पुढच्या दोन सामन्यात रैना-जडेजाच्या बदलीचे प्रयोग करून बादफेरीतील संघ निश्चित करावा लागेल. भारताचे विश्वचषकातील आव्हान ह्या महत्वपूर्ण बदलावर अवलंबून असेल.

Wednesday, 4 March 2015

गोवंशहत्याबंदीच्या फतव्यावरील चर्चेतून ...

गोवंशहत्याबंदीच्या फतव्यावरील चर्चेतून ...

गावी माझ्याही घरात बैल होते. बैलगाडीला जुंपणारे आणि शेतात नांगर ओढणारे बैल. खूप प्रेमाने जोपासलेली बैलजोडी. म्हसा, घोटी अशा लांबच्या बाजारातून बैल हौसेने खरेदी करून आणले जात. दुधदाती, दोनदाती, चारदाती अशा प्रकारचे आणि तत्सम अनेक गुण-दोष पारखून बैलांचे सौदे होत असत. आमचे अण्णा बैल ह्या विषयातले मनस्वी जाणकार. वर्षभरात फक्त घरच्या शेतीसाठी वापरल्याने आमचे बैलदेखील देखणे, धष्टपुष्ट राहत. शेजारच्या गावातून हौशी लोक ते बैल पाहण्यासाठी येत.

एकदा असाच आमचा एक बैल शेजारच्या गावी विकला गेला. तांबड्या-पांढऱ्या (तांबाबाळा) रंगाचं उमदं जनावर. सुडौल शिंगे. त्याचा आम्हाला आणि त्यालाही खूप लळा लागला होता. त्याचा नवा मालक बैलगाडी घेऊन गावात आला तर हा गाडी खेचत घेऊन घरी येई. नित्यनेमाने त्या गावातून पळून तो आमच्या घरी येई. आमच्या ह्या पाहुण्याचा मग सणच साजरा होई. जो तो त्याला शक्य असेल ते खायला प्यायला देई. आई त्याला सुपात तांदूळ खायला देईल तर बाबा त्याला तेल पाजत. कुणीतरी पेंढा आणून त्याच्या पुढ्यात टाकी तर कुणी त्याला पेंड खायला घाली. असा सोहळा चालत असताना त्याचा मालक धापा टाकत येई. ह्याने तोडलेला दोर (दावे) हातात घेऊन तो आला कि पुन्हा निरोपाचा हृदयद्रावक प्रसंग उभा राही. कित्येक वर्षे न चुकता तो पाहुणा घरी येतच राहिला...

पण ह्याच बैलांच्या खुरांमध्ये जेव्हा रोग होऊन किडे पडतात तेव्हा त्याची किती निगा राखावी लागते? पावसाळ्यात त्या बैलांच्या गोठ्यातून मच्छर डासांचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा रात्रीतून कितीदा उठून धूर करून त्यांची काळजी घायवी लागते? त्यांच्या रोजच्या चारावैरण, पाण्यासाठी किंवा गोठ्यातून शेण काढून स्वच्छता ठेवण्यासाठी, उन्हाळा असो कि पावसाळा, किती मेहनत घ्यावी लागते? (अत्यंत जिकीरीचे आणि तेवढेच खर्चिक असणारे हे बैलांचे लोढणे मी अलीकडे मोठ्या शिताफीने किंवा निष्ठुरपणे काढून टाकायला लावले...)

पण ह्याच बैलांना बडवण्याचा 'अमानुष' कार्यक्रम कुणी पहिला असता तर... किंवा त्यांची शिंगे छाटण्याचा 'रक्तरंजित हिंस्त्र' प्रसंग अनुभवला असता तर... संवेदनशील वर्गाच्या जीवाचा थरकाप होईल. आणखी किती कायदे करावे लागतील? शेतकरी दिवाळीत बैलांना अग्नीवरून उड्या मारायला लावतो, म्हणून काही लोक त्या अंधश्रद्धेच्या नावाने पोस्ट टाकतात. पण शेतकरी पोटच्या अपत्याप्रमाणेच आपल्या गुराढोरांवर प्रेम करतो. दिवाळीत स्वत:हि बैलांच्या सोबत आगीवरून उड्या मारतो. सणासुदीला बैलांच्या शिंगाना गेरुचा (का होईना!) रंग लावून, स्वत:च्या सोबत त्यानाही सणासुदीत सामावून घेतो, हे कुणी लक्षात घेत नाही.

गावात आमच्या शेजारी एक नथू राहत असे. त्याचा गुरेढोरे पाळायचा धंदाच होता. बाहेरच्या गावातील लोकही त्याच्याकडे गाई ठेवत असत. गाय व्याली कि नथुला ठरलेले पैसे देऊन ते गाई घेऊन जात, अशा प्रकारचा धंदा चाले. सदैव अठरा विश्वे दारिद्र्यात नांदणाऱ्या नथूच्या गोठ्यात दुधदुभत्यांची कधीच कमी नसे! कधीतरी नथूसुद्धा एखाद दुसरी गाय कसायला विकत असे. त्यामुळे आमच्या संवेदनशील घरात नथूबद्दल असंतोष पसरत असे. नथुने असं निर्दयी कृत्य करायला नको अशी आमची ठाम समजूत होती.

पण नथुचि व्यथा काय असते, ते माझा मित्र शरद पाटीलच्या अस्सल ग्रामीण कृषीवल जीवनानुभवातून ऐका...
" कसायाच्या हातात हरण्याला देताना आबाच्या पोटात गोळाच आला होता. आबानं हरण्याचं कासरं खांद्याला लावलं कसायानं दिलेलं पैसं न मोजताच खिशात सारलं आणि घरची वाट चालायला आबानं सुरवात केली. अंधारून आलं होतचं,गाव तसं जवळचं होतं आबा पाय पण झपाझप उचलत होता पण वाट तुटता तुटतं नव्हती. मागचं सहा महिने असचं होतं होतं,बाजारात हरण्याला आबा घेवून यायचा....आणि संध्याकाळी परत त्याला घरला घेवून जायचा.
चित्र्या आणि हरण्या बैलजोडीनं आबाचं घर वर आणलं होतं. दोन वर्षापूर्वी घसारतीला गाडी उधळल्याचं निमित्त झालं..आणि चित्र्या हरण्याच्या पायांना दुखापती झाल्या. चित्र्या तीन चार महिन्यात दगावला पण हरण्या मात्र वाचला. पण त्याच्या पायाची दुखापतं त्याला खंगवत होती. आबाला आणि घरच्यांना ते हाल बघवतं नव्हते आणि हरण्याला बाजाराला न्यायला आबा तयार झाला पण कसायाच्या हातात कासरा द्यायला त्याचं मन धजावत नव्हतं. आठ दहा बाजार असेच गेले. आणि आज शेवटी हरण्याला कसायाकडं सोपवून आबा घरच्या रस्त्याला लागला.
वस्तीवर पोहचेपर्यंत आबाला रात्रीचे दहा वाजले होते. घरात शिरतानाच पायांच्या आवाजनं बाजवरं पडलेल्या तात्यांच्या हाथरूणात जरा हालचाल जाणवली. रोज नऊ साडे नऊ वाजता झोपणारा बा आज दहा वाजून गेलं तरी हाथरूणात कुशी बदलत पडून होता. आबाला कसंनुसचं वाटलं. सोप्यात पायतान काढून आबा आत गेला, बायको मदघरात कापडांच्या घड्या घालतं होती...,"येळ केला यायला..." असं काही तरी तीनं विचारलं असं आबाला वाटून गेलं. फक्त हम्म असा अस्पष्टसा हुंकार आबाच्या तोंडातनं बाहेर पडला.मोरीत जावून आबानं हातपाय धुतलं आणि कमरेला टाॅवेल गुंडाळून आबा बाहेर आला. बायकोच्या शेजारीचं तिच्या मांडीवर डोकं ठेवून आबाचा लेक,चिन्या झोपला होता. चिन्याच्या गालावर रडलेल्याच्या खूणा आबाला लांबून ही ओळखता आल्या,बायको ही मान खाली घालूनच कापडांच्या घड्या घालत होती. तिथूनचं आबाचं लक्ष स्वयंपाकघरात, चुलीकडं गेलं तर चुल थंड होती...काय झालं माहीत नाही. आबाला अचानक भरून आलं गळ्यातला हुंदका तसाच दाबून धरून आबा घराबाहेर आला आणि घराशेजारच्या सपरात येवून हरण्या उभा असायच्या रिकाम्या जागेकडे बघून हमसून हमसून रडू लागला....." (... Sharad Patil )

शोभेची भारी कुत्री घरात बाळगणाऱ्या शहरीवर्गाला गुरेढोरे पाळणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा कशी कळावी? ह्या संवेदनशील (!) वर्गाने धार्मिक श्रद्धेच्या भाकडकथा सांगाव्यात आणि त्यासाठी सरकारने कायद्याचे बडगे उगारावेत?

म्हणून प्रकाश झावरे पाटील सरांच्या पोस्टमाधील दाहक अगतिकता मनाला चटका लावून जाते:
" शेतकरी गाय विकत घेतो. संगोपनावर खर्च करतो. ती त्याची खाजगी मालमत्ता आहे. कोणत्याही धर्माची किंवा धर्म मार्तंडांच्या बापाची नाही. त्या मालमत्तेचा विनियोग करण्याचा हक्क त्याचा स्वत:चाच असणे नैसर्गिक न्यायाचे आहे. कोणत्याही धर्माचा संस्कृतीचा समाजाचा व शासनाचा त्यामधील हस्तक्षेप ही हुकुमशाहीच असेल.
तुमचे घर जुने पडके झाले तरी विक्रीच करता दिड शहाण्यांनो..! कारण ते तुम्ही विकत घेतलेले असते.
शेतकर्याला "दानधर्मात " गायींची प्राप्ती होत नाही. त्याला मोफत गायी द्या ..संगोपनाचा खर्च द्या तो त्या भाकड असल्या तरी सांभाळीलच..कसायाला विकणार नाही. तुमच्या सर्वांपेक्षा तो दयाळू आहे..
शेतकर्यांनो भारतीय वंशाच्या दिवसभरात घरदार खाऊन जास्तीत जास्त 2 ते 2.5 लिटर दूध देऊन 10 लिटर मुतणार्या गायी पाळू नका. बँकेतून कर्ज मिळवा विदेशी बिज असलेली " होस्टेन " गाय घ्या. किंवा म्हैस घ्या..आधुनिक शेळी पालन करा. शेती भाडोत्री यंत्रांनी करा. बैलांचा आग्रह धरु नका. पशुपालन प्रचंड खर्चिक आहे. कोणत्याही पाप पुण्याचा विचार न करता भाकड जितराबांना व त्यांच्या मवाली धर्मसंहितेला तुमच्या प्रपंचातून गचांडी मारा.
" गोहत्त्या बंदी " या मवाली निर्णयावरील शेवटची पोस्ट..!!" (...Prakash Zaware Patil)

Sunday, 1 March 2015

'खोट्यावर खोटे'

'खोट्यावर खोटे' नावाची एक गोष्ट चांदोबामध्ये तीसेक वर्षापूर्वी वाचली होती.

तर, एका भल्या माणसाची बायको भारी कजाग होती. तिला खोटं बोलायची लयभारी खोड. एक खोटं बोलायचं आणि मग ते लपवायला खोट्यावर खोटं बोलत जायचं, अशी तिची आदत होती. नवऱ्याने कितीही समजावलं तरी ती त्याचे सल्ले नेहमी उडवून लावीत असे. ह्या भांडकुदळ आणि जहांबाज बाई पुढे नवऱ्याने बिचाऱ्याने अक्षरश: हात टेकले होते. तसंच शेजारी-पाजारी, गावकरी सर्वजण तिच्या खोट्या भाईगिरीने त्रस्त झाले होते.
....शेवटी खोटं बोलायच्या खोडीने ती स्वत: मोठ्या संकटात सापडते आणि तिचं पितळ उघडं पडते. 

अशी ती चांदोबामध्ये लहानपणी वाचलेली गोष्ट. त्यातलं ते चित्र मला आजही आठवते. शेवटी गयावया करणारी ती बाई आणि तिला सल्ल्यांची आठवण करून देणारा तो भला माणूस, असं ते छान चित्र होतं.

त्याचं असं झालं कि, 'मी मराठी लाइव्ह' ह्या नव्या दैनिकात शनिवारी एक तोरसेकरी खुसपट प्रसिद्ध झालंय. तसं पाहता ते खुसपट म्हणजे फिलॉसोफीचा उत्तम नमुना आहे, असा आभास होईल. पण एका नव्या दैनिकाच्या दुसऱ्याच अंकात तो विषयच मुळात 'गैरलागू' ठरतो आणि त्यातली 'भामटेगिरी' अधिकच ठळकपणे जाणवू लागते.

म्हणजे, हे तत्वज्ञान प्रिंट मीडियात प्रसवण्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर गेल्या काही दिवसातील सोशल मिडीयावर त्यांनी जी गरळ ओकलेय , त्याचाच प्रभाव त्या तत्वज्ञानावर आहे, असं दिसेल. कॉम्रेडहत्येनंतर नथुरामि प्रवृत्तींच्या वकिलीसाठी जी खोटं बोलायची उबळ लागली, तिचेच ठसके तोरसेकरी फिलॉसोफीतहि उमटले आहेत. त्यामुळे 'तुमच्याकडून हिच अपेक्षा होती' असंच शीर्षक खरंतर असायला हवं होतं. असो.

अर्थात, त्यांचं जे काही चाललंय ते दुसरं तिसरं काही नसून 'खोट्यावर खोटं' ह्या चांदोबातल्याच गोष्टीची नवी आवृत्ती आहे, एवढंच.

( ता.क. :सॉक्रेटिस सुद्धा बायकोच्या त्रासाने प्रभावित होऊन तत्वज्ञान वगैरे लिहू लागला कि काय असा विचार उगाच मनात येउन गेला. )
('अपूर्ण'...)

Tuesday, 24 February 2015

मुफ्ती मोहम्मद इलियास : देहदंडचा फतवा

अलीकडे जमीयत उलेमा या मुस्लिम संघटनेचे मुफ्ती मोहम्मद इलियास ह्यांनी "भगवान शंकराला पैगंबर मानण्यास मुस्लिमांची काहीच हरकत नाही. आमचे आई-वडील एक आहेत, त्यांचं रक्त एक आहे, त्या नात्यानं आमचा धर्मही एकच आहे," असं वक्तव्य करून "हिंदू राष्ट्राला मुस्लिमांचा अजिबात विरोध नाही. ज्याप्रमाणे चीनमध्ये राहणार चिनी, अमेरिकेत राहणारा अमेरिकी तसा हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. हे तर आमच्या देशाचं नाव आहे." अशीही भूमिका मांडली होती.
त्यावर आमच्या काही विद्वान मित्रांनी त्या भूमिकेमागच्या छुप्या अजेंड्याचा पर्दाफाश करून ते वक्तव्य म्हणजे पद्धतशीर इस्लामिकरणाचा धर्मांध डाव असल्याचा शोध लावला होता.
कालच कोणत्या तरी मुस्लिम संघटनेने त्या मुफ्ती मोहम्मद इलियासविरुद्ध सिरकलम फतवा काढल्याचे ऐकले.
मग आता त्या मुफ्ती मोहम्मद इलियासला खालीलपैकी कोणत्या वर्गात बसवायचं?
१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के इशारे पर शरीयत के खिलाफ उलटा-सीधा बयान देनेवाला इस्लामविरोधक ?
२. हिंदूंचे इस्लामीकरण करू पाहणारा हिंदुद्वेष्टा ?
३. सामाजिक सौहार्दासाठी कट्टर धार्मिकता सोडून व्यापक आणि क्रांतिकारक भूमिका मांडणारा आधुनिक अवलिया ?

 ऑल इंडिया फैजान-ए-मदीना काउंसिलचे अध्यक्ष मुईन सिद्दिकी ह्यांनी मुफ्ती इलियासला देहदंडचा फतवा सुनावला आहे! इस्लामच्या कट्टर धर्मगुरूना ते वक्तव्य इतकं टोकाचं इस्लामविरोधी आणि आक्षेपार्ह वाटतेय आणि आमचे काही विद्वान त्यावर संशोधन करून ते हिंदूविरोधी आणि इस्लामीकरणाचा डाव इत्यादी असल्याचं सांगताय. ह्या विरोधाभासाचा अर्थ काय? ते वक्तव्य दोन्ही बाजूंसाठी अडचणीचं का ठरावं?
मग पर्याय ३ जास्त विश्वासार्ह वाटतोय.

 
अर्थात मुफ्ती इलियास हा सामाजिक सौहार्दासाठी कट्टर धार्मिकता सोडून व्यापक भूमिका मांडणारा आधुनिक अवलिया असल्याचे चित्र समोर येते.
त्याचं किमान हिंदू वर्गाकडून तरी तहेदिल स्वागत व्हायला हवे होते. पण तसं झालेलं दिसत नाही. अशी प्रागतिक भूमिका मांडणाऱ्या मुफ्तीला दोन्ही बाजूकडून उडवून लावण्यात आले. कदाचित ती भूमिका दोन्ही बाजूंच्या सोयीची नसावी, एवढंच.

Sunday, 22 February 2015

आपले खड्डे आपणच खोदतोय : कॉम्रेड पानसरेंची हत्या


आणखी एका वयोवृद्ध तपोवृद्ध व्यक्तीवर भ्याडहल्ला. म्हाताऱ्या लोकांवर गोळ्या झाडण्याची आपली उज्ज्वल परंपराच आहे आणि असल्या हल्लेखोरांचे कायदा, सरकार, इ. मंडळी काही उपटू शकत नाही, हेदेखील दाभोळकर हत्येतून स्पष्ट झालंय. भेकडांना हिंसेचे आकर्षण असते असं म्हणतात, ते तंतोतंत खरं ठरवणारे भेकड आपल्या समाजात आहेत. हे भ्याड हल्लेखोर समाजातील वयोवृद्ध, निशस्त्र धुरिणांवर गोळ्या झाडून पळून जातात आणि हल्ल्याची जबादारी घेण्याची तात्विक बांधिलकी देखील ते दाखवू शकत नाहीत, हे त्यांच्या भेकडगिरीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या भ्याडपणातच त्यांच्या सनातन अपयशाचे रहस्य आहे.
विझल्या चितांचे निखारे धुमसत असताना अजून किती वधस्तंभ रक्त मागत उठणार आहेत? ...आणिअशा काळरात्रीत आयुष्याच्या मशाली पेटविण्याची आम्हाला जाग येत नसेल तर, कॉम्रेड पानसरे, माफ करा...आम्ही निद्रिस्त प्रेते आहोत. आमचा सूर्य अंधाराच्याच पखाली वाहणार आहे!
 
दुसरीकडे संवेदनशिलतेच्या मुद्द्यावरून मा. मुख्यमंत्री अडचणीत आल्याचे दिसते. कॉम्रेड कोल्हापुरात उपचार घेत होते तेव्हा ते सांगलीत असूनही त्यांना भेटू शकले नाहीत. तर, मुंबईत कॉम्रेडांची प्राणज्योत माळवली तेव्हा, नंतर विमानतळावर आणि कोल्हापुरात अंत्यसंस्कार झाले तेव्हा मा. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी ह्यांनी जी सरकारी अनास्था दाखविली, त्यामुळे एकूणच भाजप सरकारच्या संवेदनशिलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलंय!

एकूणच समाजातील दुभंगलेली मानसिकता कॉम्रेड पानसरेंच्या निघृण हत्येने फेसबुकवरही ठळकपणे प्रदर्शित होतेय. एका मोठ्या समाजघटकाची एकूणच संवेदनशीलता हरवल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा समोर येतेय. एकीकडे ह्या समाजसुधारकांच्या निघृण हत्येने स्तब्ध झालेला समाज आणि त्या समाजातील पुरोगामी, सेकुलर, परिवर्तनवादी, विवेकवादी विचाराचे बुद्धिमंत. तर दुसरीकडे त्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधावरच आक्षेप घेणारा एक समाज आणि त्यांचे पुरोगामी, सेकुलर अशा शब्दांवरच फुली मारणारे उजव्या विचाराचे बुद्धिमंत, असं समूळ दुभंगलेलं समाजचित्र स्पष्टपणे पाहता येईल.

कॉम्रेड पानसरे ह्या विशिष्ठ समाजाच्या 'धार्मिक भावना' दुखावत होते असा एकंदरीत पलीकडचा सूर आहे. डॉ. दाभोळकर हत्येच्या वेळीही त्या प्रवृत्तीने असंच मतप्रदर्शन मांडलं होतं. खरंतर भारतीय राज्यघटनेतील समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोण या मूल्यांचा प्रचार, प्रसार करण्याचे काम हे पुरोगामी, परिवर्तनवादी नेते, कार्यकर्ते समाजाच्या भल्यासाठीच करीत असतात. त्यांनी कुणाच्या धर्मावर आक्रमण केले नाही कि धर्मिक बाबीत हस्तक्षेप केला नाही. पण त्यांच्या समाज जागृतीच्या घटनात्मक कार्याने कुणाच्या 'धार्मिक भावना' वगैरे दुखावल्याचा प्रपोगंडा पलीकडल्या समर्थकांमध्ये पसरवला जात असेल तर ते त्यांचंच दुर्दैव आहे.

ही ज्ञानी मंडळी त्यांच्या विचारसरणीच्या समाजाला कोणते बाळकडू पाजणार आणि त्यातून कोणती विषवल्ली निपजणार ते वेगळं सांगायला नको. विचारवंतानी साहित्यातून निकोप समाजमनाच्या दृष्टीने तरी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून समाजाचं दिग्दर्शन करायचं कि समाजाची वैचारिक दिशाभूल करावी? आणि मुळातच त्या विध्वंसक प्रवृत्तीचं एकतर सर्रास उदात्तीकरण करून किंवा छुपी वकिली करून एका विकृतीला पाठीशी घातलं जातेय, हे जास्त चिंताजनक नाही काय?

डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर वर्षभरातच घडवलेली हि दुसरी निघृण हत्या. एकंच मोडस ओपरंडी दोन्ही हत्यांमध्ये वापरली गेली, हे तर उघड आहे. म्हणजे दोन्ही हत्यामागील सूत्रधार देखील एकंच असण्याची शक्यता तरी स्पष्ट दिसतेय. डॉक्टरांच्या हत्येवेळी वैयक्तिक वाद, जमिनीचे विवाद इत्यादी क्षुल्लक बाबींचा आधार घेणारे कॉ. पानसरेंच्या हत्येत टोल-राजकारणाकडे अंगुलीनिर्देश करू पाहतात. पण दोन्ही हत्येतील सुसूत्रता एकंच कॉमन मोटिव्ह असल्याकडेच लक्ष वेधू पाहतेय, त्याचं काय? दोन्ही प्रकरणातील ती एकसमानता म्हणजे दोन्ही समाजसेवकांनी धर्मांध कट्टरतावादी सनातनी प्रवृत्तीविरुद्ध उभा केलेला लढा, असंच सकृतदर्शनी दिसतंय.

अर्थातच, कॉ. पानसरेंच्या हत्येत ह्या सनातनी प्रवृत्तींचा हात असण्याची स्पष्ट प्रतिक्रिया समाजामध्ये पुन्हा उमटली. त्यावर विरोधी बाजूची नकारात्मक सनातनी मानसिकता देखील पुन्हा उघड झाली. त्यातून असल्या भ्याड हल्ल्यांचे हेतुपुरस्सर छुपे समर्थनच केले जाते हे पुन्हा स्पष्ट झाले. कॉम्रेड पानसरेंवर हल्ला झाल्यावर सनातनी नथुरामि प्रवृत्तीविरुद्धवर टीकेची पुन्हा झोड उठल्याने काहींचा पारंपारिक पोटशूळ जागा झाला. ह्या मंडळींची संवेदनशिलताच मरून गेली कि काय असा प्रश्न पडतो. दाभोळकरांपासून पानसरेंपर्यंत दिवसढवळ्या जे खून पडल्यात त्याची दाहकता तीव्रतेने गांधीहत्येची आठवण करून देते, हे साहजिकच आहे.

धर्मांध कट्टरतावादी आणि त्यांच्या टार्गेटवर असलेले समाजसेवक ह्यांचे ऐतिहासिक वैर उघड आहे. ह्या लढ्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विस्तृत कालखंड आहे. गांधीहत्येच्याही (आणि नथुरामाच्याही) पलीकडे त्याची सनातन पाळेमुळे पसरली आहेत. गांधींच्या खुनाप्रमाणेच दाभोळकरांपासून पानसरेंपर्यंत हल्लेखोरांनी वयोवृद्ध समाजसेवकांवर भ्याड खुनी हल्ले केल्याने त्या संदर्भात नथुराम आठवणे स्वाभाविकच आहे. उलटपक्षी गांधींचा लढा इंग्रजांसारख्या खऱ्या अर्थाने सुसंस्कृत शत्रूशी होता आणि म्हणूनच इंग्रजांची पाठ पडताच लगोलग आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या गांडूबगीच्यात त्या महात्म्याची हत्या झाली, असंच म्हणावे लागेल. आज आपण तद्दन रानटी लोकांच्या तालिबानी संस्कृतीत वावरतोय आणि विन्स्टन चर्चिलने स्वातंत्र्य देताना आपलं जे मुल्यांकन केलं होतं त्याची वास्तविकताच आपण सिद्ध करतोय.

एकंदरीत आपलं कठीण आहे, मितंरों... आपले खड्डे आपणच खोदतोय. असो.
सबको सन्मति दे भगवान...!

Wednesday, 18 February 2015

तंबाखूजन्य कॅन्सर: एक चर्चा

तंबाखू, गुटखा, सिगारेट आणी तत्सम तंबाखूजन्य व्यसनांमुळे समाजाचे प्रचंड नुकसान होत आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांना सामान्य लोकच नव्हे तर राजकीय नेतेही बळी पडत आहेत. म्हणून तंबाखूवर बंदी घालायची मागणी होत आहे. पण पुढे काय?

१०-१२ वर्षापूर्वीची घटना. भाटवडेकर नावाचे माझे मित्र आहेत. आम्ही एका प्रोजेक्टवर काम करत होतो. त्यांच्या पार्ल्यातल्या घरी नेहमी भेटत असू. तेव्हा त्यांनी सांगितलेली गोष्ट. त्यांचा एक जवळचा आप्त कॅन्सरग्रस्त झाला होता. बिच्चारा दिवसभर खुर्चीवर शांत बसून असे... नि:शब्द ! का? तर म्हणे त्याचं स्वरयंत्रच काढून टाकावं लागलं. घशाचा कॅन्सर होता आणि नेमका स्वरयंत्रावरच पसरला होता, वगैरे. पण महत्वाची गोष्ट हि, कि त्या सद्गुणी माणसाने आयुष्यात कधी तंबाखू, सिगारेट वगैरेना स्पर्शहि केला नव्हता. साधा सज्जन पापभिरू देवाधर्मातला माणूस, जो कधी दारूलाहि शिवला नव्हता. उदाहरणार्थ सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसलेला सच्छील माणूस. 
वरील प्रकरचा कॅन्सर तंबाखू मुळे झाला नव्हता हे खरे असले तरीही कॅन्सर किंवा कर्करोग आणि तंबाखू ह्यांचा घनिष्ठ संबंध आहेच. बर्याच प्रकारचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात आणि त्यावर तंबाखूजन्य व्यसने टाळणे हाच उपाय आहे.
महत्वाची गोष्ट ही गुटखा, तंबाखू, सिगारेट, मशेरी, इत्यादी व्यसने सहज उपलब्ध होणारी आहेत. अगदी कोणत्याही रस्त्याच्या बाजूला टपरीवर सिगारेट ४-५ रुपयात मिळते. (आता जरा महागली आहे.) त्यातही सहज चाळा (स्टाइल) म्हणून ओढणारेच अधिक असतात. चेनस्मोकर्स नावाचे अट्टलसिगरेटी हा एक वेगळा उच्चभ्रू वर्ग असतो. ते ग्रेट लोक्स असतात.  

पण डोक्याला चालना मिळावी म्हणून सिगारेट मारणारे बहुधा हौशी कलाकारच अधिक असतात. सॉफ्टवेअर, प्रोग्रामिंग, इंजिनियरिंग ह्या क्षेत्रातील मंडळी हटकून डोकं चालण्यासाठीच्या निमित्ताने सिगारेट मारताना दिसतील. थोड्याफार फरकाने तोच प्रकार बुद्धिजीवी, कलाकार, आदि मंडळीतही आणि इतरत्रही दिसेल. हा खरंतर फक्त त्या मानसिकतेचा पगडा असतो. बहुधा काहीतरी शुल्लक टाईमपास म्हणून सिगारेट हातात येते. त्याजागी कटिंग, चहा, कॉफी, चुइंगगम असलं काहीही चालू शकते. मध्यंतरी लंचनंतर सिगरेटची सवय लागली होती. सवयच ती... सोडली. आता बाहेर जाऊन टपरीवरचा कटिंग मारतो. सिगरेट आठवतदेखील नाही.
तंबाखू, बिडी, इ. प्रकार अंगमेहनतीची कामे करणारा शेतमजूर, कामगार वर्गामध्ये जास्त आढळतात. तर मशेरी गावाकडच्या स्त्रियामध्ये प्रचलित असते. गुटखा हा प्रकार मात्र ग्रामीण-शहरी असल्या सीमारेषा पलीकडचा आहे. खर्रा, मावा, पान हे तंबाखूजन्य पदार्थांचे आणखी काही नमुने. आपल्या तंबाखूची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा अशी कि आमचे काही मित्र परदेशात जाताना अगदी आठवणीने तंबाखूच्या पुड्या सोबत घेऊन जातात, तिकडे पंचाईत नको म्हणून.  

तंबाखू आणि दारू हि दोन्ही व्यसने असलेले लोक पुष्कळ आहेत. पण फक्त बियर किंवा फक्त सिगारेट अश्याही प्रकारात बरेच लोक येतात. पण "आयुष्यात कधीच दारूला शिवलो नाही" असं म्हणणार्या सिगरेटग्रस्तांपेक्षा "सिगरेटला स्पर्शही करीत नाही" म्हणणारे दारूबाज अधिक फायद्यात असल्याचं लक्षात येईल. तसंही सिगारेट मधून ओढणाऱ्याला कोणतं मोठं सुख मिळते?... तर दारूतून पिणाऱ्याला मिळणारं सुख वादातीत असतं...! असा अस्मादिकांचा अनुभव आहे.
दारू किंवा बियरचे दुष्परिणाम होत नाहीत असे नाही. अल्कोहोलच्या अतिसेवनाने लिव्हरवर घातक दुष्परिणाम होऊन अनेकांचे जीवन उध्वस्त होते. अकाली मृत्यू ओढवतो. पण मर्यादित मद्यसेवन शरीरास तेवढं घातक नाही. उलट मर्यादित तंबाखूसेवन किंवा मर्यादित सिगरेटओढ देखील तेवढंच कॅन्सरजन्य घातक ठरू शकते.

समजा, तंबाखू, सिगरेट, गुटखा आणि तत्सम कॅन्सरजन्य पदार्थ बंद करून त्याजागी ५ रु., १० रु. किमतीची बियरची पाऊच आपद्ग्रस्तांसाठी टपरीवर उपलब्ध करून देण्यात आली तर? किमान फावल्या वेळेत (किंवा कामाच्या वेळेतही ) काहीतरी टिवल्याबावल्या कराव्यात म्हणून टपरीवर सहज मिळणारी सिगारेट ओढणारी जी प्रवृत्ती आहे, तिला पायबंद घालता येईल? एका व्यसनाला दुसऱ्या व्यसनाने आळा घालण्याची हि शक्कल लढवून निदान कॅन्सरच्या विळख्यातून तरुण सुशिक्षित सिगरेटग्रस्त पिढीला तरी बाहेर काढता येईल???

Friday, 6 February 2015

" नही अंकल...नही अंकल...नही अंकल...": एका मोबाईलचोराची गोष्ट

परवाची गोष्ट. वसई रेल्वेस्टेशन . वेळ साधारण संध्या. ७ वा.

डहाणू लोकल ४ नंबरवर येत होती. मी एका मित्रासोबत गप्पा मारीत उभा होतो. सुशील मला रिलायन्सच्या नव्या इन्शुरन्सबद्दल सांगत होता. लोकल आल्यावर गर्दी उसळली. उतरणारे, चढणारे सगळ्यांचा झुंबडगुंता नेहमी होतो तसाच झाला. पहिल्या दरवाज्यात गर्दी जास्त दिसते म्हणून आम्ही मागच्या दरवाज्याकडे गेलो. सुशील चढला. मी चढत होतो. इतक्यात...काहीतरी विचित्र खुसफुस मला जाणवली. क्षणात शर्टच्या खिशाकडे लक्ष गेलं तर मोबाईल गायब! खालचे खिसे तपासले, पण मोबाईल इथे नव्हताच. दुसऱ्याच क्षणाला मागे पाहतो तर दरवाजातून त्या गर्दीत मिसळणारी एक टिपिकल संशयित व्यक्ती. हाच तो असावा... माझ्या सहाव्या कि कोणत्यातरी सेन्सने मला झटकन अलर्ट केलं. 

पुढच्याच क्षणाला मी ट्रेनमधून उतरून त्याच्या मागे. तो झपझप पुढे सटकण्याच्या प्रयत्नात. मी त्याला नजरेच्या टप्प्यात ठेवण्याच्या धडपडीत... जर मी धावतो किंवा ओरडतो तर कदाचित तो उडी मारून पलीकडे उभ्या असलेल्या दिवा लोकलकडे गायब होण्याची शक्यता... मागे वळूनही न पाहता काहीशा अधिरतेने तो जिन्याकडे वळाला.

इथेच त्याला गाठण्याची शक्यता होती कारण जिन्यावर गर्दी होती. धावत जात मी त्याच्यावर हात टाकला. तो गर्दीत अडकला होता. कॉलर पकडून बाहेर खेचला आणि हातातून प्लास्टिकची पिशवी कि काहीतरी काढली तर त्यात गुंडाळलेला माझा मोबाईल बाहेर आला. फक्त १०-१५ सेकंदाचा खेळ.

मागून सुशील धावत आलाच होता. गर्दी जमली. तो ओरडून सांगतोय, " नही अंकल, नही अंकल...." बस्स... दोनचार जणांनी त्याला पकडून पोलिसात देण्यासाठी वर जिन्यावर घेऊन गेले. अगदी १२-१३ वर्षाचा मुलगा होता. चांगल्या घरातला कि काय म्हणतात तश्यातला....

आम्ही परत तीच ट्रेन पकडली. आमच्या साठीच जणू जरा जास्तच थांबली होती. मध्ये येउन पाहतो तर त्या ५-१० सेकंदात त्याने मोबाईल स्विचऑफ केला होता. मधली पब्लिक म्हणाली कि मी चढलो तेव्हा माझ्या खांद्यावरून त्याने ती प्लास्टिकची पिशवी टाकली. त्यामुळे समोरच्यांना तो खिशातून मोबाईल काढतोय कि काय ते समजलेच नाही आणि ती खुसफुस मला जाणवली तोपर्यंत तो उतरून चालू पडला...

दोन क्षण मि विचार करीत बसतो किंवा ट्रेन मध्ये शोधाशोध करतो किंवा कॉल लाऊन पाहतो तर खेळ खल्लास... आजपर्यंत मुंबई मध्ये किंवा इतरत्र प्रवासात माझ्यावर कधीही कुणीही हात टाकला नव्हता. हे पहिल्यांदाच असं घडल्याने मीही धक्क्यात. कुणीतरी म्हणालं आज तुझ नशीब चांगलं होतं. कुणी म्हणालं त्याला पकडून पोलिसांकडे द्यायला हवं होतं कारण त्यांची टोळी कि ऱ्याकेट असते ते सापडलं असतं. कुणी म्हणलं मोबाईल गेला तर नुकसान होतं ते वेगळं; पण फोनबुक, डेटा, फोटो, इत्यादी महत्वाची माहिती गेल्याने मनस्ताप खूप होतो.

विरार आलं. भांबावलेला असूनही विजयी अविर्भावात मी घरी परतलो.

नंतर रात्री विचार करत होतो... स्साला आपण खिशातून ४० हजार रुपयांचा मोबाईल मिरवायचा आणि समोरून आमंत्रण द्यायचं शर्विलकबंधूना. कि एकीकडे आपण स्वत:च प्रचंड महागडे होत चाललोय आणि दुसरीकडे आर्थिक विषमतेच्या खाईत कोसळत चाललेल्या ह्या समाजाचा तो एक भरकटलेला प्रतिनिधी...? कोण होता तो? नावही नाहि विचारलं.. कुठे राहत असेल...?

" नही अंकल...नही अंकल...नही अंकल..." हा आवाज तीव्र होत जातो आणि नंतर कधीतरी मी सर्वकाही विसरून शेवटी झोपी जातो....

Thursday, 29 January 2015

सोशालीस्ट आणि सेकुलर हे शब्द मोदीसरकारने का वगळले ?

हा देश कधीहि धर्म-निरपेक्षच नव्हता आणि नसेल, हि भाषा उलट अधिक उद्दामपणाची आहे.
कॉंग्रेस, भाजप किंवा शिवसेना ह्या राजकीय पक्षांना काय वाटते किंवा ते कोणत्या धर्मियांचे लांगुलचालन वैगैरे करतात हा ज्यांच्या त्यांच्या क्षुद्र राजकारणाचा भाग असेल तो असेल. पण हा देश आणि देशाची राज्यघटना सोशालीस्ट आणि सेकुलर आहे ह्यात काही वाद असण्याची गरज नाही.

मुळात बाबासाहेबांनी सोशालीस्ट आणि सेकुलर हे शब्द प्रिएम्बल मध्ये का घातले नाहीत ह्याचे तेव्हाच विश्लेषण केले होते कि आपली घटना मुळातच समाजवादी आणि धर्म-निरपेक्ष आहे! नंतर ते शब्द घटनेच्या प्रिएम्बलमध्ये मुद्दामहून घालावे लागले ह्यातून कदाचित त्या शब्दांचे महत्व आणि गांभीर्य लक्षात यावे. सध्याचे देशातील धर्मांध सत्ताकारण आणि त्यांची खोडसाळ वक्तव्ये लक्षात घेता घटनेतील समाजवादी आणि धर्म-निरपेक्ष ह्या शब्दांची आजच्या काळात अत्याधिक गरज असल्याचे लक्षात येते.

धर्मांधाना स्वत:चाच वर्चस्ववाद हवा असतो. त्यांना लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समाजवाद प्रणीत शासन अभिप्रेत नसून धर्मांध हुकुमशाही सत्ता हवी असते. जगभर धर्मांधांनि, क्रूरकर्म्यांनि जो उच्छाद मांडला आहे तो लक्षात घेता भारतातील धर्मांधांच्या छुप्या आकांक्षाना सध्या कोंब फुटले आहेत हे उघड आहे. धर्माधारित राज्य म्हणून आपल्याच सोबत स्थापित झालेल्या पाकिस्तानची काय दुरवस्था झाली हे वेगळं सांगायला नको!

कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातून राज्यघटनेतील (secular, socialist) सेकुलर, समाजवादी हे शब्द (चुकून) मोदीसरकारने वगळले आणि दिल्लीतील भाषणात ओबामांनी भारत धर्मांधतेच्या मार्गाने गेल्यास बरबाद होईल असा इशारा देताना त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, कैलाश सत्यार्थी ह्या महान भारतीयांसोबतच (अल्पसंख्यांक समुदायातील) शाहरुखखान, मेरीकोम, मिल्खासिंग ह्यांचा आवर्जून उल्लेख केला. ओबामांनी दिलेलि हि चपराक त्यांना आमंत्रित करणाऱ्यांनीच गांभीर्याने घ्यायला हवी. सोनारानेच कान टोचलेले बरे असतात, असं म्हणतात!

Friday, 23 January 2015

"मुस्लिम लोकसंख्यावाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला!"

"मुस्लिम लोकसंख्यावाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला!"

खरंतर अशी हेडलाईन असायला हवी होती. पण सध्याच्या सरकारची आणि त्यांच्या मीडियाची मानसिकता पाहता ज्या प्रकारच्या बातम्या आणि हेडलाईन आल्या त्यातून धार्मिक उन्माद आणि तेढ वाढविण्याचीच प्रवृत्ती समोर येते.

२००१-२०११ या दशकात लोकसंख्यावाढ किती झाली ह्याचा तो रीपोर्ट आहे.

देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे. म्हणजे ०.८% एवढी वाढ झाली.
देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के आहे तर मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं ती आकडेवारी सांगते. 


पण १९९१-२००१ ह्या नव्वदच्या दशकापेक्षा सध्याच्या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला आहे. 


हे जास्त महत्वाचे आणि स्वागतार्ह आहे, पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे का ? मुस्लिम समाजात देखील एकविसाव्या शतकाचे आणि ग्लोबलायझेशनच्या आधुनिकतेचे वारे वाहत असल्याचे ते लक्षण आहे. ह्या बदलत्या मुस्लिम मानसिकतेला अधिकाधिक बळ द्यायला हवे.

Thursday, 1 January 2015

'पिके'

काल 'पिके' पाहिला.

विषय महत्वपूर्ण असूनही त्यामानाने सिनेमा यथातथाच आहे. संवाद, अभिनय ह्या सर्वच स्तरावर 'पिके' सामान्य फिल्म आहे. तरीही सिनेमा एन्जॉय करण्यासारखा आहे आणि बर्यापैकी प्रबोधनात्मकही आहे. ह्या सिनेमावर 'विशिष्ठ' धर्मियांनी उठवलेला आवाज अवास्तव असल्याचे लक्षात येते. खरंतर असं करून 'पिके'च्या प्रसिद्धीत हातभार लावण्याचेच कार्य त्यांनी केले. 

'पिके' जगातील सर्व धर्मातील धार्मिक शोषण, धर्मांधता आणि अंधश्रद्धा ह्या महत्वाच्या विषयावर भाष्य करतो. पण तरीही सिनेमा त्या विषयाला योग्य न्याय देत नाही असं दिसते. 'पिके'च्या एलियनच्या भूमिकेतील अमीर देखील अभिनयात कमी पडलाय. परग्रहावरील एलियन ह्या संकल्पनेचा देखील भयंकर संकोच झाला आहे. शेवटी 'पिके' आणखी काही एलियन घेऊन परत येतोय असे दाखविल्याने सिनेमाचा शेवटही रटाळ झालाय.

मुळात धार्मिक शोषणाला उघडे पाडताना अमीर खानला 'पिके' नावाच्या एका 'एलियन'च्या मध्यवर्ती भूमिकेत दाखविले आहे. कदाचित इथेच सगळा घोळ झालाय. आमच्या धर्मावर भाष्य करणारा हा अमीर खान कोण लागून गेलाय? ह्या मानसिकतेचे शिकार असलेले लोक्स सालाबादप्रमाणे आपल्या धर्माचा बंडाचा झेंडा घेऊन उभे राहिले आणि त्यातून 'पिके'ला प्रचंड प्रसिद्धी आणि यशही मिळाले, असं म्हणावं लागेल.

पण ह्या 'विशिष्ठ' धर्मीयांची बोंब अवास्तव आहे कारण सिनेमा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आदि सर्व धर्मांतील अंधश्रद्धा आणि धार्मिक शोषण ह्या मुलभुत समस्येवर हल्लाबोल केला आहे. मंदिर, मशीद, चर्च आदि सर्व धार्मिक स्थळे आणि त्यातील धर्माचे ठेकेदार ह्यांनी ईश्वराच्या नावावर सामान्य माणसाचे शोषण करणारी जी समांतर व्यवस्था उभी केली आहे तिचा पर्दाफाश 'पिके' करतो.

धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदाराच्या भूमिकेत दाखविलेल्या 'तपस्वी' (सौरभ शुकला) ह्या पात्राला 'पिके' अमीर खान आव्हान देतो आणि वादविवादात त्याला मात देऊन त्याचे ढोंग उघडे पाडतो. हा पर्दाफाश सर्वधर्मीय प्रातिनिधिक स्वरूपात दाखविला आहे. त्याच पद्धतीत तो अस्तित्वात आहे आणि तसंच ते अभिप्रेत आहे.

पण त्यावर 'विशिष्ठ' धर्माला टार्गेट केल्याचे आरोप केला गेला. त्यातच अनुष्का शर्मा (हिंदू) आणि सुशान्तसिंग राजपूत (मुस्लिम) ह्यांची बेल्जियम मध्ये प्रेमकथा दाखवून शेवटी त्यांचे मिलन हा आणखी लव्ह-जिहादचा मुद्दा ठेकेदारांना उपलब्ध झाला. तपस्वीचे थोतांड उघडे पडणे आणि त्यातून एक हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाक प्रेमकथेचा विजय होणे अशी थीम असल्याने 'विशिष्ठ' धर्मातील ठेकेदारांना 'पिके' सिनेमा झोंबला असल्याची शक्यता आहे.

खरंतर 'तपस्वी' सर्व धर्मातील ठेकेदारांचे प्रतिनिधित्व करतो. अलीकडेच आसाराम, निर्मलबाबा, रामपाल, इ. तपस्वींचे पेवच आपल्याकडे फुटल्याने तपस्वी 'विशिष्ठ' धर्मीय दाखविला असेल तर त्यात काही वावगे वाटण्याचे कारण काय?

बरं, ती 'आपली' अनुष्का शेवटी तिच्या प्रेमात पडलेल्या त्या 'पिके' अमीर खानशी प्रेम किंवा लग्न वैगैरे न करता 'आपल्या' सुशांत सिंगच्या प्रेमात पडते. तोही तिला धोका वैगैरे न देता, पाकिस्तानातून आपल्या देशात तिला भेटायला येतो, ह्यात लव्ह जिहाद वैगैरे हिंदू-मुस्लिम धोका आपल्या ठेकेदारांनी शोधून काढला, त्याबद्दल त्यांच्या संशोधनबुद्धीचे कौतुक करावे तितके थोडकेच! कारण ह्या मंडळीना अमीर, सलमान, शाहरुख ह्या मुस्लिम अभिनेत्यांनी पडद्यावर करण, अर्जुन, चुलबुल पांडे अशी हिंदू नावे घेऊन अभिनय केला तरीही तो लव्ह-जिहाद भासतो आणि हिंदू अभिनेत्यांनी (इथे सुशान्तसिंग) पडद्यावर मुस्लिम नावे (इथे सर्फराज) घेऊन अभिनय केला तरीही तो लव्ह-जिहाद वाटतो. ती  अभिनेत्री पडद्यावर हिंदू किंवा पडद्यामागे हिंदू असली कि झालं. म्हणजे, ह्या चारपैकी कोणतेही परम्युटेशन कॉम्बिनेशन असलं तरीही आपल्या 'विशिष्ठ' धार्मिक ठेकेदारांचा सनातन लोचा झालेला असतोच.

एकंदरीत एका महत्वपूर्ण समस्येवर भाष्य करणारा एक सामान्य दर्जाचा सिनेमा असंच 'पिके'चे विश्लेषण असेल तरीही तेवढाच डोस आपल्या 'विशिष्ठ' धर्माच्या ठेकेदारांना हादरवून सोडतो, हे उल्लेखनीय आहे. अशा सिनेमावर अवास्तव गदारोळ माजविणारे 'विशिष्ठ' धर्मातील ठेकेदार, त्यांच्या दुकानदारीवर 'पिके'ने केलेला हल्ला पचवू शकले नाहीत, हेच स्पष्ट होते! ह्यातच धार्मिक शोषणाच्या महत्वपूर्ण विषयाचे आणि त्यावर भाष्य करणाऱ्या 'पिके'चे यश सामावलेले आहे, एवढं नक्की.

( ता.क. : हा लेख लिहिताना 'विशिष्ठ' शब्दाच्या धार्मिक पार्श्वभूमीची सांप्रतकाळी अदलाबदल किंवा उलथापालथ होत असल्याचे सतत जाणवत होते.)